आपण आयुष्यभर काही ना काही मिळवण्याच्या धावपळीत असतो. मोठं घर, मोठी गाडी, भरपूर पैसा, प्रतिष्ठा आणि इतरांपेक्षा पुढे जाण्याची इच्छा… पण या सगळ्याच्या मागे धावताना एक गोष्ट मात्र नकळत हरवून जाते मनःशांती.
आपल्या गरजा आणि इच्छा यांच्यात फरक ओळखायला शिकलं पाहिजे. प्रत्येक इच्छा पूर्ण झालीच पाहिजे असं नाही; काही इच्छा अपूर्ण राहिल्या तरी आयुष्य अपूर्ण होत नाही.
कुणाला त्रास देऊन, कुणाला दुखावून किंवा सतत वाद घालत जगण्यात कसला आनंद? कुणी आपल्याबद्दल चुकीचं बोललं, गैरसमज केला किंवा आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी एक स्मितहास्य आणि शांतता हेच सर्वात मोठं उत्तर असतं.
नात्यांमध्येही हेच लागू होतं. प्रत्येक वेळी रुसणं, मनात राग ठेवणं आणि खोटी आश्वासनं देणं यापेक्षा नात्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे.
आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा.
दिवसभर जगासाठी धावणारा माणूस स्वतःला मात्र विसरतो. मोबाईल, काम, पैसा, जबाबदाऱ्या आणि नाती यांच्यामध्ये काही क्षण स्वतःसोबत घालवा. शांत बसा… स्वतःला विचारा, “मी खरंच आनंदी आहे का?”
कारण शेवटी आयुष्य किती मोठं होतं यापेक्षा, आपण ते किती शांतपणे, प्रेमाने आणि समाधानाने जगलो हे महत्त्वाचं असतं.
आयुष्य खरंच चार दिवसांचं आहे…
म्हणून ते कुणाला हरवण्यात नाही,
तर स्वतःला सापडण्यात घालवा.
– निलेश सु कवळे (सुपुत्र)


Leave a Reply