नवीन लेखन...

मधू आपटे

मधू आपटे म्हणजे मधुकर शंकर आपटे यांचा जन्म १ मार्च १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या घरी घरच्या संपत्तीचे वाद चालू असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनतर त्यांच्या आई गंगुबाई आपल्या तीन मुलांना घेऊन आपल्या भावाच्या म्हणजे ताम्हणकर यांच्या घरी आल्या. मुलांना सांभाळण्यासाठी त्यांनी लोणची , पापड, हलव्याचे दागिने , जरीच्या टोप्या इत्यादी गोष्टी करून विकण्याचा व्यवसाय केला. आणि आपल्या मुलांचा सांभाळ केला. वयाच्या नवव्या वर्षी अतितापाने मधू आपटे यांची वाचाच गेली. मिरजेच्या डॉ. वानलेस यांनी केलेल्या घशाच्या ऑपरेशनमुळे त्यांना अडखळत का होईना त्यांना बोलता येऊ लागले परंतु त्यांचा तोतरेपणा कायम राहिला.

घरची गरिबी असल्यामुळे शाळेत फी देणे परवडत नव्हते त्यामुळे बऱ्यापैकी हुशारी , चांगली समरणशक्ती आणि उत्तम हस्ताक्षर असूनही मधू आपटे यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयतेच्या पुढे जाऊ शकले नाही. मधू आपटे यांच्या मामांना १९२९ मध्ये प्रभातमध्ये नोकरी लागली आणि मधू आपटे यांच्या मोठ्या भावाला अनंत आपटे यांना बालनट म्ह्णून काम मिळवून दिले. पुढे मामाच्या ओळखीने मधू आपटे हे १९३४ मध्ये तेथील पेंटिंग खात्यात काम करू लागले. तेथे ते खूप कष्ट करत . खरे तर त्यांना ते कष्ट झेपत नसत तरीपण त्यांनी वर्षभर काम केले. त्याच वेळेस त्यांचा साहेबमामा फत्तेलाल यांच्याशी ओळख झाली. याच काळात सोळा वर्षाच्या मधू आपटे यांच्या तोंडाला रंग लागला तो योगायोगाने, स्टील डिपार्टमेंटमध्ये असताना शांतारामबापूंनी मधू आपटे यांचे बोलणे फोनवर ऐकल्यावर त्यांनी मधू आपटे यांना ‘ संत तुकाराम ‘ या चित्रपटात सालोमालो या इरसाल व्यक्तीरेखेच्या भूमिकेत उभे केले. पुढे प्रभात कंपनीचा लिलाव झाल्यावर मधू आपटे बेकार झाले. त्यावेळी सीताकांत लाड आणि चित्तरंजन कोल्हटकर यांच्यामुळे त्यांना आकाशवाणीवर काम मिळाले. पण त्यात सातत्य नव्हते. परंतु तेथे काम करता करता त्यांनी नाटकातही कामे करावयास सुरवात केली.

१९४४ मध्ये मा. दीनानाथ यांच्या पहिल्या पुण्यतिथीला ‘ भावबंधन ‘ नाटकाचा प्रयोग करण्यात आला , त्यात मधू आपटे यांना लता मंगेशकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, अधूनमधून ते बाबुराव गोखले यांच्या नाटकातून काम करत असत. पण तेथे जम बसत नसल्यामुळे त्यांनी फिल्मिस्तान कंपनीत नोकरी स्वीकारली. ते दरम्यानच्या काळात सुलोचनादीदीबरोबर चित्रीकरणास जात असत तेथे हिंदी निर्मात्यांनी त्यांना छोट्या-मोठ्या भूमिका द्यायला सुरवात केली. तेथे त्यांनी राजेंद्रकुमार , ओमप्रकाश , मोहनकुमार यांच्यासोबत काम केले. मधू आपटे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांच्यावर खूष होऊन त्यांना राजेंद्रकुमार यांनी घड्याळ दिले होते. तेव्हा राजेद्रकुमार त्यांना म्हणाले होते की ‘आप डायलॉग बोलते बोलते कहा रुकेगे वो मालूम नही पडता, लेकिन मजा आता है ‘

वसंत जोगळेकर यांच्या ‘ कारागीर ‘ या चित्रपटातही त्यांना ओमप्रकाश आणि ललिता पवार या भांडकुदळ जोडप्याच्या इरसाल मुलाची भूमिका मिळाली. मधू आपटे यांना भूमिका त्यांच्या तोतरे बोलण्याच्या मिळत असल्या तरी तेवढ्यावरच ते आपली भूमिका वठवत नसत, तर विनोदी प्रसंगात दुसऱ्याच्या बोलण्यावरही रिऍक्ट होण्याचेही ते तंत्र वापरत . त्यामुळेच त्यांनी वठवलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात रहात. आता ‘ आम्ही जातो आमुच्या गावा ‘ ह्या चित्रपटातील त्यांची विनोदी धमाल भूमिका कोणी विसरू शकत नाही. ‘ हवाच मज तू हवाच तू ‘ ह्या गाण्यात जी धमाल आहे ती वेगळी आहे.
मधू आपटे यांच्या मनात चार्ली चॅप्लिन , डॅनीके , बालगंधर्व , नानासहेब फाटक यांच्याविषयी खूप आदर होता. मधू आपटे यांनी आपल्या ३६-३७ वर्षाच्या कारकिर्दीत हिंदी-मराठी २०० चित्रपटात कामे केली. तसेच २० नाटकांमध्येही कामे केली आहेत.
व्यंग असूनही बुद्धीमत्ता आणि हजरजबाबी असलेल्या अशा कलाकाराचे १३ मार्च १९९३ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..