लघुत्तम कथा-१
अपूर्ण कथा
दिवसभर चा संपूर्ण वेळ नोकरीत जातो. सायंकाळी घरी आलो की फ्रेश होऊन टी पॉंय वर जमा असलेले पेपर, वाचायचे बाकी आहेत म्हणून काढून ठेवलेल्या पुरवण्या, मासिके,साप्ताहिके वाचावयास घ्यावी; तर तेवढ्यात घरातून गृहलक्ष्मीचा आदेश, “अहो, बंड्याची ची परीक्षा जवळ आलीय, त्याचा अभ्यास घ्या. काय पेपर मध्ये डोकं घालून बसले आहेत!
नाही तर किराण्याची एखाद दोन सामानाची यादी हातात पडायची.”हे संपले,घेऊन या !”
नाही काहीच तर,कधी भाजी घेण्यासाठी म्हणून तरी हातात पिशवी दिली जायची.हे तर रोजचेच सुरू होते.या गोष्टीचा विजयला मनापासून कंटाळा आला होता. योगायोगाने दिवाळी जवळ आली होती.बायकोला माहेरी पाठवायची चांगली संधी चालून आली होती.
दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या बरोबर बायको आणि पोरांना घेऊन विजय सासरवाडीला जाऊन आला.
दोन दिवस राहिला. मुलांना शाळेला सुट्टी असल्याचे निमित्त पाहून बायको ही माहेरी थांबली.
मोठ्या आनंदात विजय घरी परतला. घरी आल्यानंतर त्याला आता कसं शांत शांत वाटत होतं .खरं स्वातंत्र्य तो अनुभवत होता.आता फक्त पुस्तकाचं वाचन,लेखन आणि आपण.आता कुणीही त्याला डिस्टर्ब करणार नव्हते.
विजयला वाटलं खूप दिवसानंतर त्याला आज शांत सुखाची झोप लागली होती.सकाळी उशिरा उठला. पाणी निघून गेले होते.टॉयलेटला गेला तेव्हाच घंटा गाडी येऊन गेली होती.आंघोळीला बसला तेवढ्यात दूधवाला दारावरची बेल वाजवून थोडा वेळ वाटही न बघता निघून गेला होता.
विजयची हवा आता हळूहळू कमी होत आली होती.त्याला कळत नव्हते हे रोजचं रुटीन आपल्याला कसे काय जमत नाहीये.परंतु या गोष्टी जमतील हळू म्हणून त्याने फारसे मनावर घेतले नाही.खरं तर त्याला एकांत हवा होता.खूप दिवसापासून लेखन वगैरे झालं नव्हतं. मनात खूप विचार साठवून होते. ते कागदावर उतरवायला संसारात उसंत मिळत नव्हती. अनेक कथाबीज डोक्यात तरंगत होते.एवढ्या दिवसानंतर छान एकांत मिळाला म्हणून विजयला आनंद वाटत होता.
त्याची लेखनाची उर्मी उफाळून आली होती.एकांतवासात प्रतिभा फुलते असे त्याचं मत होते.
लेखनाचे साहित्य घेऊन तो लेखनाच्या टेबलावर बसला.
खूप दिवसांनी मनात साठवलेलं कथाबीज आठवू लागला.कथेतील नायक तर तो चितारू शकला, परंतु नायिकेचे चित्रण करताना मात्र त्यांची लेखणी अडत होती. तो कसल्यातरी विचाराने अस्वस्थ होता. त्याच्या कथेतील नायिका काही केल्या प्रकट होत नव्हती.
परिणामी कथा अपूर्ण राहिली होती. बरेच दिवस ते तसंच पडलं.विजयला कळत नव्हतं, दररोज च्या संसारात एवढा व्याप असूनही तो थोडेफार का होईना लिहीत होता. लिहिलेले साहित्य प्रकाशित होत होते. या साहित्याने लेखनाच्या प्रांतात त्याचे थोडीफार नाव झाले होते.
आज मात्र एवढा एकांत मिळत असून ही तो लिहू शकत नव्हता.
दिवाळी संपून आता आठ दिवस झाले होते.विजयची बायको मुलांना घेऊन माहेरी परत आली होती.
तिने विजयला प्रश्न केला,”किती कथा लिहिल्या?”
विजय म्हणाला,एकही नाही. सर्व कथा अपूर्ण आहेत.”
“का”,ती म्हणाली.
कारण कथांतली नायिका च शब्दबद्ध होत नव्हती.काही केल्या तिचं रूप मी चित्रित करू शकत नव्हतो.”
आता!”
आता तू आलीस. खऱ्या अर्थाने माझी कथा पूर्ण होईल.”
..आणि त्या दोघांनी मिळून अपूर्ण कथा पूर्ण करायला घेतली….
किरण दशमुखे
सटाणा (नाशिक)
मोबाईल:9420889575


Leave a Reply