आंजर्ले हे गाव दापोली तालुक्यात (जि. रत्नागिरी) समुद्रकिनारी वसले आहे. गावाला जोडणारी वाहतूक व्यवस्था परिपूर्ण असून आंजर्ले – वेसवी – मंडणगड-मुंबई त्याचप्रमाणे आंजर्ले – दापोली व तेथून मुंबई- पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी असे रस्ते आहेत.
या गावावर निसर्गाने सौंदर्याची आणि चिरतारुण्याची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. येथे अत्यंत विस्तृत आणि स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे. समुद्राच्या भरती-ओहोटीचा खेळ पाहण्यात किंवा नितळ पाण्यात समुद्रस्नानाचे सौख्य अनुभवीत किंवा सूर्यास्ताच्या वेळी वाळूवर विश्रांती घेत घेत सूर्यास्त समयीचे आकाशाचे बदलते रंग पाहण्यात तासामागून तास जातात. उत्तर आणि पूर्व बाजूला पसरलेले डोंगर, त्यावरील वृक्षराजी तर दक्षिण बाजूला भरती-ओहोटीशी लडिवाळ खेळ करणारी खाडी, त्यावर डोलणाऱ्या होड्या आणि प्रवासी वाहतूक; नारळी-पोफळी, आंब्यांच्या सदाहरित बागा, सागरावरून येणारा थंडगार वारा आणि | नीरव शांतता यांच्या कोंदणात हे गाव वसले आहे.
या गावच्या समृद्ध अशा निसर्गसौंदर्याला मागे सारणारी वास्तू म्हणजे येथील डोंगरावर वसलेले सिद्धिविनायकाचे मंदिर अजोड कलाकृतीचा विलास आणि मंदिराच्या रचनातंत्राची चरम सीमा ठरावी अशा डौलदार शैलीत बांधलेले सिद्धिविनायकाचे भव्य मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असून ते ‘कड्यावरील श्री गणपती मंदिर’ या नावाने ओळखले जाते. हे मंदिर म्हणजे येथच्या निसर्गसौंदर्याला पडलेले स्वप्न आहे.
विविध भारतीय मंदिर- शिल्पांचे नमुने म्हणून महाबलिपुरम येथील मंदिरे (७ वे शतक), सूर्यमंदिर (राजस्थान ९ वे शतक), लिंगराज (भुवनेश्वर १० वे शतक), राजराजेश्वर मंदिर, तंजावर (११ वे शतक) आणि कोणार्कचे सूर्यमंदिर (ओरिसा १३ वे शतक) या मंदिरांपेक्षा सर्वस्वी भिन्न अशा स्वतंत्र भारतीय शैलीचे हे आंजर्ले येथील गणपतीचे मंदिर कलाप्रेमींना, निसर्गप्रेमाची आस असणाऱ्यांना आणि सिद्धिविनायकाच्या भक्तांना सारखेच आकर्षित करते.
या मंदिराच्या निर्मितीसाठी १२ वर्षे लागली आणि इ.स. १७८० मध्ये रामकृष्ण भट, हरि नित्सुरे यांनी मंदिराचे काम पूर्णत्वास नेले. गर्भागाराच्या घुमटाची उंची ४० फूट असून मध्यभागी ४ फूट उंचीची ऋद्धिसिद्धीसहित सिद्धिविनायकाची (उजव्या सोंडेची मूर्ती ३ फूट उंचीच्या सिंहासनावर विराजित आहे. भक्तांच्या आर्त हाकेला धावून येणारा असा भक्तजनांचा विश्वास आहे.


Leave a Reply