नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ६

हा खेळ आकड्यांचा

पालेभाज्या आज ज्या पद्धतीने वाढवल्या जातात, खाल्ल्या जातात, पालेभाज्यांचे समर्थन केले जाते, (आणि पाश्चात्य सांगतात म्हणून?) ते अगदी चुकीचे आहे. हे लक्षात घ्यावे.

आपण अगदी मुळापर्यंत जाऊ.

अमुक ग्रॅम तांदुळ किती कार्बोहायड्रेटस देतो, किती कॅलरीज मिळतात, हे स्टॅण्डर्ड आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या थिएरीने ? हे आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या आधारावर ?

भारतात हैद्राबाद येथे एक युनीट आहे, जे भारतातील अन्नधान्याचे स्टॅण्डर्डायझेशन ठरवते.
ती संस्था नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्युट्रीशन. एन आय एम.
ही संस्था आपल्या अन्नधान्यांच्या व्हॅल्युज नक्की करत असते. याची तपासणीची नेमकी पद्धत काय आहे ? हे आकडे येतात कुठुन ? म्हणजे एक वाटी तांदुळामधे किती कॅलरीज आहेत हे मोजण्यासाठी हे तांदुळ एका क्लोज चेंबर मधे ठेवून जाळले जातात. आणि या जळण्यातून किती उर्जा तयार होते, किती वायु बाहेर पडतात, त्यातून किती ह्युमीडीटी तयार होते, किती तेल शिल्लक राहाते, राखेत काय काय मिळते इ. च्या आधारावर हे ” आकडे ” प्रसिद्ध केले जातात.

हा केवळ आकड्याचां खेळ आहे. त्यात फार काही तथ्य नाही. केवळ कागदोपत्री पुरावे हवेत म्हणून किंवा काही तरी व्हॅल्युज नक्की करण्यासाठी, अभ्यासाला एक दिशा मिळावी म्हणून ही पद्धत स्विकारली गेली आहे.

आता लोच्या इथे आहे की, हे केवळ पुस्तकी ज्ञान झाले. व्यवहारात एवढी परम्युटेशन काॅम्बीनेशन दिसतात, त्यांचा विचारच कोणी करत नाही. परदेशात असा विचार शिकवणारा आयुर्वेद नाही. म्हणून आज पाश्चात्य लोक आयुर्वेद शिकायला भारतात येताहेत.

जसे
भारतात पन्नास साठ प्रकारचे तांदुळ मिळतात,
या प्रत्येक प्रकारातील तांदळाच्या गुणधर्मात फरक असणार नाही ?
फरक असतो.
आयुर्वेद सांगतो, गुणात फरक असतो. पंजाब मधे तयार झालेले तांदुळ, महाराष्ट्रात तयार झालेले तांदुळ आणि केरळ मधे तयार झालेले तांदुळ यातील गुणांमधे खूप मोठ्ठा फरक आहे. बासमती तांदुळ महाराष्ट्रात खाल्ला गेला तर परिणाम वेगळे. पंजाबमधे दिसणारे परिणाम वेगळे.

आनूप आणि जांगल असे दोन प्रदेश आणि त्याचे अन्नावर होणारे परिणाम आम्ही आमच्या आयुर्वेदाच्या सात वर्षाच्या अभ्यासक्रमात शिकलो आहोत. त्याची सरकारी परीक्षा दिलेली आहे. मान्यताप्राप्त सरकारी यंत्रणेने तसे प्रमाणपत्र आम्हाला दिलेले आहे.

आयुर्वेद म्हणजे केवळ पाळेमुळे आणि सापसरड्यांच्या प्रदेशातील आणि भिकारडी माणसे रहात असलेल्या भारत देशातील, रस्त्यावर पाळेमुळे विकणारी मंडळी म्हणजे आयुर्वेद नव्हे. (काही सुशिक्षित व्हाईट काॅलर्ड मंडळींना अजूनही तसे वाटतेय हे भारताचे दुर्दैव आहे. असो. )

काही तांदुळ साठ दिवसात तयार होतात,
काहींना नव्वद दिवसही लागतात,
यांच्या कार्बोहायड्रेटस मधे फरक असणार की नाही ?
फरक पडतो.
आयुर्वेद सांगतो, फरक पडेल.

तयार झाल्यावर लगेच वापरला, तर आणि दोन वर्षे जुना करून वापरला तर फरक पडणार नाही ?
फरक पडतो.
आयुर्वेद सांगतो, फरक पडेल.

सालासकट ( म्हणजे भात while rice with छिलका ) ठेवला तर गुण वेगळे, साल काढून तांदुळ तयार करून ठेवला तर गुण वेगळे. त्यातही पाॅलीश केलेला असेल तर गुण आणखीनच बदलणार.

सालासकट शिजवून वाळवला तर गुण वेगळे, (ज्याला आपण उकडा तांदुळ म्हणतो. ) सुरय तांदुळाचे गुणधर्म वेगळे.

तांदुळ भाजून ठेवला, आणि वापरला तर गुण बदलतात, तेलात भाजून शिजवला तर गुण बदलतात, तुपात भाजला तर गुण बदलतात, मंद विस्तवावर भाजला तर गुण बदलतात, अग्नि प्रखर असेल तर फक्त बाहेरून साल जळेल पण आतून कच्चाच असेल, याच्या गुणात फरक पडणार नाही ?

पाश्चात्यबुद्धीची कावीळ झालेल्यांना कदाचित फरक समजणार नाही, पण ज्यांच्या सरकारमान्य आयुर्वेद सेवेला वीस पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना हे फरक दिसतातच.

तांदुळ ज्या पद्धतीने खाणार त्या पद्धतीने, (विशेषतः अग्नीचा विचार करून. हा आयुर्वेद तज्ञांचा अगदी आवडीचा शब्द आहे. ) त्याची तपासणी झाली तर ती स्टॅन्डर्ड समजावी असे आयुर्वेदतज्ञ म्हणतात.

व्यवहारातही असेच दिसते.

लिखाण वाढतंय, पण विषय पूर्ण होऊदे,
100 ग्रॅम श्रीखंड दहा निरोगी माणसांना सकाळी दहा वाजता खायला दिले. आजच्या स्टॅन्डर्ड रक्त तपासणी वगैरे सोपस्कार पूर्ण केले.
पुनः दोन तासानंतर तपासणी केली. तर त्या सर्वांचे रक्त तपासणी रिपोर्ट एकच येतील का ? खरंतर यायला पाहिजेत. पुस्तकात लिहिलंय ना. पण व्यवहारात असं दिसत नाही. त्या प्रत्येक माणसाच्या पचनशक्तीवर त्या श्रीखंडाचा परिणाम वेगवेगळा दिसतो. म्हणून काही जणांची साखर वाढलेली दिसते, काही जणांची कमी होईल काही जणांवर विशेष परिणाम दिसणार नाही.

केवळ अन्नपदार्थ जाळून त्याची राख तपासणे आणि त्या पदार्थाची गुणवत्ता ठरवणे हे कितपत संयुक्तिक आहे ? राख तांदुळाची आहे इथपर्यंत ठीक आहे. पण ते तांदुळ या प्रकारच्या जमिनीमधे एवढ्या दिवसात तयार झालेले होते. त्यांचा गुणस्वभाव अमुक आहे, हे कसं सांगू शकणार ?

हे म्हणजे एखाद्या बेवारस प्रेतावर दहन संस्कार झाल्यावर, चार दिवसांनी अस्थि गोळा करायला जावे आणि त्या जळलेल्या हाडावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचे गुणांकन करावे तसे झाले.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
21.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..