एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात असे श्री जितेंद्र रांगणकर यांनी लिहिलेले ‘एकत्र कुटुंबाची गोष्ट’ या सदरात दैनिक ’प्रत्यक्ष’मध्ये दर शुक्रवारी वेगवेगळ्या कुटुंबाची ओळख करून घेताना होते. श्री जितेंद्र रांगणकर यांचे सर्वच विषयावरील लेख खूप वाचनीय, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणारे असतात. बहुतेक कुटुंबसंस्था पितृसत्ताक असतात, अभावानेच काही देशात, भागात मातृसत्ताक पद्धती बघायला मिळतात.
मुलांची वाढत्या वयातील जडणघडण व त्यांच्यावर होणारे सकारात्मक संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात. लहानग्या सदस्यांच्या शंकांचे निराकारण एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्याकडून होते, आता मात्र, विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने मुलांना आपल्या भावनांचा निचरा होण्यास अडचण निर्माण होते तसेच त्यास वेळ लागतो किंवा बंधने येतात असे वाटते. किशोरवयीन मुलांचा भावनिक बुद्ध्यांक कसा ओळखावा, पाल्याने शारिरीक व मानसिक बदलांमध्ये स्वत:ला कसे सांभाळावे याचेही भान एकत्र कुटुंबात एकमेकांशी चर्चा केल्याने चांगल्या प्रकारे होते. भारतात ग्रामीण भागात ही पद्धत प्रचलित असली तरी नागरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत चालली आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वमाऊलींनी पसायदानात म्हंटलेच आहे की ‘विश्वची माझे घर’ म्हणजे विश्वालाच एक कुटुंब मानले. काळानुसार कुटुंबाची संकल्पना आणि व्याख्याही बदलत गेली. एकत्रित कुटुंबातून संयुक्त कुटुंबेही अस्तित्त्वात आली असे आपल्याला वेळोवेळी समाजात वावरतांना जाणवते. अशा कुटुंबातही प्रत्येक सदस्याचीही त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते. ‘विश्वची माझे घर’ या संकल्पने नुसार जगातील एकत्रित कुटुंबावर जेंव्हा एखादी नैसर्गिक/मानवा निर्मित आपत्ती कोसळते तेंव्हा त्यांना वसुंधरेवरील इतर कुटुंबं सदस्यांनी दिलेल/केलेली सहाय्य किंवा मदत म्हणजे रक्ताच्या नात्यांपलिकडेही प्रेम आणि मायेने जोडलेल्या नात्यातील मानवतेच्या कुटुंबाला जिद्दीने आणि ताठ मानेने जगण्यास शिकविणारे परमेश्वराचे प्रेषकच म्हणावे लागतील.
हिंदुस्थानात ब्रिटिशांनी पाय रोवावयास सुरवात केली ज्यामुळे भारतात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि एकत्र कुटुंबपद्धतीला हादरे बसू लागले. गावातील दारिद्य्रामुळे गरजूंना शहराची वाट धरावी लागली. अपुर्या जागांमुळे एकत्र कुटुंबाची शक्यता मावळली. शिवाय ग्रामीण भागातील जुन्या माणसांना शहरी जीवनात समरस होणे तसे कठीण झाले. विविध प्रश्न निर्माण झाले होते. स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाने क्रांती घडवली होती आणि त्यामुळे त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू लागल्या होत्या आणि स्वत:च्या घराची आणि कुटुंबाची वेगळी स्वप्ने पाहू लागल्या होत्या. आजच्या युगात जरी विभक्त कुटुंबपद्धती अपरिहार्य ठरली तरी एकत्र कुटुंबाच्या नसण्यामुळे आपण काय कमावले अन् काय गमावले याचा विचार होणे सयुक्तिक ठरेल. जन्म, मरण, लग्नसोहळ्याच्या प्रसंगात एकत्र कुटुंबाचे योगदान भरीव होते याबद्दल दुमत होणार नाही. जन्म व विवाह प्रसंग एकत्र कुटुंबात समरसून साजरे होत. कुटुंबात घडलेल्या वाईट प्रसंगी एकमेकांना मानसिक आधार मिळे. माणसांच्या उबेमुळे उदासीनतेवरची खपली नैसर्गिकरीत्या सहजपणे भरून येत असे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रशिक्षण वर्गांची गरजच भासत नसे. व्यवहारी जीवनाचे खाचखळगे आपोआप आत्मसात केले जात होते. एकत्र कुटुंब म्हणजे नैसर्गिक मानसोपचाराचे एक चालतेबोलते समुपदेशनकेंद्रच. दु:खद प्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याची आपसूकच चालून आलेली परंपरा. याप्रसंगी तीव्र मतभेद पण संपुष्टात येत होते.
घरातील स्त्रीया कामानिमित्त बाहेर गेल्या असतील तर अन्य महिलांच्या मदतीमुळे कुटुंबात किंवा घरात अडचणी येत नसत. मुलांनाही मोठय़ा कुटुंबात राहण्याची सवय लागे. सण-समारंभ एकमेकांच्या मदतीने उत्साहात साजरे करता येत होते. हे सगळे एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे आहेत. ‘एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घराला कधीच कुलूप लावले जाते नसे. त्यामुळे तुम्ही कधीही घरी या, तुमच्या दिमतीला कायम कोणी ना कोणी हजर असायचे………
जगामध्ये काही पुरातन संस्कृती नावाजलेल्या होत्या, त्यात भारतीय संस्कृतीही होती आणि ग्रीक संस्कृतीचाही बराच वरचष्मा होता. इतिहासात झालेल्या उलाढाली आणि घटनांमुळे ग्रीक संस्कृती लयाला गेली, भारतीय संस्कृती टिकली. ग्रीक संस्कृतीने आपल्या संस्कृतीचा असा अंत का झाला याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असे आढळले की, आपल्या देशातली कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली म्हणून आपली संस्कृती लयाला गेली आणि भारतीय संस्कृती टिकली कारण भारताने कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवली म्हणून.
काही जणांचे म्हणने असे आहे की कुटुंब आणि कुटुंब व्यवस्था पाहिजेच, परंतु चुलत भावंडे, काका-पुतणे, आज्या-आजोबा, अशा ५०-५० माणसांची कुटुंबे नकोत. आई-वडील, आजी-आजोबा आणि नातवंडे एवढेच कुटुंब आदर्श, आटोपशीर आणि व्यक्तीच्या विकासाला चालना देणारे असते. अशा कुटुंबांची मात्र गरज आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अनेक वंशांचे लोक राहतात. मात्र या लोकांमध्ये सर्वाधिक समाधानी, बुद्धीमान आणि मानसिक-दृष्ट्या संतुलित कोण आहे याचा शोध घेतला असता भारतीय लोक सर्वात समाधानी, संतुलित आणि बुद्धिमान असल्याचे लक्षात आले. या भारतीयांच्या या गुणांचा शोध घेऊन विश्लेषण केले असता त्यांच्या या गुणांमागे त्यांची कुटुंब व्यवस्था असल्याचे लक्षात आले.
[पुढे वाचा]

