नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – भाग १२

प्रमेह हा कफाशी संबंधित आजार आहे. कफ दोषाचं विकृत झाल्यानंतरचं नाव क्लेद. क्लेद वाढवणाऱ्या पदार्थामधे दह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.पण दही न आवडणारा प्राणी तसा दुर्मिळच. दही म्हटलं की फक्त एकच प्राणी नाखुश असतो, तो म्हणजे आयुर्वेद वैद्य. खरंतर त्याच्याही जीवावर येतं, दही खाऊ नका म्हणून सांगायला. पण काय करणार? जे सत्य आहे ते कोणीतरी शेवटी सांगायलाच हवे ना ! ते अतिशय कठीण काम अखेर वैद्यालाच करावे लागते.

दही दूध म्हणजे काही अगदी विष नव्हे! अगदी बंद करण्याची आवश्यकता नाही. पण प्रकृती, लक्षणे, स्थळ काळ इ. ठरवून यांचे सेवन करावं लागतं.वाताचे काही आजार सोडले तर दही अनेक रोगांचे माहेरघरच आहे. युक्ती वापरून दही खाता येते. जिथे कायदा सांगितला जातो, तिथे पळवाट असतेच. ती युक्ती शोधून काढणारा वैद्य महत्वाचा !

दही लागते म्हणजे नेमके काय होते ? काही उपकारक जंतु विरजण स्वरूपात आपण त्या दुधात सोडतो. त्या दह्याच्या पहिल्या अवस्थेला आपण अदमुरे दही म्हणतो. साधारणपणे सात ते आठ तासात ही अवस्था येते. अजून तीन चार तास गेल्यावर पक्के वडी स्वरूप दही जमते. आणखी चार पाच तास गेले म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ते चांगलेच आंबट होते. तिसऱ्या दिवशी आंबटपणाचा कहर होतो. त्यावरची साय सुद्धा आंबट दिसायला लागते. रंग बदललायला सुरवात झालेली असते. वास बदलतो. बुडबुडे यायला सुरुवात होते. हे सगळं वर्णन का करतोय ? तेच तर दही न खाण्यामागचे इंगित आहे.

ही जी प्रक्रिया दह्यामधे सुरू झालेली असते ती थांबतच नाही. अदमुऱ्या दह्याचे रूपांतर एव्हाना आंबट्टढ्ढाण्ण दह्यात झालेले असते. या प्रक्रियांचा विचार केला तर दुधापासून दह्यात रूपांतरण होणारी ही प्रक्रिया रासायनिक स्वरूपाची असते. म्हणजे एकदा दही बनवायला सुरवात झाली की, थांबायचे नाव नाही. कितीही थांबवायचं म्हटले तरी आता परत दुधात रूपांतर होणे नाही. गुण आणि कर्माने सुद्धा! चव तर होत्याची नव्हती होऊन जाते. दह्यावरची ही प्रक्रिया पोटात गेली तरी तश्शीच सुरू राहते. ते आणखीनच आंबट होते. दह्याचा हा आंबटपणा पित्ताला हमखास वाढवतो. आणि त्यातील बुळबुळीतपणा कफाला वाढवतो.

वायुचा विचार केला तर दह्यामधे बुडबुडे पण तयार झालेले दिसतात. दही घुसळल्यावर, दह्याची वडी / कवडी मोडल्यावर आतील हा वायु निघून जातो, म्हणून तयार झालेले ताक सुपाच्य असते. म्हणूनच नुसते दही घेणे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण असे न घुसळलेले दही तिन्ही दोषांचा प्रकोप करते.

नक्तं न भुञ्जात्
दही कधीच रात्रीचे घेऊ नये, कारण दह्यामधे सुरू असलेली किण्वन प्रक्रिया कारणीभूत होत असावी. वात वाढवायला ही प्रक्रिया मदत करणारी असते. आणि सर्वात महत्वाचे सूर्य असेपर्यंत, त्याच्या अग्निवर पचन पूर्ण करून घेतले गेले पाहिजे, मग जाठराग्निवर अतिरिक्त ताण निर्माण होत नाही.

असे हे स्वभावतः कफ आणि पित्त वाढवणारे,क्लेद निर्माण करणारे, दही प्रमेहामधे वर्ज्य सांगितले गेले नसते तरच नवल !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..