नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ६७ – चवदार आहार -भाग २९

रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात.

कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या तरतम भावामुळे, पदार्थातील चवी मधे थोडा थोडा बदल होत जातो. आणि अनुरसांची निर्मिती होते.

जसे हिरवा रंग बघितला तरी त्यात अनेक सूक्ष्म छटा असतात. साडीला योग्य मॅचिंग ब्लाऊजपीस शोधताना, हे पाच पन्नास रंग आपल्याला सहज दिसतात. तसे, चवींमधे देखील एका चवीत आणखी दुसरी चव मिसळत गेली कि वेगळी वेगळी चव बनत जाते. घरात साखर, चहा पावडर, दूध, पाणी तेच असले तरी चार माणसांनी बनवलेल्या चार चहाच्या चवीमधे फरक पडतोच ना ! यातील साखर पावडरचे प्रमाण थोडे जरी कमी जास्त झाले किंवा गॅस लहान मोठा ठेवला गेला तरी बनणारा चहा हा वेगवेगळ्या चवींचा बनतो, हे आपण व्यवहारात पाहातो, तसेच आहे.

हिरड्यांचा तुरटपणा, सुपारीचा तुरटपणा यात फरक आहे. साखरेचा गोड पणा आणि गुळाचा गोडपणा यातही फरक आहे. तसेच कारले आणि मेथीच्या कडूपणातही फरक दिसतो. त्यामुळे प्रत्येक चवीचे वेगवेगळे अनुभव येणे आणि त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसणे, चुकीचे नाही.

एखादे नवीन व्यंजन बनवताना त्यात कोणत्या चवी किती प्रमाणात मिसळल्या जात आहेत, त्यावर त्या पदार्थांचे औषधी गुण अवलंबून असतात.

डाळीपासून गोड गुळ घालून खीर करता येते, आणि तिखट मसाला एकत्र केला की, आमटी बनते. आंबट घातले की, चटणी होईल.

आता हेच बघा ना, खीर गोड आहेच, आणि पुरणपोळी पण गोडच आहे. हे दोन्ही गोड पदार्थ एकाच चणाडाळीपासून बनतात, म्हणजे यांचे गुण एकच असतील का ? कारण एक खीर शिजवली जातेय आणि दुसरी पुरणपोळी भाजली जातेय. जो पदार्थ पाणी घालून शिजवला जातो, तो पचायला जड बनतो, तर भाजून ज्याच्यातील पाणी कमी केले जाते, ती पुरणपोळी पचायला खीरीच्या तुलनेत हलकी होईल का ? असा विचार करायला हरकत नाही, पण पुरणपोळी बनवण्यासाठी आणखी एक मधुर रस वापरला जातो, तो म्हणजे गहू. म्हणजे पुनः ती पचायला जड झाली. यासाठी
पुरणपोळी खाताना ती तुपाबरोबर किंवा कोकणात नारळाच्या दुधाबरोबर इतरत्र गाईच्या दुधाबरोबर खाल्ली जाते. सोबत डाळीची मसालेदार तिखट आमटी (ज्याला कट असेही म्हणतात.) पुरणपोळी पचवायला मदत करायला हजर असतेच.

यासाठी आहार बनवताना किंवा खाताना, चवींच्या मिलाफाचा संगम करण्यासाठी, युक्ती वापरणे महत्वाचे असते. जी ओरीजिनली भारतीयांकडे आहे.

एखादा पदार्थ सहजपणे पचावा, यासाठी त्या पदार्थामधे अन्य काही पदार्थ युक्तीने मिसळले जात होते. आता सर्वच बदलले. दोन भिन्न चवीचे पदार्थ बिनधास्त एकत्र केले जात आहेत. जसे मधुर रसाच्या दुधात आंबट फळे घालणे, किंवा दूध घातलेल्या चहामध्ये खारट चवीची खारी मारी बुचकळून खाणे हे रस विरूद्ध आहे.

हे विरूद्ध एखादा दिवस खाल्ले म्हणजे लगेच रोगाची लक्षणे दिसतील असे नाही. पण वारंवार असे रस विरूद्ध पदार्थ खाल्ले गेले तर मात्र असात्म्यता अहणजे अॅलर्जी निर्माण होते, हे नक्की !

वेगवेगळ्या फूड चॅनेल्सवर रंगसंगती, फॅशन, ट्रेंड, व्हरायटी, न्यू इन्व्हेंशन इ. च्या नावाखाली आरोग्यदायी आहाराचा पार बट्ट्याबोळ चाललेला आहे. त्यात डाएटीशियन या पदवीधारकांकडून आयुर्वेदातील मूलतत्वे बरोबर विरूद्ध करून सांगितली जात आहेत. वैद्य मंडळीदेखील पाश्चात्य बुद्धीची बनत चालली आहेत, अनेक डाॅक्टरांचे देखील आहाराबाबत एकमत होत नाही, आणि नेमकं आपण कसं वागायचं, हे समाजाला समजतच नाहीये.

किती किती ठिकाणी दुरूस्ती करणार ? आभाळच फाटले आहे, ठिगळे तरी किती लावणार ? बघू, अच्छे दिन आनेवाले है, असं ऐकायला येतंय !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
29.11.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..