नवीन लेखन...

दैव-सुदैव

चित्रपटसृष्टीत सिनेअभिनेत्रींनी काम करणे म्हणजे, लाटा उसळणाऱ्या समुद्रात आपली नाव सोडण्यासारखेच आहे. चित्रपटांत काम करण्याची संधी मिळते, त्याचबरोबर लाटांचे तडाखेही खावे लागतात.. यश मिळालं तर ठीक अन्यथा पुन्हा लाटांशी सामना हा करावाच लागतो.. एकदा ही अभिनयाची झिंग चढली की, ती उतरत नाही.. यामध्ये लग्न-संसाराचं वय निघून गेलेलं असतं.. जेव्हा त्या भानावर येतात तेव्हा चाळीशी गाठलेली किंवा उलटलेली असते.. मग एखाद्या बीजवराशी लग्न करुन त्या मोकळ्या होतात.. हे लग्न टिकेल की नाही याचा देखील त्यांना भरवसा नसतो..

अशाच दोन सिनेअभिनेत्रींबद्दल मला सांगायचंय.. ज्यांच्या दैवानं, सुदैवाची संधी दिली होती.. मात्र तिथं त्यांना प्रेक्षकांनी स्विकारलं नाही, अन्यथा त्या पुढील काळात, यशस्वी नायिका नक्कीच झाल्या असत्या..

अरूणा इराणीला १९७२ साली ‘बाॅम्बे टू गोवा’ चित्रपटात अमिताभ बच्चनची नायिका होण्याची संधी मिळालेली होती. त्यावेळी अमिताभ नवखा होता तर अरूणा, अनुभवी होती.. चित्रपट यशस्वी ठरला, मात्र अनेक विनोदी कलाकारांच्या गर्दीत तिच्याकडे कुणाचंही लक्ष गेलंच नाही..

तसंच पद्मा खन्नाला त्याच वर्षी अमिताभची नायिका होण्याची संधी ‘सौदागर’ चित्रपटातून मिळाली. चित्रपट अप्रतिम होता, मात्र यशस्वी ठरला नाही.. नाही तर पद्माला नायिकेच्या अनेक भूमिका चालून आल्या असत्या..

अरूणा इराणीचा जन्म १९४६ सालातील मुंबईचा. तिचे वडील पारशी व आई महाराष्ट्रीयन. भावंडात ही थोरली. इयत्ता सहावीत असतानाच आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून दिली. १९६१ साली ‘गंगा जमना’ चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. नायिकेच्या लहानपणीची भूमिका करता करता ‘उपकार’ चित्रपटापासून खरी कारकिर्द सुरु झाली.

मेहमूद सोबत विनोदी भूमिका करताना दोघांचे ट्युनिंग छान जमले. दोघांनी मिळून अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना मनमुराद हसविले.. तीनशेहून अधिक चित्रपटात सहनायिका, आई, चरित्र भूमिकांपेक्षा नृत्यांगणा म्हणून तिची संख्या सर्वात जास्त आहे.. वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी तिनं लग्न केलं. गेली अठरा वर्षे ती दूरदर्शनवरील काही मालिकांमध्ये काम करीत होती…

२००४ साली मेहमूद गेल्यानंतर, तिच्याच ‘खेल खेल में’ चित्रपटातील गाण्यांच्या ओळी प्रमाणे तिची अवस्था झालेली असेल… ‘सपना मेराऽ टूट गया.. तू न रहाऽ कुछ भी न रहा…’ कारण मेहमूदने जीवनात दोन लग्नं केली होती.. त्याची दुसरी पत्नी परदेशातील होती.. जेव्हा तिला हे समजलं, तेव्हा ती स्वतःहून त्याच्यापासून दूर गेली..

पद्मा खन्नाचा जन्म १९४९ सालातील, वाराणसीचा. तिने बिरजू महाराजांकडून नृत्याचं शास्त्रशुद्ध नृत्य शिक्षण घेतलं होतं. तिचं सिनेसृष्टीतील पदार्पण अरूणाच्याच सालातलं. मात्र तिची खरी ओळख झाली, ती ‘जाॅनी मेरा नाम’ पासून!

नंतर तिने चारशेहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या त्या डान्सरच्याच.. मात्र तिची खरी ओळख राहिली ती ‘रामायण’ मालिके मधील खलनायिका, ‘कैकयी’ म्हणूनच!!

तिच्या जीवनातील अजून एक अविस्मरणीय काम म्हणजे, पाकिजा चित्रपटात केलेली मीना कुमारीची, डमी! “पाकिजा’ हा मीना कुमारीचा अनेक वर्षे रखडलेला चित्रपट. तिच्या आजारपणामुळे ती काम करु शकत नव्हती.. तेव्हा ‘इन्ही लोगों ने..’ व ‘ठाडे रहियों..’ या गाण्याच्या चित्रीकरणात, मीना कुमारीच्या लाॅंग शाॅटमध्ये पद्मा खन्नाच आहे हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही..

पद्मा खन्नानं वयाच्या छत्तीसाव्या वर्षी जगदीश सदाना यांच्याशी लग्न केलं व पतीबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली. ‘सौदागर’ चित्रपटाचे वेळी जगदीश, असिस्टंट डायरेक्टर होते. तेव्हाच्या ओळखीचे रुपांतर, लग्नात झाले. तिला दोन मुलं आहेत. अलीकडच्या काळात तिचे पती गेले. आता ती डान्स अॅकॅडमी चालविते आहे..

जर सुदैवानं, दोघींना अमिताभ सोबत असताना यश दिलं असतं तर त्यांचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल झाला असता.. तरीदेखील आज त्या दोघीही सुखी आहेत, हे ही नसे थोडके!!

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२८-८-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..