नवीन लेखन...

लग्नांचं ‘seasoning’

लग्नांचा season सुरू आहे. त्यामुळे साहजिकच डोक्यात लग्नाळू विषय सुरू राहातात.

कुणा कुणाची लग्नं attend करता करता आसपासची next in-que मुलं-मुली आणि त्यांच्यावर focussed सर्वांच्या वधू-वर-सूचक नजरा पाहाताना हसूही येतं, आणि धास्तीही वाटू लागते. उपवर माणूस दिसलं, की करा match the pair, आणि चढवा बोहल्यावर! काय तर ही घाई! आणि ती सुद्धा त्यांचीच जास्त, ज्यांचा ह्यांच्याशी मुळ्ळी संबंध नसतो!

I can’t believe की आजही आपण लोक रंग, जाडी, उंची, आणि ‘of course’ जात, पोटजात, धर्म (हे तर सांगायला सुद्धा नको) यावरून preliminary shortlisting करतो! आपल्या आजी-आजोबांनी असं केलं असतं, तर समजू शकलो असतो. पण आमच्या आधीची पिढी अजूनही का ह्याच ageold systemsमध्ये अडकून आहे, तेच कळत नाही! म्हणजे लग्नी जोड्यामध्ये एक काळा एक गोरा न दिसणं जास्त महत्वाचं आहे, की त्या काळ्या-गोऱ्यांचं वैचारीक सांधर्म्य जुळणं जास्त महत्त्वाचं आहे? ते दोघेही घरंदाज आहेत की नाहीत, एकुलते एक आहेत किंवा नाहीत, मुलाचा पगार, उंची आणि शिक्षण मुलीपेक्षा जास्त आहे की नाही, यापेक्षा त्या दोघांना आपल्या होऊ घातलेल्या लग्नातून नक्की काय अपेक्षा आहेत, ते तरी माहिती आहे की नाही, हे तरी तपासून पाहिलं पाहीजे ना! मला सून किंवा जावई कसा पाहिजे, यापेक्षा ideal life partnersच्या एकमेकांच्या ‘adjustable levelच्या’ व्याख्यांमध्ये ते बसतात का, हे आजच्या काळात जास्त महत्वाचं आहे. एका प्रसिद्ध नाटकात म्हटल्याप्रमाणे “we must help in looking for ideal life partners for our son or daughter, and not ideal helping/earning hands for the family.”

गंमत म्हणून सांगते, माझ्या सासूबाईंना ‘गोरी आणि लांब केस असणारी’ सून हवी होती. त्यांची बिचाऱ्यांची दुसरी अपेक्षा मी पूर्ण करू शकले नाही, पण त्यामुळे आमच्या संसारावर काही वाईट परिणाम अजून तरी झाला नाहीये. या उलट अजून एक उदाहरण सांगते. माझ्या एका मित्राने त्याच्या आईने पसंत केलेल्या, आणि लग्न almost ठरत आलेल्या एका मुलीला, “हिला पु. ल. देशपांडे माहीत नाहीत!” ह्या कारणास्तव नाकारलं होतं! कित्येकांनी टर उडवलेली त्याची! पण मला विचाराल तर ज्या माणसाला ‘ते’ तिला माहीत असण्या-नसण्याने फरक पडतो, त्याने आयुष्य तिच्यासोबत, आणि तिने ह्याच्यासोबत ‘सुखाने’ कसं काय ‘share’ केलं असतं, हा मोठा प्रश्नच होता.

तर माझा प्रश्न असा आहे, की मुलींचं basic शिक्षण झालं, आणि मुलांची नोकरी दोन चार वर्षे झाली, की का बरं आईवडील अजूनही पोरांच्या लग्नाच्या मागे लागतात? कुणी लग्न करण्यासारखं भेटलं, तर स्वतःच सांगतील ते तुम्हाला! नाहीच भेटलं, नसेल interest, तर please नका मागे लागू त्यांच्या! कारण लग्न ही त्यांच्यासाठी priority नसेल, तर ‘लग्नानंतर ती आपोआप होईल’ हा गैरसमज आहे तुमचा. थोडं स्वतःच्या आयुष्याकडे बघून मग हे निर्णय घ्या. तुमच्यावर लादलेले निर्णय तुम्ही किती समाधानाने पार पाडलेत? आपलं मूल एका ठराविक वयाचं होईपर्यंत त्याला basic संस्कार, शिक्षण द्यायचं काम केलंय तुम्ही. आता त्या बळावर नोकरी, व्यवसाय, लग्न, संसार करायचा की नाही ते त्यांचं त्यांना ठरवू द्या ना! हां, ह्यात त्यांनी तुमची मदत मागीतली तर नक्की करा, पण ‘तुला कळत नाही तर आम्ही सांगतो तसं कर’ हा सल्ला देणं अत्यंत चुकीचं आहे. कारण आज घाईघाईने ‘वय वाढत चाललंय,’ ‘लोक विचारू लागलेत’ म्हणून तुम्ही लग्न लावून तर द्याल, पण उद्या ते निभावणं त्याला कठीण जाईल, तेंव्हा तुमच्याच नाकी नऊ येतील. त्यावर पुन्हा तुमचे typical सल्ले असतीलंच, की ‘हे असंच असतं’, ‘संसार म्हटला की मागे-पुढे व्हायचंच’.. पण त्या मागे-पुढेचं प्रमाण ना तो तुम्हाला समजावून देऊ शकतो, ना की तुम्हाला त्याची अगतिकता कळू शकते! काळ बदलला आहे, त्यामुळे कदाचित तुम्ही जे तोंड दाबून निभावून नेलंत, ते फक्त तुमच्यावरच्या प्रेमाखातर ढकलून नेणं, त्याला अशक्य होऊ शकतं. अशावेळी ह्या लग्न लावून दिलेल्यांना, चाललेलं धड निभावताही येत नाही, आणि आहे त्यातून बाहेर पडताही येत नाही अशी भयंकर परिस्थिती निर्माण होते.

ज्या काळात दोघांपैकी एक तरी माणूस तोंड दाबून संसार रेटून न्यायचा (तो ही एकत्रित कुटुंबात.. जिथे सोबत रडायला, किंवा entertainmentला अजून कमीतकमी चार डोकी तरी असायची!) त्यावेळची सामाजिक स्थिती, विचारसरणी, त्यांच्यापुढची challenges वेगळीच होती. इथे उठता बसता समोर राहाणार एकूण तीन किंवा चार माणसं. त्यांच्याशीही अखंड फक्त मर मरून adjustmentच करावी लागणार असेल, तर तो कोंडमारा कदाचित नाही सहन करू शकणार तुमची मुलं! आणि अजून एक घाणेरडी गोष्ट म्हणजे, घटस्फोटीत लोकांना अजूनही आपल्या देशात आणि संस्कृतीत सुसाह्य वागणूक नाही दिली जात! आयुष्यातल्या अनेक यशापयशांपैकी हा एक, असं नाही बघितलं जात त्याकडे, ही एक खेदाची बाब आहे. म्हणजे एकेकाळी तुम्ही शाळेतल्या परीक्षेत अव्वल येण्यासाठी मुलांना दामटवलं. आता त्यांच्यामागे संसार successful करून दाखवलाच पाहिजे, तो आमच्या इभ्रतीचा प्रश्न आहे वगैरे म्हणून please मागे लागू नका! सर्व बाजूंनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्यावर already खूप pressure आहेच. त्यामुळे आईवडील म्हणून कोणत्याही परिस्थितीत ‘तुझ्या निर्णयात मी तुझ्यासोबत आहे’ एवढा दिलासा देखील त्यांना खूप आधार देऊन जातो.

एक मुद्दाम सांगावंसं वाटतं. चार भिंतींच्या आत शांतपणे जे जे घडतं, आणि फेसबुक फोटोज् वर भरपूर likes मिळवतं, त्याला ‘सुखी संसार’ म्हणायचा; की एकूण सर्व हितासाठी जे विभक्त झाले, त्यांचा आपापला संसार, आपापलं आयुष्य सुखाचं झालं म्हणायचं, ह्यावर विचार झाला पाहिजे. मुळात या साऱ्या गोष्टी एका शिक्क्याने चूक नि बरोबर ठरवण्याच्या नाहीच आहेत. व्यक्ती आणि परिस्थितीनुसार बदलणाऱ्या संकल्पना आहेत या. त्यामुळे एका ठराविक वयानंतर, आपल्या मुलांचे आयुष्याबाबतचे निर्णय, त्यावर त्यांची मतं, आपण आदर करायला शिकलं पाहिजे असं वाटतं. एका गोष्टीचं मला प्रचंड हसू येतं ते म्हणजे, आपल्या मुला-मुलीचं लग्न झालं, म्हणजेच सगळं भलं झालं. का हो? माणसाच्या जीवनातला, लग्न हा एक भाग आहे फक्त. ते केलं किंवा नाही केलं त्यावरून आपल्या पाल्याचा ‘market value’ आणि पालनाचा ‘संस्कार quotient’ अजिबात कमी-जास्त होत नाही. मुलांना सक्षम बनवण्याचं मूलभूत काम पार पाडल्यावर, त्यापुढे त्यांनी आयुष्यात काय आणि कधी करायचं, ते please enforce करू नका.

माफ करा, वयापेक्षा जास्तच बोललेय आज. पण खदखदत होतं हे खूप दिवस आत.. आमच्या पिढीत बरेचजणांना असं वाटतं. पण तोंड उघडून ठामपणे बोलणार कोण?! मला तरी कुठे बोलता येतं? मग मी हे असे लिहिण्याचे घाट घालते. आपल्यांची पर्वा वाटते आपल्या सर्वांनाच. आपण सगळेच काळजी घेऊया. थोडं जुनं सोडून, थोडं नवं accept करून…

तसंही, बदलता काळ सगळ्या खऱ्या-खोट्याची उलथापालथ करतो हे एकमव सत्य. त्याला जाणतेपणाने स्वीकारायला सज्ज राहुयात..

बाकी श्रीराम समर्थ।

— प्रज्ञा वझे घारपुरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..