नवीन लेखन...

खरे सदगुरु कसे असतात व असावेत

गुरु आणि सदगुरु यातील भेद न समजल्यामुळे परमार्थात अनेक चांगले साधक वाया जातात असे दिसून येते .

विद्यागुरु , कलागुरु , मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे गुरुंचे स्थुलमनाने चार प्रकार आहेत . विद्या आणि कला शिकविणारे विद्यागुरु आणि कलागुरु होत .

या सर्व विद्या आणि कला पोट भरण्यासाठी किंवा करमणुकीसाठी असतात . विद्या अनेक कला अनेक असल्यामुळे प्रत्येक विद्येत आणि प्रत्येक कलेत गुरु वेगवेगळा असतो . परिणामी अनेक विद्या आणि अनेक कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक गुरु करणे अपरिहार्य असते.

परमार्थाच्या प्रांतात मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे प्रकार आहेत . मंत्रगुरु त्यांनाच म्हणतात जे शिष्यांना किंवा साधकांना मंत्र देतात किंवा नाम देतात आणि काही कर्मकांडात्मक गोष्टी करण्यास शिकवितात . उदाहरणार्थ – भजन-पुजन , यज्ञ-याग, जप-जाप्य , तीर्थयात्रा , व्रतवैकल्ये , उपास-तापास व ग्रंथ पोथ्यांची पारायणे करणे हे होत .

विशिष्ट मर्यादेपर्यंत हे मंत्रगुरु परमार्थाला पोषक ठरतात , हे खरे , परंतु त्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे हे मंत्रगुरु मुळीच उपयोगी पडत नाहीत ; इतकेच नव्हे तर परमार्थाचा पुढील मार्ग अशा मंत्रगुरुंच्या शिष्यांना किंवा साधकांना जवळ जवळ बंदच होतो .

मंत्रगुरुंना चिकटून राहून मोक्षगुरुकडे न जाणारे साधक शेवटपर्यत अज्ञानी व अडाणी राहून स्वतःचे अपरिमीत नुकसान करुन घेतात . हा ब्रम्हघोटाळा होण्यास एकच कारण आहे व ते म्हणजे प्रचंड प्रमाणात समाजात असलेली अंधश्रध्दा हे होय .

” गुरु केल्याशिवाय गती नाही म्हणून कोणाला तरी गुरु करुन मोकळे व्हावयाचे व एकदा तो गुरु केल्यानंतर त्याला सोडून दुसरा गुरु करणे म्हणजे महापाप ” अशी परमार्थात पडलेल्या अनेक साधकांनी स्वतःची प्रामाणिक समजूत करुन घेतलेली असते . किंबहुना अशा तऱ्हेची अंधश्रध्दा साधकांच्या ठिकाणी निर्माण करण्यात व तशी ती दृढ करण्यात तथाकथित गुरुजनांचाच सिंहाचा वाटा असतो .

या मंत्रगुरुंनाच मोक्षगुरु कल्पून त्यांनाच शेवटपर्यंत चिकटून राहणारे एकनिष्ठ साधक समाजात बहुसंख्येने आढळून येतात .

वास्तविक , सदगुरुंकडून मिळवायचे असते ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होय . या संदर्भात ज्ञानेश्वर महाराजांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे . ते सांगतात –

१) गुरु तेथे ज्ञान ।ज्ञानी आत्मदर्शन ।।
दर्शनी समाधान ।आथी जैसे ।।

२) जयासी मोक्ष व्हावा । तेणे सदगुरु सेवावा ।।

म्हणून समाधान व आत्मज्ञान मिळविण्यासाठी मोक्षगुरुकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे .

वास्तविक , मंत्रगुरु व मोक्षगुरु यातील फरक लोकांना समजणे आवश्यक आहे . मंत्रगुरुलाच मोक्षगुरु समजून चिकटून राहणे म्हणजे अडाणीपणाचे व निर्बुध्दतेचे लक्षण होय .

आपण ज्यांना सदगुरु मानतो ते जर मंत्रगुरु असतील तर अशा मंत्रगुरुंना सोडून मोक्षगुरुकडे जाण्यात पाप तर नाहीच पण महापुण्य मात्र निश्चित आहे . या सत्याची जाणीव त्यांनाच होऊ शकते , ज्यांच्या जवळ बुध्दिची प्रगल्भता असून आत्मज्ञानाची ज्यांना तहान लागलेली आहे .

याच्या उलट खोट्या पाप-पुण्याच्या कल्पनांच्या आहारी गेलेल्यांना व अंधश्रध्देला बळी पडलेल्या साधकांना मंत्रगुरुचे जन्मभर दासानुदास होऊन राहण्यापलीकडे पर्याय उरत नाही .

वास्तविक, गुरु म्हणजे सदगुरु करावयाचा असतो , तो शोभेसाठी नसून सदगती प्राप्त करुन घेण्यासाठीच व ही सदगती प्राप्त होते आत्मज्ञान प्राप्त झाल्यानेच . परंतु प्रत्यक्षात मात्र लोक गुरु करतात ते केवळ एक विधी म्हणून व अंधश्रध्देच्या आहारी जाऊन .अशा गुरुचे साधक , संप्रदायाच्या नांवाखाली स्वतःला कर्मकांडात गुंतवून घेऊन कर्मठ किंवा मठ्ठ होऊन , मरेपर्यंत नर्मदेतले गोटे होऊन राहण्यात धन्यता मानतात , ही मोठी खेदाची गोष्ट आहे .

वास्तविक, आपला व आपल्या कुळाचा उध्दार करुन घेण्यासाठीच मोक्षगुरुकडे जाऊन आत्मसाक्षात्काराचा मार्ग संपादन करणे अत्यंत आवश्यक असते .

थोडक्यात , गुरुसाठी गुरु करावयाचा नसून आत्मसाक्षात्काराचे महाभाग्य प्राप्त करुन घेऊन जन्माचे सार्थक करण्यासाठी गुरु म्हणजे सदगुरु करावयाचा असतो , याचे भान साधकांना असणे आवश्यक आहे .

या संदर्भात खऱ्या सदगुरुंचे मार्गदर्शन फार वेगळे असते , हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे . ” शहाणपण ” हे अमृत देऊन प्रपंच नेटका कसा करावयाचा हे सदगुरु शिकवितात , त्याचप्रमाणे दिव्य स्वरुपाच्या विस्मृतीरुप गाढ झोपेतून हलवून हलवून जागे करुन सतसाधकांना ते आत्मज्ञानाचा प्रसाद देतात .

जे खरे सदगुरु असतात त्यांचे कार्य फार मोठे असते . ते साधकांना नाममंत्र तर देतातच पण कर्मकांडाच्या जंजाळात न अडकविता त्यांना साधनेची विविध अंगे टप्प्याटप्प्याने शिकवित शिकवित आत्मसाक्षात्कारापर्यंतचा मार्ग दाखवितात .

समाजात निरनिराळ्या थरावरचे (Levels) साधक असतात . प्रत्येकाची कुवत , बुध्दी , ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती व क्षमता वेगवेगळी असते . या सर्वांना त्यांच्या त्यांच्या कुवती प्रमाणे योग्य ती साधना शिकवून , हे सदगुरु साधकांचा उध्दार करतात . त्याचप्रमाणे सदगुरुंवर मनापासून प्रेम करणारे एकनिष्ठ , प्रामाणिक व नम्र असे जे अधिकारी साधक असतात त्यांना दिव्य बोध व दिव्य साधना शिकवून ” आपणा सारिखे करितो तात्काळ ” असा साक्षात्काराचा सोपान दाखवितात .

जे खरे सदगुरु असतात ते या भूलोकावरचे चालते बोलते देव होत . म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात –

ते चालते ज्ञानाचे बिंब । अवयव ते सुखाचे कोंब ।।
येर माणूसपण भांब । लौकिक भागु ।।

थोडक्यात , अशा मोक्षगुरुंना – सदगुरुंना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञानाचा मार्ग शिकून घेऊन स्वतःचे शाश्वत कल्याण साधण्यातच साधकांचे खरे हित असते , याची जाणीव साधकांना होणे आवश्यक आहे

या संदर्भात एकनाथ महाराजांचे व ज्ञानेश्वर महाराजांचे खालील वचन बोधप्रद आहे –

सदगुरुविण ब्रम्हज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण ।
हे उपनिषदर्थे प्रमाण । परम निर्वाण सांगितले ।।

— सदगुरु श्री वामनराव पै 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

1 Comment on खरे सदगुरु कसे असतात व असावेत

  1. माहिती उत्तम पण मोक्ष गुरू किंवा सद्गुरू करावेत हा विचार अमान्य.ते आपणहून सत्शिष्याच्या शोधात असतात त्यामुळे तेथे फसगत होण्याचा प्रश्र्नच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..