नवीन लेखन...

सात्विक आहार का घ्यावा

ऍसिडिटी
मानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावाने ग्रासलेले आहे. प्रत्येक माणूस नोकरीधंद्याच्या निमित्ताने करिअरच्या मागे धावत आहे. असे हे छोटे-मोठे ताणतणाव, चिंता याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा यामुळे आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो.

आम्लपित्त
दीर्घकाळ पाठपुरावा करणारा आजार. भरपूर प्रमाणात तिखट – तेलकट सेवन, जास्त मद्यपान, जड जेवण, अतिचिंता व झोपेचा अभाव यामुळे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. अशा परिस्थितीत पोटात आम्ल जास्त प्रमाणात तयार झाल्याने मळमळते. याची प्रमुख लक्षणे म्हणजे मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे, तोंडाला पाणी सुटणे, तोंड आंबट व कडू वाटणे, आंबट ढेकर येणे अशी आहेत. अन्न घशाशी आल्यासारखे वाटते. कधी-कधी उलट्या होतात. दीर्घकाळ अपचन व आम्लपित्त असल्यास गॅस्ट्रिक अल्सर किंवा जठरव्रण या आजाराचे चिन्ह समजावे.

गॅस्ट्रिक अल्सर किंवा पेप्टिक अल्सर
अल्सर म्हणजेच जखम. जठराच्या आतील आवरणात जखम किंवा व्रण झाल्यास त्याला पेप्टिक अल्सर म्हणतात. हे व्रण साधारणतः अन्ननलिकेच्या खालच्या बाजूस, जठरात किंवा आतड्याच्या सुरवातीच्या भागात आढळतात. जठरामधील अन्नरसातील आम्लाचे प्रमाण जास्त वाढल्याने जठरव्रण होतो. पोटाच्या वरच्या बाजूस ठणकत राहते. याची प्रमुख कारणे म्हणजे मद्य, मिरची, मसाले, तेलकट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन, सिगारेट, तसेच मानसिक ताणतणाव. याशिवाय दात, हिरड्या, घसा, कान या ठिकाणी जंतुसंसर्ग झाला तर त्यातून तयार होणारी दूषित द्रव्ये पोटात गेल्याने त्याचा जर जठराच्या एखाद्या भागावर परिणाम झाला, तर ज्या भागावर परिणाम झालेला आहे तेथे जखमा होतात. त्यामुळेही अल्सर होतात.

अल्सरचे प्रकार
ऍक्यु्ट पेप्टिक अल्सर जठराच्या जागेवर खूप दुखते. अन्न घेताच दुखणे वाढते. मळमळते, उलटी होते. उलटी झाल्यावर बरे वाटते. जठरव्रणातून रक्तस्राव होत असेल तर रुग्णाला शौचास काळ्या रंगाची होते. कधी-कधी पोटदुखी जास्त दिवस चालू राहते. नंतर त्रास कमी होतो, पण परत थोड्या दिवसांनी सुरू होतो. जठरव्रणावर वेळेत उपचार झाले नाहीत, तर रक्ताची उलटी होते. पोटातील कळ अचानक वाढून पोट ताठ होते व आंतर्त्वचादाह किंवा पेरिटोनायटिसची लक्षणे दिसतात.

क्रॉनिक गॅस्ट्रिक अल्सर या प्रकारचा अल्सर जठरातील जुनाट जखमेमुळे होतो. या आजाराचे रुग्ण साधारणतः मध्यमवयीन असतात. मानसिक ताणतणाव याचे प्रमुख कारण आहे.

प्रमुख लक्षणे म्हणजे अपचनाचा सतत त्रास होतो. पोटात वरच्या डाव्या बाजूला दुखते. हे दुखणे जेवल्यानंतर अर्ध्या ते दोन तासांनंतर चालू होते. पोटात टोचल्यासारख्या वेदना होऊन आग होते. कधी-कधी त्या जागी जडपणा येतो व रुग्णास अशक्तपणा येतो. विश्रांती घेतल्यावर बरे वाटते. हलके अन्न पचते. मसालेदार, तेलकट पदार्थांमुळे पोटात आग होऊन उलटी होते, मळमळते. या रुग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास अधूनमधून होतो.

ड्युओडिनल अल्सर लहान आतड्याच्या सुरवातीचा भाग जठराच्या खालच्या टोकाला जोडलेला असतो. या भागात होणाऱ्या जखमेला ड्युओडिनल अल्सर म्हणतात.

खूप मानसिक ताण, शारीरिक कष्ट आणि पचायला जड आणि तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर त्रास वाढतो. जेवणानंतर पोटात दुखते, विशेषतः रात्री जास्त दुखते. या आजाराची प्रमुख कारणे “हरी‘, “वरी‘ आणि “करी.‘ “हरी‘ म्हणजे गडबड, धांदल, “वरी‘ म्हणजे सतत काळजी, चिंता आणि “करी‘ म्हणजे तिखट, मसालेदार पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे.

याची प्रमुख लक्षणे म्हणजे पोट रिकामे असताना वेदना वाढतात. पोटाच्या मध्यावर बेंबीच्या वर तीव्र वेदना होतात. जेवणानंतर तीन-चार तासांनी वेदना सुरू होतात व त्या वेळी रुग्णास भूक लागते त्यालाच “हंगर पेन्स‘ म्हणतात. रुग्णास उलटी होते.

अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारात गुद्‌द्‌वाराचा दाह होतो. यालाच इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज म्हणतात. यात रुग्णास पातळ चिकट व रक्तमिश्रित शौचास होते. 20 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळतो.

याची प्रमुख लक्षणे म्हणजे अशक्तपणा, अंगात बारीक मुरणारा ताप, वजन कमी होते, शौचाला थोडी-थोडी पण पातळ होते, पोटात कळ येऊन लालभडक रंगाचे रक्त शौचातून जाते. जुनाट रुग्णास असे खूप दिवस होत असते.

अश्या व्यक्तींनी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
मद्ययुक्त पेये, कॉफी, चहा, सिगारेट, मसालेदार पदार्थ, मिरची, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत.
जठरव्रणासाठी दूध हा एक चांगला उपाय आहे. तापवून थंड केलेले दूध थोडे-थोडे प्यायल्यास आराम वाटतो. जेवणाच्या व झोपेच्या वेळा व्यवस्थित पाळाव्यात. शारीरिक व मानसिक संपूर्ण विश्रांती घ्यावी. सात्विक आहार घ्यावा. आहार, विहार, पथ्य पाळल्यास रोगमुक्त होण्यास मदत होते. राग, चिंता, भीती यामुळे जठरव्रण वाढू शकतो. त्यामुळे मन शांत ठेवावे. वरील सर्व आजारांवर काही ठिकाणी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- सकाळ

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..