नवीन लेखन...

मीठ आणि साखर

आता तुम्ही म्हणाल की हे सारं सव्यापसव्य करणं वैज्ञानिकांना ठीक आहे हो. आम्ही कुठं असं संशोधन करायला जातो? किंवा आमची काय टाप आहे आईन्स्टाईन महाराजांची खोडी काढण्याची! शिवाय त्यांच्या विधानाबद्दल शंका घ्यायला आधी ते काय म्हणताहेत हे तर समजायला हव. तिथंच तर आमचं घोडं पेंड खातं. त्यांच्या त्या अगम्य गणितातला क्षकारही समजत नाही. खरं आहे. आपण साधी पामरं. आपल्याला त्याचा काय बोध होणार? पण वैज्ञानिक वापरत असलेली पद्धत किंवा प्रणाली वापरायची म्हणजे संशोधनच करायला हवं असं नाही. आपल्या नेहमीच्या व्यवहारातही आपण ही वृत्ती बाळगू शकतो ना. म्हणजे बघा आपण लिंबाच्या सरबतात मीठही टाकतो आणि साखरही. पण मीठ चटकन विरघळतं. चमच्यानं ते ढवळावंही लागत नाही. पण साखर मात्र तशी पटकन विरघळत नाही. तळाला जाऊन बसते. आणि तिथून तिला हटवत आपण ढवळाढवळ केली नाही तर सरबताशी फटकून वागत तशीच बसून राहते. सरबताला गोडी देण्याबाबत हात आखडता घेते. तुम्हालाही येतो ना हा अनुभव? पण मग हे असं का असा सवाल केलाहेत तुम्ही कधी आपला आपल्यालाच? मीठ आणि साखर यांच्यात असा फरक का? तरी बरं दोन्हीही पाण्यात विरघळतातच. तरीही फरक आहेच. मीठ बारीक असतं, त्याची पूडच असते. त्या मानानं साखर जाडसर असते. त्याचे कण मोठाले असतात. म्हणून तर हा फरक पडत नसावा? काढा ना शोधून. प्रयोग करा. साखरची वस्त्रगाळ पूड करा. मग अशी पिठीसाखर मीठासारखी पटकन विरघळते का बघा. ती नेहमीच्या साखरेपेक्षा चटकन विरघळते हे दिसून येईल. वाटल्यास हातात स्टॉपवॉच घेऊन किती वेळ लागतो ते मोजा. उलट नेहमीच्या मीठाऐवजी खडेमीठ घ्या आणि बघा ते चटकन विरघळतं का. ते नेहमीच्या साखरेसारखं हटवादीपणा करत असल्याचंही दिसून येईल. त्यावरून विरघळणार्‍या पदार्थाच्या कणांचा आकारमानावर त्यांच्या विरघळण्याची गती अवलंबून असते हे तुमच्या ध्यानात येईल. स्वतःच पडताळा घेतल्यावर इतर कोणीही काही सांगितलं तरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारून निरुत्तर करू शकाल.

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..