नवीन लेखन...

भालचंद्र नेमाडे : हिंदू जगण्याच्या समृद्ध अडगळीचे समर्पक उदाहरण





पूर्वपुण्याईचा लाभ घेण्याची हाव कुणाला सुटली आहे? आपल्याला ठाऊक असलेल्या गोष्टींचे भांडवल करण्याचा मोह कुणाला आवरता आला आहे? साहित्यातील प्रत्येक घाटप्रकाराला स्वतःची म्हणून काही बंधने असतात आणि समीक्षक म्हणून मान्यता पावलेल्याने तरी ती पाळावयाची असतात हे कोसल्याच्या वेष्टनात रमलेल्याला सांगणार कोण?

अहिराणीत एक छोटी गोष्ट आहे :

यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याना शेपले मुडना काटा. तो सांगे, ‘नाइभाऊ, नाइभाऊ, मना काटा काड दे. नैभाऊ, म्हने, ‘मीकाय तुना काटा काडत नै’ म्हने. ‘नै रे भाऊ’ म्हने, ‘तसे कोठे होवाल भ्ये का’ म्हने. ‘काड त खरी काटा’ म्हने. ‘मङ’ म्हने, ‘आते हट्ट धरस. काडू दे’ म्हने, ‘याना काटा काडू दे.’

तथाकथित प्रमाणभाषेत याचा अर्थ असा होतो :

एक होता सरडा. तो फिरायचा कुंपणाकुंपणावर. त्याच्या शेपटीत मोडला काटा. तो म्हणायला लागला, ‘न्हावीदादा, न्हावीदादा, माझा काटा काढून दे.’ ‘नाही बाबा’ (न्हावी) म्हणाला, ‘मी काही तुझा काटा काढत नाही’ म्हणाला. ‘नाही रे बाबा’ (सरडा) म्हणाला, ‘तसं कुठं झालंय का’ म्हणाला. ‘काढ तर खरं काटा’ म्हणाला. ‘मग’ (न्हावी) म्हणाला, ‘आता हट्ट धरतोस. काढू दे’ म्हणाला, ‘ह्याचा काटा काढू दे.’

ह्या कथेला आपण रूपककथा म्हणून पाहू : सल्डया = भालचंद्र नेमाडे. शेपटीला मोडलेला काटा = ‘कोसला’चे लक्षणीय यश. नाइभाऊ = नेमाड्यांची लेखणी (किंवा दौत-बोरू).

तीन-चतुर्थांशावर वाचूनही हिंदू या तथाकथित कादंबरीला काय सांगावयाचे आहे हे ते उमजत नाही. उमजते ते एवढेच की नेमाडेभूंकडे सांगण्यासारखे भरपूर आहे पण वादी आणि चर्‍हाटात फरक असतोच हेच खरे!

या लेखनामधून लेखकाची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, नर्म विनोदी शैली, आसपासच्या घटनांच्या कार्यकारणभावाचे नेमके आकलन मात्र स्पष्टपणे दिसून येते. नेमाड्यांच्या वाचन-आकलनाचा ज्ञानकोशीय आवाका या

लेखनाच्या परिच्छेदांमधून स्पष्ट जाणवतो पण कादंबरी म्हणूनच काय एक (न जमलेली) दीर्घकथा म्हणूनही तिच्याकडे बघवत नाही. याऐवजी रा. रा. भालचंद्र नेमाडे यांनी ‘गावगाड्यातील अलुत्यबलुत्यांची जीवनपद्धती’, ‘ग्रामसंस्कृतीमधील लैंगिक व्यवहार’, ‘गुप्तांगांचे उल्लेख असलेले शब्दप्रयोग गावागावांमधून कुणाकडून आणि कोणत्या प्रसंगी वापरले जातात’, ‘नवरा मारण्याच्या वनस्पती’, ‘न नांदणारी बायको उचलून आणण्याचे प्रकार’ अशी विद्वत्तापूर्ण टिपणे लिहून प्रसिद्ध केली असती तर किती बहारीचे झाले असते बरे!


उर्दू गझलांचा दुबार-तिबार पेरा रा. रा. नेमाड्यांनी या संहितेत अनेक ठिकाणी केला आहे. याबाबतीत बोधदाते कवी ग्रेस यांच्यानंतर नेमाड्यांचाच क्रमांक येईल. प्राचीन संस्कृतीमधील प्रतीके-प्रतिमांचा, मिथकांचा, लोकसमजुतींचा वापर जसा गोडघाट्यांनी केला आहे तसाच इथे नेमाडे करताना दिसतात. नेमाडे मोठा आवाज करणारे उत्कृष्ट समीक्षक आहेतच, ग्रेसच्या कवितांना अर्थ आहे असे त्यांना (नेमाड्यांना आणि / किंवा गोडघाट्यांना) वाटत असेल तर नेमाड्यांनी, भिऊन त्या अंधार्याक अडगळीत लपून राहिलेल्या समृद्धीकडे वळावयास हरकत नसावी.

इंग्रजीतील ए टू झेड या सर्व वर्णांचा समावेश असलेल्या A QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG या वाक्याच्या तुळणेसाठी “आंबेफळ येथील औषधांचा तज्ज्ञ जेठाभाई हा खादाड छाप इसम अक्षरशः उंटाएवढे ओझे घेऊन गाणे ऐकेल.” असे वाक्य नेमाडी प्रतिभेतून अवतरलेले आहे. (अवतरणचिन्हे माझी. नेमाड्यांच्या ह्या लेखणात कुठेही अवतरणचिन्हे नाहीत. अवतरणयोग्य काही आपण लिहिलेले नसल्याचा लेखकानेच दिलेला हा अनाहूत पुरावा आहे, असे आमचे मत आहे.) मराठीत बाराखडी नावाची व्यवस्था आहे, त्यामुळे एकूण व्यंजने (किती हे महान वैयाकरणींना अजून ठरविता आलेले नाही!) गुणिले बारा चिन्हे एवढी सगळी अक्षरे एका वाक्यात आणणे नेमाडेतरांना कधीही शक्य नसल्याचा अंदाज करता येतो. बरे ह्या वाक्यातही पहिली वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, कैक मधील पहिल्या ‘क’वरचे चिन्ह इत्यादी आहेत काय? प्रस्तुत इंग्रजी वाक्य धेडगुजरी वाटत नाही, मराठी वाक्य पुन्हा वाचून पहा. हे इंग्रजी वाक्य संगणकातील अक्षरप्रतिमा (फाँट) एका दमात दिसाव्यात म्हणून आलेले आहे. अनाठायी तुळना. कशासाठी देशीवादासाठी.

नेमाड्यांच्या लोकसाहित्याच्या अभ्यासाचा पैसही चांगला आहे. या संहितेत सांगितलेल्या गोष्टींमध्ये त्यांनी त्या अभ्यासाचा खुबीने वापरही करून घेतलेला आहे पण इमारतीचा पायाच जिथे भुसभुशीत तिथे भिंतींची दिलखेचक रंगरंगोटी काय कामाची?

‘कोसला’काराची म्हणून वाचावयास जाणारा इथे तोंडघशी पडतो, त्या जखमेवर माती टाकून जाऊ द्या कादंबरी म्हणून वाचू म्हणणार्‍याला कादंबरीसदृश काहीही आढळत नाही, येण्याआधी गाजलेली म्हणून वाचू म्हणणार्‍याला पश्चात्ताप होतो आणि भालचंद्र नेमाडे हेच हिंदू जगण्याच्या समृद्ध अडगळीचे समर्पक उदाहरण आहे असा साक्षात्कार होतो.

नेमाडे ज्याला कादंबरी समजतात अशा साहित्यप्रकारात आणखी तीन कादंबर्‍या लिहिण्याचा त्यांचा इरादा आहे असे ऐकून आहोत. त्यांनी त्या जरूर लिहाव्या पण अडगळीतील सामान अधूनमधून काढून त्यातील टाकाऊ टाकून देण्याचे आणि वापरता येण्याजोगे वापरण्याचे काम घराघरात केले जाते. ‘हिंदू’ हे लिखाण या प्रकारातही बसत नाही. साहित्यातील गचपण म्हणजे काय हे दाखवून देणारे दुर्लंघ्य उदाहरण कोसलाकारानेच घालून द्यावे हे मराठी सारस्वताचे सुर्दैव म्हणावे लागेल.


ह्या कथेला आपण रूपककथा म्हणून पाहू : सल्डया = भालचंद्र नेमाडे. शेपटीला मोडलेला काटा = ‘कोसला’चे लक्षणीय यश. नाइभाऊ = नेमाड्यांची लेखणी (किंवा दौत-बोरू).

तीन-चतुर्थांशावर वाचूनही हिंदू या तथाकथित कादंबरीला काय सांगावयाचे आहे हे ते उमजत नाही. उमजते ते एवढेच की नेमाडेभूंकडे सांगण्यासारखे भरपूर आहे पण वादी आणि चर्‍हाटात फरक असतोच हेच खरे!

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..