नवीन लेखन...

प्लॅस्टिक चलनाने समस्या सुटतील का?

 

|| हरि ॐ ||

प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे. कागदाच्या चलनी नोटा पाण्यात भिजल्याने किंवा अन्य कारणाने खराब होत असतात आणि त्यावर उपाय म्हणून प्रायोगिक तत्त्वावर १० रुपयांची प्लास्टिकची वॉटरप्रूफ नोट लवकरच बाजारात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कोची, सिमला, म्हैसूर, जयपूर व भुवनेश्‍वर या शहरांमध्ये या नोटा चलनात येणार आहेत.

प्लास्टिकच्या नोटांची छपाई करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००९ मध्येच निविदा काढली होती. प्रथमच केंद्र सरकार एकूण १०० कोटी मूल्य असलेल्या दहाच्या नोटा चलनात आणणार आहे. वॉटरप्रूफ नोटा चलनात आल्यामुळे नोटा फाटणे, ओल्या होणे असले प्रकार कमी होणार आहेत असे सरकारला वाटते. प्लास्टिकच्या नोटांमुळे बनावट नोटांचे प्रमाणही बर्‍याच अंशी कमी होण्याची शक्यता आहे. नोटांचं आयुष्य कसं वाढवता येईल या प्रश्नावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत करून अनेक पर्यायांवर विचार सध्या सुरू आहे असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येते.

बनावट नोटा हा ही देशासमोरील जटील प्रश्न आहे. सीमेपलिकडून होणारा बनावट नोटांचा पुरवठा कसा थांबवता येऊ शकतो, याबद्दलही उपाययोजना लागू करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी बांग्लादेश आणि नेपाळकडून भारताला सहकार्य मिळत असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगतात.

आपल्या देशाचे सरकार आपल्या चलनाचा सांभाळ कसा चांगल्या रीतीने करता येईल याकडे खुपच गांभीर्याने लक्ष देत आहे. चलन फुगवटा होणार नाही, चलनाचे अवमुल्यन होणार नाही, याकडे लक्ष देत आहे.

आपण रोजच्या जीवनात या चलनी नोटा कळत न कळत अयोग्य रीतीने हाताळत असतो याकडे आपले दुर्लक्ष होत आहे ह्याचे आपल्याला भान सुद्धा राहत नाही आणि म्हणून हा प्रपंच. परंतू आता तर वॉटरप्रूफ नोटा चलनात आल्यामुळे खालील गोष्टींना आळा बसेल का?

असो. आपण आपल्या दागिन्यांचे, आरोग्याचे, मुलाबाळांचे संरक्षण करतो, त्याची देखभाल करतो त्याप्रमाणेच या चलनी नोटांचीही आपल्याला या देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. पण तसे होताना दिसत नाही असे आपल्या दैनंदिन कामकाजात अनुभवास येते.

आपण कळत न कळत नोटा कशा हाताळतो ते बघू आणि आता तर प्लॅस्टिकच्या नोटा येणार आहेत मग…!

१. प्लास्टिक नोटेची मुख्य समस्या आहे ती म्हणजे पाकिटात दहा रुपयाच्या पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त नोटा कशा ठेवणार? अर्थात त्या नोटेच्या जाडीवर अवलंबून आहे!

२. सरकारी-निमसरकारी कार्यालये यांचे काही कर्मचारी व्यवहारातील पैशांची देवाण-घेवाण करताना त्या नोटा मोजताना बर्‍याच वेळा थुंकीचा उपयोग करताना दिसतात.

३. काही कॅशियर तर चक्क वेगवेगळया नोटा घेतल्यावर त्या स्वत:कडे असलेल्या नोटांत (उदा. हजार, पाचशे, शंभर, पन्नास, दहाच्या) मिसळण्या आगोदर त्यावर स्वत:जवळ असलेल्या नोटांवर आधीच्या नोटांचा आकडा खोडून किती नोटा जमा झाल्या आहेत ते समजण्यासाठी त्यावर नवीन आकडा लिहितात. समजा क्याशियरकडे ५०० च्या ७० नोटा होत्या आणि त्यात २० नोटा जमा झाल्या तर त्या आधी नोटांवर लिहिलेला आकडा खोडून ९० लिहितात आणि तेही बॉल पेनाने.

४. काहीवेळा असे दिसते की आपल्या देशाचे सुजाण नागरिक नोटांवर नावे, फोन नंबर, तर काही वेळा तर चक्क निरोप लिहिलेले असतात, तर काही वेळा बॉलपेन चालते का नाही हे बघण्यासाठी एखाद्या रफ पेपर सारखा नोटेचा उपयोग ही करण्यासाठी मागेपुढे बघत नाहीत हे खरोखर कुठेतरी थांबले पाहिजे. काही नागरिक नोटा निष्काळजीपणे हाताळतात. याला देशप्रेम नसल्याचे हे द्योतक म्हणावे का?

५. आपण देशाच्या चालनांचा असा दुरुपयोग करून अपमान करणार असू (किंबहुना श्री लक्ष्मीमातेचा हा अपमान आहे) तसेच चलनाचा आणि पर्यायाने देशाचा अपमान करत राहिलो तर हे योग्य नाही. असे ऐकण्यात येते की काही विकसित राष्ट्रात तर हा गुन्हा मानून कायदेशीररीत्या दंड केला जातो. कित्येक वेळा चलनी नोटा इतक्या घडी घालून ठेवण्यात येतात की त्या पुन्हा वापरात आल्यावर खुपच खराब होतात. मग प्लास्टिकच्या नोटा कशा घडी घालणार? काही वेळा नोटांवर रंग लागलेले असतात, मळलेल्या असतात. आज आपला देश स्वतंत्र होऊन ६० वर्षांपेक्षा जास्त वर्षे होण्यास आली तरीही नागरिकांच्या वृत्ती बदललेल्या नाहीत. हिंसक, गचाळ, आळशी, देशप्रेम नसल्याचे हे द्योतक आहे. यावरून आपल्या देशाची प्रतिमा कशी आहे हे बघितले जाते.

आता आपण वरील सर्व गोष्टींचा व्यवहारात चलनी नोटा आणि चिल्लर अयोग्य रीतीने हाताळल्यामुळे आपल्या आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो ते पाहू :-

आपण पाहतो काही बेस्टबस आणि एसटीमध्ये काही कंडक्टर नोटा व तिकिटे देताना थुंकी लावतात. पोष्टात, बँकेत, रेल्वेने तिकीट देणारे, नोटा मोजताना थुंकी लावतात. पण या सगळ्याचा परिणाम त्यांच्या व आपल्या आरोग्यावर पडणार असतो. कारण ते तिकीट किंवा नोटा याला आपली बोटे लागणार, खिशात किंवा पाकिटात ठेवणार त्या दुसर्‍या नोटांनासुद्धा त्यांचा स्पर्श झाल्याने त्याही खराब होणार. त्यांच्या थुंकीद्वारे त्यांना जर संसर्गजन्य रोग झाला असल्यास तो आपल्याला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बरेच भक्त कळत न कळत देवळांतून बाहेर पडल्यावर बाहेर बसणार्‍या भिकार्‍यांना सुटी नाणी दान म्हणून देतात, का तर पुण्य लागते म्हणून. काही श्रीमंत लोक तर नोटा वाटतात. त्या भिकार्‍यांच्या हाताला काही स्पर्शजन्य रोग झाला असेल काय जाणो, त्याच नोटा परत चलनात येतात कालांतराने कशावरून आपल्याला परत मिळणार नाहीत, आपल्या तोजोरीत जाणार नाहीत. असे दृश्य तर नेहमी आपण ट्रेनमध्ये बघतो.

काही मुला-माणसांना सुटे पैसे तोंडात घालण्याची वाईट सवय असते. त्यावेळेस न जाणो आपल्यालासुद्धा तो संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता बळावते.

तरी सर्व सुजाण भारतीय नागरिकांस नम्रपणे असे सांगावेसे वाटते की कोणीही भारतीय किंवा परदेशी नागरिक चलनी नोटांचा वरील बाबींसाठी दुरुपयोग करीत असेल तर त्याला तेथेच अटकाव करा की जेणेकरून आपण आपल्या चलनी नोटा सुंदर, सुरक्षित, स्वच्छ ठेऊ व आपल्या देशाची शान वाढवू. आपल्या बरोबरीने दुसर्‍यांचेही आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू.

येणार्‍या दिवसांत याचे गंभीर परिणाम होण्यापासून वाचायचे असेल तर प्रथम आपण आपल्यापासून खालील गोष्टींची काळजी घेऊन सुरुवात करू.

१. जेवणा आगोदर हात साबणाने धुण्याची सवय घरातील सर्वांना लावू.

२. सगळे कॅशियर व नागरिक कटाक्षाने नोटांवर लिहिण्याचे तत्काळ थांबवतील.

३. कॅश किंवा नोटा मोजल्यावर हात साबणाने स्वच्छ धुऊ.

४. क्याशियर्स थुंकी ऐवजी पाण्याचा उपयोग करतील. तसेच नोटांची काळजी घेतील.

५. नागरिक भिकार्‍यांना भीक घालण्याचे कटाक्षाने टाळतील.

तरी आशा आहे की वरील सर्व गोष्टी केल्याने देश सेवेचे व्रत अंगीकारल्याचे समाधान मिळेल. देशाच्या समाज सुधारणेत खारीचा वाटा उचलल्या सारखे वाटेल नाही का?

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..