नवीन लेखन...

पायव्याचे दगड

भल्या पहाटे फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती स्त्री होती. बोलतांना तिला भावना आवरणं कठीण जात होतं. बराच वेळ केवळ हुंदके ऐकायला आले. त्यानंतर मोठ्या प्रयासाने अगदी काही शब्दच बोलून तिने भेटण्याची वेळ ठरवली. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच येऊन ती खुर्चीवर स्थानापन्न झाली. मार्गदर्शनासाठी येणा-या व्यक्तीसाठी आपली समस्या सांगण्यास कुठून व कशी सुरुवात करावी हे एक अवघड काम असतं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली विवाहित स्त्री बराच वेळ मान खाली घालून बसली होती. बोलण्याऐवजी तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. थोड्याच वेळात ती ओक्साबोक्शी रडू लागली. स्त्रियांना तणावाच्या व्यवस्थापनाचा किती हमखास उपाय सापडलाय नाही? मला त्या तशा परिस्थितीतही तिचा हेवा वाटला. भावनांचा उद्रेक ओसरल्यानंतर ती शांत झाली. तीन वर्षांपूर्वी तिच्या राहत्या गावातल्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाशी तिचा विवाह झाला होता. पहिलं मूल होईस्तोवर ब-यापैकी चाललं होतं. त्यानंतर मात्र गाडी हळूहळू रुळावरून घसरू लागली. नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची पतीला सवय नसल्यामुळे तिला त्याच्या नाराजीचं कारण प्रयत्न करूनही कळत नव्हतं. घरात कोणत्याही प्रकारे गोंधळ न घालता त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग होत नाही हे कळल्यानंतर मात्र त्या पुरुषाचा संयम संपला. त्याचे तिच्या मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती तिला एक दिवस अचानक कळली व ती नखशिखांत हादरली आणि त्याच अवस्थेत मार्गदर्शनासाठी येऊन पोहोचली.

असे आम्ही कसे? लग्न झाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच पतीला विवाहबाह्य संबंध ठेवण्याची गरज का भासली असावी? अनैतिक संबंध समर्थनीय नसतात हे जरी खरं असलं तरी पत्नीच्या शरीरसंबंधांबाबतच्या विलक्षण थंडपणाने जर तरुण पतीला ऐन तारुण्यात विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उद्युक्त केलं तर त्यात दोष कुणाचा? टीव्हीवरील विविध मालिकांचा परिणाम अशी टीका करून या पराकोटीच्या गंभीर व अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणा-या विषयाकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करता येईल? मार्गदर्शनासाठी येणा-या विवाहित स्त्रियांच्या तोंडून ‘पतीने आमच्याशी चांगलं वागावं यातच आम्हाला समाधान वाटतं. आम्हाला शारीरिक संबंधांचं विशेष महत्त्व वाटत नाही,’ किंवा ‘लैंगिक संबंधांना जास्त महत्त्व द्यायचं नसतं,’ असे उद्गार अनेकदा ऐकायला मिळतात तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ होतो आणि समोर बसलेल्या स्त्रीच्या लवकरच उद्ध्वस्त होणा-या संसाराचं भयाण चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळू लागतं. पोटाच्या भुकेइतकीच लैंगिक भूकही अत्यंत महत्त्वाची असते हे घराघरातील आईवडील आपल्या उपवर मुलींना का सांगू शकत नाहीत? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी केवळ पतीचेच नाही तर पत्नीचेही लैंगिक समाधान होणे अत्यावश्यक आहे, हे पुरुषांना कोणी का समजावून सांगत नाही? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटून संसारात सुखी व समाधानी कसं व्हावं याचं ज्ञान उपजतच प्रत्येक स्त्री-पुरुषाला असतं तर या पृथ्वीवरील असंख्य दांपत्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले असते. पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. पत्नीने या बाबतीत चतुरपणा कसा दाखवावा हे तिला माहीत नसल्यामुळे विवाहित पुरुषांचे विवाहबाह्य संबंध मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत तर लैंगिक सुख प्राप्त करण्यात किंवा अगदी स्पष्टच बोलायचं तर ‘ओरबाडण्यात’ पुरुषप्रधान संस्कृती तमाम नव-यांच्या मदतीला धावत असल्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवणा-या असमाधानी स्त्रियांची संख्याही चिंताजनकरीत्या वाढत चालली आहे. पती-पत्नीमधील निकोप लैंगिक संबंध हे सुखी व समाधानी वैवाहिक जीवनाच्या पायव्याचे दगड असतात ही जाणीव प्रत्येक स्त्री-पुरुषाने ठेवली तर किती बरं होईल नाही?

श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..