नवीन लेखन...

नवरात्रारंभ

शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. घटस्थापना असे या दिवसाचे महत्त्व संस्कृत भाषेत सांगता येईल आणि आजपासून घट बसणार आहेत, असे मराठीत म्हणता येईल.महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी अध्यात्मगंगेच्या अमृतजलाचे घट सातशे वर्षापूर्वीच बसविले. शासदीय नवरात्रात ज्ञानेश्वरमाऊलींनी अठरा अध्यायाचे अठरा घट बसविले. ज्ञानेश्वरांचे समकालीन नामदेव महाराज यांनी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत कीर्तनाचे रंगी नाचत भावभक्तीचा अखंड नंदादीप महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात तेवत ठेवला. तो तेव्हापासून अजूनही अखंडपणे तेळाळत आहे आणि या पुढच्या काळातही तो तसाच प्रकाशमान होत राहणार आहे. नवरात्रात नवे धान्य रुजविले जाते. महाराष्ट्राच्या भूमीत नवे विचार रुजणे गेल्या कित्येक शतकांपासून अखंडपणे सुरु आहे. अनेक साधुसंतांनी, तत्त्ववेत्यांनी आणि विचारवंतांनी या महाराष्ट्र शारदेच्या मंदिराच्या गाभार्‍यात विविध विचारसुगंधाची, विविध दृष्टिकोनांच्या रंगांची मनोहर लक्षावेधी शब्दसुमने गुंफलेल्या माळाही बांधल्या. नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी एकेक माळ बांधली जाते. येथे असा हिशेब न मांडता सातत्याने अखंड माळा बांधल्या गेल्या.श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती या तिन्ही देवी त्रिगुणात्मिका मानल्या जात असल्या तरी महाकाली ही तामस गुणाची म्हणून विशेषकरुन ओळखली जाते. सत्त्व म्हणजे रज या दोन्ही गुणांबद्दल आपण विचार करु लागलो की, महालक्ष्मी ही राजस म्हणजे रजो गुणाची आणि सरस्वती ही सात्त्विक म्हणजे सत्त्व गुणाची मानली जावे असे स्वाभाविक वाटते. पण कित्येक शास्त्रकारांनी सरस्वतीला रजोगुणाची आणि लक्ष्मी सत्त्व गुणाची मानली आहे. महाकाली ही दुष्टदुर्जनांपासून संतसज्जनांचे रक्षण करते. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे तिनेह

दुष्टदुर्जनांचा नायनाट करण्यासाठी आपण पुन:पुन्हा अवतरु असे आश्वासन दिले आहे. दुरितांचे तिमिर जावो। या हेतूने प्रत्यक्ष रणांगणावर मदोन्मत्त असुरदैत्यांना यमसदनी पाठविण्यास महाकाली निरंतर सिद्ध आणि तत्पर आहे. विश्व स्वधर्मसूर्य पाहो। असा सरस्वतीचा आग्रह आहे. स्वधर्म म्हणजे काय ? त्याचे पालन कसे करावे आणि स्वधर्माच्या सूर्याचा प्रकाश दाही दिशांत पसरण्यासाठी

श्वेत

पद्मासना, शुभ्र वस्त्रांकिता अशा सरस्वती अधिक योग्य नाही काय ? स्वधर्माचरण करण्यासाठी निष्ठेइतकीच विवेकाचीही आवश्यकता असते. विवेकबुद्धीला योग्य मार्गदर्शन सरस्वतीच्या कृपेशिवाय कसे मिळणार ? ज्ञान, बुद्धी, शिक्षण हे सर्व विषय सरस्वतीच्या अधिपत्याखाली नांदणारे. योग्य काय आणि अयोग्य काय, यांचे सम्यग् ज्ञान झाल्याशिवाय अखिल विश्व स्वधर्मसूर्याने उजळून कसे निघणार ? म्हणजे विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। हे दायित्व ज्ञानाची देवता असलेल्या सरस्वतीलाच देणे अधिक योग्य होय आणि जो जें वांछिल तों तें लाहो । ज्याला जे हवे असेल, ते त्याला मिळावे, इच्छा असेल ते प्राप्त व्हावे, असे सामर्थ्य प्रदान करण्याची क्षमता देवी महालक्ष्मीवाचून दुसर्‍या कोणात आहे ? लक्ष्मीविना इहसौख्य सर्व भस्मतें असे कवींनी म्हटले आहेच.दुष्टदुर्जनांचा नायनाट करुन जीवनाचा मार्ग निष्कंटक करणारी महाकाली, यमनियम पाळून तसेच स्वकर्तव्याचे भान ठेवून स्वत:बरोबर दुसर्‍याचाही विचार करुन जगावे कसे, त्याचे अचूक मार्गदर्शन करणारी महासरस्वती आणि ऐहिक वैभव तसेच सुखसमृद्धी देणारी महालक्ष्मी या तिन्ही देवता म्हणूनच परमवंद्य आहेत. नवरात्राच्या प्रारंभदिनी आपण या त्रिगुणात्मिका देवींच्या चरणी नतमस्तक होऊया.

— ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..