नवीन लेखन...

सोसायटीमधील सदनिकेचा नॉमिनी मालक / ट्रस्टी कोण ?

संस्थेने सदनिकेचे हस्तांतरणअन्वये व्यक्तीला सभासदत्व देण्याआधी काही अडचण आल्यास कायदेशीर सल्ला घेणे नेहमी हिताचे ठरते. असेच नामनिर्देशन (Nomination), एखाद्या व्यक्तीने अशा व्यक्तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे, जी व्यक्ती असे नाव दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या नावे असलेली संपत्ती/सदनिका ताब्यात घेण्यास पात्र असेल/विश्वस्त(Trustee).

“Nomination is right to receive not to own”

नामनिर्देशित व्यक्ती शक्यतो माता/पिता, नवरा/बायको, मुलगा/मुलगी असतात. तथापि, कोणत्याही विश्वासपात्र व्यक्तीस नामनिर्देशित व्यक्ती म्हणून दाखल करता येते. मयतव्यक्तीची संपत्ती त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसदारांकडे सुपूर्द करणे हे नामनिर्देशित व्यक्तीचे कर्तव्य असते.

प्रश्न क्र. ५६) मयत सदस्य नामनिर्देशन न करता मृत्यू पावल्यास किंवा हस्तांतरणासाठी कोणतीही नामनिर्देशित व्यक्ती पुढे न आल्यास संस्थेने कोणती खबरदारी घ्यावी ? संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध वारसदाराकडे हस्तांतरित करताना संस्थेने कोणती खबरदारी घ्यावी? प्रतिज्ञापत्र करून घेणे आवश्यक आहे का? उत्तराधिकार प्रमाणपत्राची गरज केव्हा पडते?

उत्तर: एखादा सभासद नामनिर्देशन न करता मृत्यू पावल्यास किंवा हस्तांतरणासाठी कोणतीही नामनिर्देशित व्यक्ती पुढे न आल्यास, संस्था सदर सदस्याचा मृत्यूची लेखी माहिती मिळाल्यापासून सहा महिन्याच्या आत मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग किंवा हितसंबंध यांच्या नियोजित हस्तांतरणाबाबत हक्क, मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी संस्थेच्या सूचना फलकावर दर्शविलेल्या विहित नमुन्यात जाहीर नोटीस प्रदर्शित करून आवाहन करील, तसेच संस्था सदर जाहीर नोटीस जास्त खपाच्या कमीत कमी दोन स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करील. अशा नोटिशीचा प्रसिद्धीचा सर्व खर्च मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत जे भाग किंवा हितसंबंध असतील त्याच्या किमतीतून वसूल केला जाईल. सदर नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर नोटिशीच्या अनुरोधाने प्राप्त झालेल्या हक्क, मागण्या वा हरकती लक्षात घेऊन वा प्राप्त परिस्थितीत समितीस योग्य वाटेल अशी चौकशी करून समिती कोणती व्यक्ती समितीच्या मते मयत सदस्याचा वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी आहे, याबाबत निर्णय घेईल. अशी व्यक्ती उपविधी क्र. १७(अ) वा १९ मधील तरतुदींच्या अधीनतेने संस्थेचा सदस्य होण्यास पात्र राहील. परंतु अशा व्यक्तीस सदस्यत्वासाठी द्यावयाच्या विहित नमुन्यातील अर्जासोबत मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यावर कधीकाळी कोणी हक्क सांगितल्यास त्याची संस्थेस कोणत्याही प्रकारे झळ पोहोचू दिली जाणार नाही याची हमी म्हणून हानिरक्षण बंधपत्र लिहून द्यावे लागेल. एकापेक्षा अधिक हक्कदार असतील तर संस्था त्यांना त्यापैकी कोणी संस्थेचे सदस्य व्हावे या संबंधी प्रतिज्ञापत्र करण्यास सांगेल, आणि अशा प्रतिज्ञापत्रात निर्देशिलेल्या व्यक्तीने संस्थेच्या सदस्यत्वाच्या अर्जासोबत वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे हानिरक्षण बंधपत्र (इंन्डेम्निटी बॉंड) लिहून दिले पाहिजे. तथापि कोणती व्यक्ती मयत सदस्याची कायदेशीर वारसदार अगर कायदेशीर प्रतिनिधी आहे या संबंधात समिती निर्णय घेऊ शकत नसल्यास किंवा हक्कदारापैकी कोणी संस्थेचे सदस्य व्हावे या संबंधी त्यांच्यात एकमत होऊन करार होऊ शकत नसल्यास समिती त्यांना सक्षम न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर करण्यास सांगेल. तथापि कोणीही हक्कदार पुढे न आल्यास मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध संस्थेकडे निहित (vest) होतील.

प्रश्न क्र.५७) संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील मयत सदस्याचा भाग व हितसंबंध यांची किंमत नामनिर्देशित व्यक्ती एकापेक्षा आधीक असतील आणि प्रमाण नमूद केले नसल्यास अदा कराण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करावा?

उत्तर: नामनिर्देशन केलेली व्यक्ती एकच असेल व त्याने संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील मयत सदस्याच्या भागाच्या व हितसंबंधाच्या किमतीची मागणी केल्यास संस्था सदर भाग व हितसंबंध स्वतः संपादन करील व उपविधी क्र. ६४ अन्वये तरतूद करण्यात आल्याप्रमाणे येणारी रक्कम नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस अदा करील. तथापि, जर नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील व त्यांनी संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील मयत सदस्याच्या भागाच्या व हितसंबंधाच्या किमतीची मागणी केली तर संस्था सदर भाग व हितसंबंध स्वतः संपादन करील आणि वर निर्दिष्ट केलेल्या उपविधी अन्वये त्याची येणारी किंमत नामनिर्देशन पत्रात नमूद केलेल्या प्रमाणात अदा करील. नामनिर्देशनपत्रात असे प्रमाण उल्लेखिलेले नसल्यास रक्कम समप्रमाणात विभागून दिली जाईल.

– अ‍ॅड. विशाल लांजेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..