नवीन लेखन...

ज्येष्ठ लेखक बापू वाटवे

ज्येष्ठ लेखक बापू वाटवे यांचा जन्म १९२४ साली झाला.

मुरलीधर रामचंद्र ऊर्फ बापू वाटवे यांना प्रभात चित्रनगरीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. बापू वाटवेनी प्रभातची प्रसन्न सकाळ, नेत्रदीपक माध्यान्ह, हुरहूर लावणारी संध्याकाळ आणि मन विषण्ण करणारा सूर्यास्त हे सारे अनुभवले होते. बापू वाटवे यांचे मामा म्हणजे प्रभातचे एक संस्थापक विष्णुपंत दामले यांचे चिरंजीव अनंतराव होत. बापू वाटवे हे अशा वातावरणात लहानाचे मोठे झाले. प्रभातमध्ये त्यांनी सहदिग्दर्शनापासून पडेल ते काम केले. काही चित्रपटातून लहान मुलाच्या भूमिकाही केल्या. (अगदी अलीकडे ‘वास्तुपुरुष’ या चित्रपटातही त्यांचे दर्शन झाले होते.) तो काळ त्यांच्या जडणघडणीचा होता आणि मिळेल ते शिकण्याची तयारीही होती. १९३३ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा अस्त १९५२ मध्ये झाला. बापू वाटवे हे, उण्यापुऱ्या एकोणीस वर्षांच्या या कालावधीत प्रभातने केलेल्या देदीप्यमान कार्याचे सर्वसाक्षी भाष्यकार होते.

चित्रपटविषयक दर्जेदार लेखन करण्यात त्यांचा हातखंडा असला तरी त्यांनी चित्रपटनिर्मितीच्या अनेक अंगांमध्येही लीलया संचार केला होता. ‘धाकटी सून’, ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटांचे संवादलेखन, पटकथालेखन त्यांनी केले होते, तसेच ‘पहिली तारीख’, ‘गोकुळ’ आणि ‘घरचं झालं थोडं’ या चित्रपटाच्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या होत्या. सहायक दिग्दर्शक म्हणून वसंत पेंटर, राजा ठाकूर आदींकडे सहायक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.

‘एक होती प्रभातनगरी’, दादासाहेब फाळके यांचे चरित्र आणि ‘दामले-फत्तेलाल : अ बायोग्राफी’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.

राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक समितीवर त्यांनी काम केले होते. अनेक वृत्तपत्रांमध्ये, तसेच आकाशवाणीसाठीही त्यांनी लिखाण केले होते. वाईच्या विश्वकोशाच्या संपादन विभागातही त्यांनी काम केले. आकाशवाणीवर गाजलेल्या ‘वाहते वारे’ या मालिकेचे लेखन वाटवे यांनी केले होते. प्रभात हाच बापूंचा आयुष्यभराचा ध्यास असल्यामुळे आकाशवाणीवरील भाषणे असोत की जाहीर कार्यक्रम असोत, बापू वाटवे प्रभातच्या रम्य आठवणींत रमून जात.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासाठी १९८४ मध्ये बापू वाटवे यांनी विष्णुपंत दामले यांचा मोनोग्राफ तयार करून दिला. प्रभातमुळेच त्यांची देव आनंदशी मैत्री झाली. ती अखेपर्यंत राहिली. पण या मैत्रीचा त्यांनी कधी उच्चार केला नाही की त्याचे भांडवल केले नाही.

बापू वाटवे यांचे निधन ४ मार्च २००९ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..