नवीन लेखन...

प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते.

नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले.

त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.

सुस्पष्ट उच्चार,लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म.

अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील सुरूवातीची नांदी ही पंडितजींची शब्दरचना व चाल होय.

एकाच गाण्यात अनेक राग व ताल हा एक वेगळा प्रयोग त्यांनी ‘कटयार’ मधील ‘सुरत पियाकी’ या रागमालेत केलेला दिसतो. ‘घेई छंद मकरंद’ या पदासाठी दोन घराण्यातील गायन शैली तर दिग्दर्शन ही एक ईश्वरी देणगीच आहे हे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या पदावरून प्रत्ययास येते. हे पद म्हणजे नाटयसंगीतातील पसायदान होय. ‘काटा रूते कुणाला’ ‘रती रंगी’ ‘कैवल्याच्या’ ‘हे सुरांनो’ ‘हे बंध रेशमाचे’ ‘साद देती हिमशिखरे’ इ.अनेक प्रासादिक रचना त्यांनी केल्या.

पंडितजींनी ‘मत्स्यगंधा’ ते ‘महानंदा’ मराठी संगीत नाटकांचे ‘अभिषेकी युग’ त्यांनी तयार केले व गाजवले आणि मोठी क्रांती घडवून आणली. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्य प्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.

अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. पंडीतजीनी कोकणी नाटकात कामे केली होती. पं. अभिषेकी बोरकर संपादित ‘पोरजेचो आवज’ या नियतकालिकात लेखन करीत असत. ‘वैशाख वणवा’ या चित्रपटासाठी चित्रपटाचे लेखन पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या सांगण्यावरून केले होते. पंडीतजीनी ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे कोकणी नाखवा गीत गायले होते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले हे त्यांचे एकमेव चित्रपट गीत. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाते. जवळजवळ १७ नाटकांचे दिग्दर्शन केले.

पं. अभिषेकी १९७० साली पं.रविशंकर यांचे बरोबर प्रथम अमेरिकेस गेले. तेथे विद्यादानाचे काम केले. त्यामध्ये संगीत देवनागरी लीपी भारतीय भाषा हेही शिकवीले. दोन वर्षांनी स्वतंत्रपणे अमेरिकेत कार्यक्रम केले. भारतात व परदेशात पंडितजींनी अनेक संगीत मैफिली गाजविल्या.

पंडीतजी गवैये तसे खवैयेही होते. एखादी गोष्ट आवडली की ते त्याचा मनमुराद आनंद लुटत. एकदा तर त्यांनी ४० ते ५० पाणीपुर्‍या खाल्या होत्या असे सांगतात, त्यांच्यात पहेलवानी मस्तीसुद्धा होती.

१९९५ मध्ये पंडितजींनी नाटय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. ‘गोवा कला अकादमी’च्या व ‘संगीत नाटक अकादमी’च्या जनरल कौन्सिलचे ते मेंबर होते.

जितेंद्र अभिषेकी यांचे ७ नोव्हेंबर १९९८ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..