नवीन लेखन...

“अवघे धरू सुलपुंज पंथ” अर्थात सूक्ष्म व लघु उद्योग पुंज विकास कार्यक्रम

Micro, Small and Meduium Enterprises Cluster Development

भारत हा कृषीप्रधान देश असला तरी कृषी पाठोपाठ मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र – सुलम म्हणजे सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग. सुमारे ६ कोटी हून अधिक लोकांना रोजगार देणारे २ लाखांहून अधिक सुलम उद्योगांची रोजगार क्षमता लक्षात घेऊन भारत सरकारने २००६ मध्ये सुलम उद्योग विकास कायदा व त्या बरोबरच केंद्रीय स्तरावर स्वतंत्र मंत्रालय ,कॅबिनेट सचिव आणि विकास आयुक्तालय यांची निर्मिती केली.

सुलम उद्योगाचे संवर्धन ,विकास आणि स्पर्धायोग्यतेचे वर्धन यांचे सुलभीकरण करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेल्या या कायद्याच्या प्रकरण ४ मध्ये विविध उपायांचा उल्लेख केला आहे.त्यात सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी – कामगार, व्यवस्थापन आणि उद्योजक यांचा कौशल्य विकास, तंत्रज्ञान सुधार,विपणन साहाय्य तसेच पायाभूत सुविधा आणि उद्योग पुंज विकास संबंधित विविध बाबीचे सबलीकरण करण्यासाठीचे कार्यक्रम ,मार्गदर्शक तत्वे व सूचना परीपत्रके काढून सूचित करण्याचे प्रावधान आहे.

सुल (उद्योग) पुंज विकास – सूक्ष्म व लघु उद्योग क्लस्टर डेवेलोपमेंट ( MS Cluster Development ) ही यातीलच एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.या साठी स्वतंत्र सहआयुक्तांची नेमणूक केलेली आहे.एका विशिष्ट प्रकारच्या उद्योगांचा सुलपुंज करतांना पुढील निकष विचारात घेतले जातात.

१. कच्च्या मालाची खरेदी,उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण,परीक्षण, उर्जा संवर्धन, प्रदूषण नियंत्रण इ. मधील समानता
२. तंत्रज्ञान व विपणन नीती आणि पद्धतींचा स्तर
३. पुंज सभासदां मधील संचार व्यवस्था
४. सभासदांसमोरील आव्हानांमधील समानता.

उदाहरणार्थ – भिवंडीतील यंत्रमाग पुंज, धारावीतील चर्मोद्योग पुंज,कोइम्बतुर येथील इडली पीठ मळणी यंत्र उत्पादक, नासिक येथील अभियांत्रिकी पुंज,सांगली येथील द्राक्ष प्रक्रिया पुंज,पुणे येथील ऑटो पुंज इ. पुंज संकल्पनेत उपर्निर्दिष्ट बाबींमध्ये काय काय करता येईल हे चर्मोद्योगाच्या उदाहरणावरून बघता येईल.

धारावीतील अनेक चर्म उद्योजगांकडे कौशल्य आहे, पण दर्जेदार इटालीयन लेदर आयात करणे एखाद्या छोट्या उद्योगाला शक्य नसते, म्हणून या क्षेत्रातील गुंतवणूक करू शकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून त्यांना ते अवास्तव किंमतीला विकत घ्यावे लागते.बाजारपेठेत केवळ मोठ्या प्रमाणात पुरवठा करता येत नाही,म्हणून अशा रीतीने बनविलेला उत्तम माल दलालाला विकावा लागतो.महागडा कच्चा माल व व्यापाऱ्याने पाडून घेतलेली विक्री किंमत – या दोन्ही च्या कात्रीत सुल उद्योजक सापडतो .त्यामुळे त्याच्या हातात नगण्य असा नफा येतो. शिवाय व्यापारी देखील वेळच्या वेळी उधारी देत नाही त्यामुळे थकबाकी च्या दडपणाखाली पिळवणूक होते.

तयार केलेल्या मालाची गुणवत्ता तपासून, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाला पुरवायचे असेल, तर परीक्षण करण्यासाठी लागणारी विशिष्ट उपकरणे महाग असल्याने परवडत नाही. गुणवत्तेचे प्रमाणपत्र न देता आल्याने मालाला बाजारपेठ मिळत नाही. माल बनविताना काही विशिष्ट यंत्र किंवा उपकरण महागडे असते व त्याची उत्पादन क्षमता ही सुल उद्योजक साठी फार जास्त असते – म्हणून आयातही करता येत नाही.कमी क्षमतेचे उपकरण मिळतच नाही.त्यामुळे निर्यातीत चीन च्या स्पर्धेत कौशल्य असून उतरता येत नाही.

कारागिरांना एखाद्या कौशल्याचे तंत्र शिक्षण मिळाले तर दर्जेदार निर्यात योग्य माल बनवता येईल, पण एकट्याला तंत्र शिक्षणाची फी परवडू शकत नाही. पण तसे प्रशिक्षण सामुहिक रित्या घेतल्यास त्याची फी परवडू शकते.

सर्व कच्या मालाचे पुरवठेदार धारावीतच येत असल्याने, सध्याची जागा कमी पडत असली तरीही ती सोडून एकट्यालाच दूर भिवंडी, अंबरनाथ येथे जाण्याचा विचार करता येत नाही.

अशा प्रकारे सगळीकडून कोंडी झाल्याने कौशल्य व इच्छा असूनही एकट्या दुकट्या पण छोट्या उद्योजकाला विपन्नावास्थेतच राहावे लागते. अशा उद्योगासाठी पुंज योजना अत्यंत उपयोगी ठरते आहे.कमीत कमी २० ते ५० सुल उद्योगांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर SPV – Special Purpose Vehical – म्हणजेच सहकारी संस्था , धर्मादा संस्था किंवा सेवाभावी संस्था बनविल्यास व बीज भांडवल गोळा केल्यास धन दांडग्यांच्या फेर्यातून सुल उद्योगांची सुटका होऊ शकते . बँकांना प्राथमिकता क्षेत्रासाठी दिलेल्या उद्दिष्टा अंतर्गत कमी व्याजदरावर व व्यक्तिगत गोष्टी गहाण ठेवल्या शिवाय केवळ ०.७५ % इन्शुरन्स भरून एक ते दोन कोटी रुपये अर्थसहाय्य मिळू शकते.

औद्योगिक पायाभूत सुविधा (IID )योजनेखाली सुल पुंज योजने मध्ये नवीन जागी स्थलांतर करावयाचे असेल तर पायाभूत सुविधा योजनेखाली रस्ते, वीज,पाणीपुरवठा,संचार व्यवस्था, प्रदूषण नियंत्रण संयंत्र इ.पायाभूत सुविधांसाठी ६० ते ९० टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

तसेच सामायिक सुलभीकरण केंद्र (CFC – Common Facilities Center ) च्या माध्यमातून सर्वांना लागणारी उत्पादन व गुणवत्ता तपासणी साठी लागणारी विशेष यंत्र सामुग्री सामायिक पद्धत्तीने आयात करता येते व नाममात्र फी देऊन वापरता येते.

या प्रत्येक पुंजामध्ये लागणारा कच्चा माल एकच असल्यास SPV तर्फे पुंजातील सदस्यांनी एकत्रित पणे मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यास – उत्तम दर्जाबद्दल आग्रही राहूनही चांगली किंमत व उधारीवर माल मिळविता येतो. तयार मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविणे छोट्या उद्योगाला शक्य नसले तरी SPV तर्फे जाहिरात व विपणनाचे प्रयत्न केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळविता येते.

“एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ” च्या ऐवजी “अवघे धरू सुलपुंज पंथ” म्हटल्यास साखर उत्पादन क्षेत्रात सहकारानं जी जादू केली तीच जादू, पुंज योजनेतून चर्म, सौंदर्य प्रसाधन, ऑटो पूरक उद्योग, काजू प्रक्रिया, वाईन उद्योग, वस्त्रमाग,पैठणी,चादर/ सतरंजी उत्पादन इ . सर्व सुल उद्योजकांना अनुभवता येईल. क्षेत्र कुठलेही असो, गरज आहे सुल उद्योग म्हणून नोंदणी करण्याची व एकदिलान, एकत्र येऊन बीज भांडवल काढून पुंज स्थापन करण्याची. ही सर्व प्रक्रिया सुलभतेने व समयबद्ध पद्धतीने करावयाची असेल तर जिल्हा उद्योग केंद्रतील उद्योग सेतू या एक खिडकी योजनेची मदत घ्यायला हरकत नाही.

पुरुषोत्तम आगवण

Avatar
About पुरुषोत्तम आगवण 6 Articles
श्री. पुरुषोत्तम आगवण हे ठाणे येथील उद्योजक असून ते “टिसा” आणि “कोसिआ” या उद्योजकांच्या संघटनेचे सचिव आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..