नवीन लेखन...

माझी M- 80

माझी अत्यंत आवडती टू व्हिलर .पाच फुटापेक्षाही कमी उंची असलेल्यांसाठी एक वरदानच, दोन्ही पाय जमिनीला टेकवू देणारी गाडी.
…आधी माझ्याकडे ..हिरो मॅजेस्टिक.. होती. त्याची उंची कमी असल्यामुळे उतरताना सायकलसारखं उतरावं लागायचं..मग मी त्याची सीट बदलून टाकली , मला सोयिस्कर अशी कमी उंचीची , सलग एक सीट करुन टाकली, (आधी पुढची मागची दोन वेगवेगळ्या सीटस् होत्या.) आणि मग ती खूप सोयीची झाली.
…पुणे विद्यापीठात हिन्दी विभागात नुकतीच नोकरीस लागले होते, महिन्याच्या आतच विद्यापीठातच मला एक जबरदस्त अपघात झाला , (डोक्यालाच मोठी जखम , Hairline Fracture ) आणि त्यानंतर वर्षभर टू व्हिलर चालवण्यास डाॅक्टरांनी मला बंदी केली होती. डोक्याला पुन्हा मार लागू नये यासाठी खबरदारी होती.
त्या काळात माझ्या पतीने..अविनाशने ..मी पुन्हा चालवू नये म्हणून ती विकून टाकली. वर्षानंतर मी दुसरी गाडी घ्यायचा विचार करत होते..एक दिवस माझ्या एका काकांच्या बोलण्यात त्यांनी बुक केलेली M-80 विकून टाकण्यासंबंधी बोलण्यात आले..चौकशी करता ती M80 असल्याचे कळले. त्याआधी मी एका मैत्रिणीची M-50 पाहिली होती आणि ती खूप आवडली होती. मग मीच काकांची गाडी विकत घेतली. इतर अनेक गाड्यांपेक्षा ही मला सर्वात सोयिस्कर होती.
…काही दिवस घराजवळ त्याचा सराव केल्यावर मग मी ती विद्यापीठात घेऊन जाऊ लागले. तेव्हां मी रहात होते गिरीनगर, खडकवासला येथे. दिवसाला जाऊनयेऊन २५+२५ किलोमीटर अंतर करत होते. त्यावेळी सिंहगड रस्त्यावर एकही पेट्रोलपंप नव्हता , त्यामुळे जाताना आयएटी गिरीनगर येथून भरायचे किंवा पुण्याहून परतताना भरून घ्यायचे असे करावे लागत होते. माझा आधीचा रोजचा मार्ग आयएटी , शास्री रोड, लकडीपूल, जिमखाना, तेथून विद्यापीठ रस्ता ..असा होता..नंतर मला कोणीतरी एक जवळचा व सोयिस्कर मार्ग सांगितला..रवींद्र म्हात्रे पुलावरुन..अंतरात फारसा फरक पडत नसला तरी रस्ता चांगला होता….बालभारती, सिंबायोसिस वरुन विद्यापीठाकडे जाणे जास्त सोयिस्कर वाटू लागले. खडकवासला ते विद्यापीठ अंतर कापायला एक तास लागे. तरी त्यावेळी सिंहगड रस्त्यावर ट्रॅफिक लाइट वगैरे नव्हते. आजकालचा ट्रॅफिक पाहता तासापेक्षाही जास्त वेळ लागत असेल.
…ह्या गाडीवर कुठे कुठे भटकले असेन मी…
.अनेक वेळा शनिवारी दुपारी मंडईत जाऊन बरीच भाजी, फळे घेऊन , पुढे एक मागे कॅरिअरच्या दोन्ही बाजूला एक एक, शिवाय मागच्या सीटवर एक पिशवी घट्ट बांधून माझी स्वारी खडकवासलाच्या दिशेने निघायची..पुन्हा आठवडाभर भाजीच्या दुकानात जावे लागत नसे. कधी लोणच्यासाठी केर्या ..मंडईत त्या तुकडे करुनही मिळत, काम सोपं होई, फक्त घरी गेल्यावर ते तुकडे स्वच्छ धुवून कापडावर पसरुन पंखा लावून चांगले वाळवावे लागत, पाण्याचा जरा देखील अंश राहिला तर लोणचं टिकत नाही ना ….असेच आंब्याच्या मोसमात पायरी, हापूस ची खरेदी होई. कधी इतर वस्तू ही असत. आणि मग स्वतःचाच श्रमपरिहार म्हणून जवळच्याच रसवंती गृहात उसाचा रस घेऊन घरी परतणे.हे नित्याचेच झाले होते.,
…एकदा कामवालीच्या मुलीला प्रसूतीवेदना सुरु झाल्या , गिरीनगरला आतील बाजूस रिक्षा वगैरे काहीही मिळत नसे..तिला खडकवासल्याच्याच हाॅस्पिटलमध्ये जायचं होतं..आम्ही रहात होतो तेथील रस्ते चांगले असले तरी खडकाळ आणि वरखाली होते…तिची अवस्था बघून हिम्मत केली, मागच्या सीटवर तिला बसवलं आणि सेकंड गिअरमध्ये गाडी चालवून तिला त्या हाॅस्पिटलमध्ये पोचवलं..त्यानंतर जिवात जीव आला.तिची आई नंतर चालत किंवा बसने नंतर तेथे पोचली..मी पुढे माझ्या कामावर गेले..आजही आठवून एक चांगलं काम केल्याचं समाधान मिळतं.
…एकदा लोहगावला काही आवश्यक कामासाठी जाणं आवश्यक होतं, जोडीदार अविनाश बाहेरगावी मद्रासला गेलेला…खडकवासला ते लोहगाव एअर फोर्स स्टेशन त्यावेळी तासाभरात झालं होतं,..आताच्या मानाने ट्रॅफिक थोडा कमी असल्यामुळेच.
…खडकवासला भागात पाऊस जास्त असतो, असे..पावसाळ्यात मला सतत रेनकोट जवळ बाळगावा लागे. गंमत म्हणजे वडगाव धायरीनंतर तो एकदम कमी होई, ओसरत असे.,मी विद्यापीठात पोचले तरी रेनकोट ओला असे , त्यावरुन विभागात माझी चेष्टा होई..”ही बहुतेक मी पावसातून आले दाखवण्याकरिता रोज रेनकोटवर मुद्दाम पाणी ओतून येते “, असेही बोलत..हसून हसून पुरेवाट होई.
…या गाडीने मला फारसा प्राॅब्लेम दिल्याचं आठवत नाही. छोट्या गावात ही गाडी खूपच पाॅप्युलर होती. गावातील रस्त्यावर चालवण्यास खूप सोयिस्कर होती, तशी ही गाडी मोटरसायकलसारखी अधिक, टायर रुंद, तीन गिअरची गाडी , दोन्ही सीटस् खूप आरामाच्या. मागे बसणाराही अगदी आरामात असे,,डबलसीट नेणार्या अनेकांनी मला तसं सांगितलंही.
…ह्या गाडीच्या मी प्रेमातच होते. अविनाश चेष्टेने मला म्हणायचा..जाहिरात कर बजाजसाठी, ते खूष होतील .
गाडीसाठी मी बर्याच सोयी करुन घेतल्या होत्या ,सामान आणायला बरं पडायचं .
…आमची चंदीगडला बदली झाली..तेथे अविनाश कमांडिंग आॅफिसरपदी असल्यामुळे त्याला तसेच माझ्याही दिमतीला ड्रायव्हरसह स्वतंत्र चारचाकी होती. आमच्या गाड्या पडूनच रहाणार होत्या ..त्यामुळे नाईलाजाने गाड्या विकडे भाग पडले. आणि कमांडिंग आॅफिसरच्या पत्नीने स्कूटरवजा वाहन हाकणे प्रतिष्ठेच्या दृष्टिनेही ठीक नव्हते.
…पण निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाल्यावर मात्र मी पुन्हा एकदा M80 खरेदी केली आणि ४/५ वर्षे परत मनसोक्त चालवली. जवळपासची कामं करायला फार उपयोग व्हायचा. आणि अचानक सायटिका प्राॅब्लेम उद्भवला, उजवा गुडघा दुखू लागला..गाडीला किक् मारावी लागायची ..त्यामुळे गाडी चालवणं बंद ठेवावं लागलं..मी कदाचित् पुन्हा हाकेन म्हणून अविनाशने ती विकूनच टाकली ..तुला चारचाकी घेऊन देतो, पण आता टू व्हिलर नको..असं प्राॅमिसही केलं. आधी खूप वाईट वाटलं..विकण्यास खूप विरोधही केला..मग अविनाशने समजावलं तेव्हां पटलं. आणि अशा तर्हेने आमची ताटातूट झाली.
…आता या गाड्या फारशा दिसत नाहीत..बजाजने त्यांचं उत्पादन ही बंद केलं आहे.
…तरीही कधी कुणी या गाडीवर जाताना दिसलं की त्याला थांबवून ती गाडी फिरवून आणायची इच्छा झाल्याशिवाय रहावत नाही.
-देवकी वळवडे

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..