नवीन लेखन...

मलेरिया निर्मूलन आणि प्रतिबंधक आखणी

जगातील १० ९ देशांमध्ये मलेरिया नियमितपणे आढळतो . २००७ सालच्या आकडेवारीप्रमाणे ३४.७ कोटी लोकांना मलेरियाची लागण झाली होती . त्यातील ८० टक्के रुग्ण अफ्रिका खंडातील होते . उर्वरित रुग्णात ८० टक्के रोगी हे भारत म्यानमार , पाकिस्तान , बांगला देश , इंडोनेशिया या देशात आढळून आले . जगभरात ९ कोटी लोकांचा मृत्यू मलेरियाने झाला . नेहमीच अशी आकडेवारी फक्त नोंद झालेल्या रोग्यांचीच असल्याने खऱ्या संख्येचा अंदाज येत नाही .

मलेरिया – निर्मूलनाच्या डावपेचांची आखणी मुख्य तीन घटक विचारात घेऊन करावी लागते .

अ ) मलेरियाच्या परोपजीवांचा माणूस हा मुख्य बळी आहे . अशा वेळी रुग्णाला पूर्णपणे गरज असलेली सर्व तऱ्हेची औषधे देऊन रोगमुक्त करणे हे पहिले कार्य होय . त्याचबरोबर ज्यांना मलेरिया झालेला नाही त्यांचे या रोगापासून पूर्णपणे संरक्षण करणे हे तितकेच महत्त्वाचे परंतु अतिशय कठीण काम आहे .

ब ) परोपजीवांच्या Asexual व Sexual अशा दोनही अवस्थांचा समूळ नायनाट होणे आवश्यक आहे . असे केल्यास डासांच्या शरीरात शिरण्यास ते शिल्लक उरणार नाहीत . याकरिता पूर्ण औषधोपचार होण्याची आवश्यकता आहे . अर्ध्यावर मधेच औषधे सोडणे अतिशय घातक आहे . त्यातच औषधे निकामी ठरविण्याची त्यांची प्रवृत्ती दर दशकागणिक एकेका औषधांच्या गटांबरोबर नियमितपणे चालत आलेली आहे .

क ) डास ( मलेरियाचे मुख्य वाहक ) त्याची अंडी , अळी , पुपा ( कोश ) यांचा संपूर्ण नायनाट विविध पद्धतीने करणे व डासांनी माणसाला चावण्याचे मार्ग विविध उपायांनी बंद करणे हे मलेरिया निर्मूलनाच्या कामातील दोन अतिमहत्त्वाचे घटक आहेत .

प्राचीन रोमन , इजिप्शियन इतिहासात तसेच राणी क्लिओपात्राच्या महालातील अंतपुराच्या वर्णनात मच्छरदाणीचा उल्लेख , इतकेच नव्हे तर नेपोलियन युद्धावर जाताना तंबूमधील सामानात आढळलेल्या मच्छरदाण्या यावरून हे सर्व डासांच्या विरोधात असल्याचे सूचित होते

डासांच्या चावण्यापासून पूर्णपणे सुटकेचा सर्वात उत्तम व खात्रीचा उपाय म्हणजे मच्छर दाणीत ३६५ दिवस झोपणे हाच आहे . World Health Organization ने मच्छरदाणी वापरणे यास पहिल्या नंबरचा उपाय म्हणून घोषित केलेले आहे . काही मच्छरदाण्या कीटकनाशक द्रावाचा फवारा मारूनच तयार केल्या जातात . आजकाल प्रवासात घडी मोडून नेता येणाऱ्या मच्छरदाण्याही मिळतात . उदा . बर्गे यामिनी या कंपनीच्या बनविलेल्या मच्छरदाण्या होय . मच्छरदाणीतून बाहेर पडताना कोणतीही फट न राहाणे आवश्यक असते . तसेच कोठेही फाटून भोक नाही याची खबरदारी घ्यावी . जेवढी जाळी बारीक व पक्की तेवढा डासाला प्रतिबंध अधिक , मच्छरदाणीत झोपण्याची सवय करणे म्हणजे तसे पाहू गेल्यास दिव्यच असते परंतु त्याला तरणोपाय नाही . मच्छरदाणीचा उपयोग दुहेरी पद्धतीने होतो . यामुळे मूलत : मादी डासाला मनुष्याचे रक्त शोषण्यास मिळत नाही व हे मुख्य अन्नच न मिळाल्याने मादी डासाकडून अंडी टाकण्याची प्रक्रियाच थांबते व अर्थात त्यामुळे डासांची प्रजोत्पत्तीच खुंटल्याने त्यांच्या संख्येत प्रचंड घट होते . दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे मलेरियाच्या रुग्णाचे रक्त डासांना न मिळाल्याने मलेरियाचे परोपजीवी डासाच्या शरीरात शिरू शकत नाहीत . त्यामुळे परोपजीवांच्या जीवनचक्राला खीळ बसते .

मादी डासाची अंडी तुंबलेल्या पाणथळीत सर्वात जास्त प्रमाणात असतात . अशी साचलेली डबकी बनण्याची अनेक कारणे आहेत . फुटक्या काचेच्या बाटल्या , प्लॅस्टिकच्या बाटल्या व पिशव्या , मोटारी व दुचाकींचे टाकून दिलेले रबरी टायर्स अशा अनेक माध्यमातून पाण्याची डबकी तयार होतात . परंतु ह्याबरोबरच आज शहरांत तयार झालेली डासांची आगरे मुख्यत : नवीन टॉवर्सची बांधकामे , मेट्रो रेल्वे , वॉक वे ची कामे , उड्डाणपूल बांधकामे ह्या जागा आहेत . स्लॅब टाकताना , सिमेंट क्युरींग करताना २ ते ३ आठवडे साठविले जाणारे पाणी , उंच टॉवर्सच्या बांधकामापूर्वी खोलपर्यंत पायासाठी होणारी खोदाई ( जणु तो गढूळ पाण्याचा तलावच असतो ) या सर्व गोष्टींमुळे डासांसाठी जागोजागी उत्तम वसतीस्थानेच तयार होतात . या सर्व कामांच्या ठिकाणी काम करणारा मजूर वर्ग अतिशय गरीब , कुपोषणाने ग्रासलेला व बरेच मजूर हे बाहेरील प्रदेशातून आलेले असतात . जेथे मलेरियाने कायमचे ठाण मांडलेलेच असते . त्यातील बऱ्याच मजूरांना मलेरिया हा रोग आधी झालेला असतानाच कामाकरिता ते शहरात आलेले असतात . त्यातही कामाकरिता लागणारे पाणी अशा जुन्या विहिरीतून घेतलेले असते ज्यामधील पाण्यात डासांचे कायमचे वास्तव्य असते . त्यामुळे अशा बांधकामांच्या जागांमुळे हे डास व मलेरियाचे परोपजीवी या दोघांचा प्रसाद अखंडपणे शहरवासियांना मिळत असतो . या सर्व समस्येवर युद्ध पातळीवर योजना आखणे

आवश्यक आहे . पावसाळ्यात ही परिस्थिती जास्त गंभीर असते परंतु वर्षभर मलेरिया चालूच असतो . कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारे बिल्डर्स दुर्दैवाने या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देत नाहीत व हवालदील झालेले शहरवासी मुकाट्याने मलेरिया विरुद्ध लढत असतात .

सर्व इमारतींच्या बाहेरील बाजूस पाण्याचा निचरा होण्याकरिता उत्तम बांधकाम योजनेची गरज आहे . घराच्या सर्व खिडक्या व दारांना उत्तम बारीक जाळी लावून घेणे हा एकमेव उपाय आहे . याबाबतचा कायदा प्रथम अमेरिकन बिल्डर असोसिओशनवर जारी करण्यात आला होता व तो देशभर कसोशीने पाळला गेला आहे . डास घरात शिरण्याच्या वेळा संध्याकाळी ५ ते ७ व पहाटे ४ ते ६ अशा आहेत . त्यावेळात घरात शिरलेले डास लपून राहून केव्हाही चावण्यास तत्पर असतात . तेव्हा यावर बारीक जाळी लावणे हा एकमेव ठाम उपाय आहे .

पाण्यातील विरघळलेल्या विविध क्षारांच्या प्रमाणावर डासांची अंडी वाढणे वा वाढ रोखणे अवलंबून असते . पाण्यात मीठाचे प्रमाण जास्त असल्यास डासांची वाढ रोखली जाते . समुद्राचे पाणी ठराविक प्रमाणात डबक्यातील पाण्यात मिसळल्यास डासांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो . याचा उपयोग केरळ राज्यात ‘ कोचिन समुद्र पाणी ‘ वापरून डासांची वाढ रोखण्यासाठी केला गेला आहे .

डास वाढीतील पुढला टप्पा म्हणजे लार्व्हे वा अळी अवस्था यांचा नायनाट Themiphos , Fenthion या रसायनामुळे करता येतो . या रासायनिक द्रव्यामुळे अळ्या गुदमरुन मरण पावतात . काही जातीचे जलप्राणी , जिवाणू ( Bacteria ) विषाणू ( Virus ) यांचा उपयोग अळ्या नष्ट करण्यासाठी करतात . या बाबतचे नवीन शास्त्र विकसित होत आहे . Guppy , Gambusia जातीचे मासे नुकतेच वाढणारे लार्व्हे फस्त करतात . ते त्यांचे आवडीचे खाद्य असल्याने या जातीच्या माशांची वाढ करून ते विविध डबक्यांमध्ये सोडतात . Bacillus spaericus , Bacillus thuringiensis , Mermitid Nematode , Notonecid ( bug ) , Amblyospora ( protozoa ) , Coelomomyces ( Fungus ) Nuclece Polyhedron ( Virus ) , Cyclopoid ( crustacean ) असे हे विविध जलचर , जिवाणू , विषाणू लार्व्हेची वाढ रोखण्यास मदत करतात .

काही गमतीशीर अनुभवांचे किस्से खाली देत आहोत .

सरकारी फतवा व डासांची होणारी वाढ :

कच्छ हा रेताड वाळवंटाचा प्रदेश , तेथे डासांची वाढ अत्यल्प होत असे . शेतीसाठी त्या भागात दिवसा पाणीपुरवठा होत असे . डासांच्या वाढीसाठी तेथे कोणतीच गोष्ट पूरक नव्हती . पुढे विद्युतभार नियमन आले आणि सरकारने दिवसा विद्युतपुरवठा कारखान्यांसाठी व रात्रीला पाण्याचा पुरवठा शेतीला देण्यास सुरवात केली . प्रथम काही महिने शेतकरी रात्र रात्र जागून पाण्याचे नियोजन व्यवस्थित करीत . सरकारच्या धोरणात कोणताच बदल होत नव्हता . शेतकरी रात्रीच्या जागरणांना कंटाळले व त्यांनी शेतात पाणथळी तयार केली . त्यामध्ये रात्रभर पाणी भरुन वाहू लागले . आजूबाजूला चिखल व दलदल सुरू झाली . डासांचे फावले व हा हा म्हणता डासांची प्रजा प्रचंड वाढू लागली . मलेरिया होऊ लागला . एका वीज नियमनाच्या धोरणाने डासांचे मात्र फावले .

एक साधुबाबा खेड्यात रहात . त्यांच्याबद्दल अशी ग्वाही देत असत की ते उघड्यावर , सांडपाण्याजवळ जरी झोपले तरी त्यांना डास कधीही चावत नसत . या साधुबाबांचे अन्न हे विविध तऱ्हेची पाने , त्यांचा रस हेच असे . त्यांच्या शरीरामधून उर्त्सजित होणारे घटक डासांना धोकादायक असल्याने साधुबाबांच्या वाटेला ते जात नसत .

एका लहान मुलांच्या अनाथगृहातील एका विशिष्ट खोलीत राहणाऱ्या मुलांना मलेरिया होत असे . यासंबंधित कारण शोधताना एका जुनाट बाटलीतील पाण्यात पाणवेल ठेवल्याने डासांच्या अळ्या तयार झालेल्या होत्या व त्यातून डासांची फौज तयार होत असे .

डासांचा नायनाट करण्याच्या पद्धती :

डासांचा रासायनिक पद्धतीने नाश करण्याचा ओनामा D.D.T. Dichlorodiphenyltrichloroethane ) या जगप्रसिद्ध कीटकनाशकाच्या शोधापासून सुरू झाला . Paul Hermann Muller यांना १ ९ ४८ सालातील वैद्यकीय शास्त्रातील Physiology विभागाचे नोबेल पारितोषिक D.D.T. संशोधनाकरिता मिळाले होते .

१९४५ साली मलेरिया निर्मूलन हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून हाती घेणारा व्हेनेझुएला हा जगातील पहिला देश होता . तेव्हापासून जगभर D.D.T. ह्या कीटकनाशकाचा उपयोग डास निर्मूलनाकरिता राष्ट्रीय पातळीवर जोरात सुरू झाला . पहिली पंधरा वर्षे डासांची प्रजा नष्ट करण्यात जबरदस्त यश आले व मलेरियावर मात करण्याचा विजय दृष्टीक्षेपात दिसू लागला . १ ९ ५५ च्या सुमारास D.D.T. ला दाद न देणारे ( Resistant ) डास प्रथम ग्रीसमध्ये आढळले व हळूहळू जगभर ही समस्या उभी राहात गेली . D.D.T. च्या नुसत्या फवाऱ्याने सुद्धा डासांच्या घरात शिरण्याच्या पद्धतीत अडथळा येतो . रसायनाचा थोडा अंश घराच्या भिंतीवर बरेच दिवस टिकतो त्यामुळे डासांनी जरी घरात प्रवेश केला तरी त्यांची मनुष्याला चावण्याची क्षमता नाहिशी होते . याला संपर्क विषबाधा म्हणतात .

डासांना पिटाळून लावणारी विविध रसायने :

१ ) D.D.T. व Pyrethrum यांचे फवारे
२ ) Melethion ( organo phosphorus ) मैदानात , इमारतींच्या बाजूच्या मोकळ्या जागेत पसरविणे
३ ) 30 % Pyrethrum Extract
४ ) Diethyl Tolumide हे ओडोमस मधील मुख्य रसायन
५ ) Citrona मिश्रित मेणबत्या ( सोकिंग कॉईल्स )
६ ) कापराच्या ( Camphor ) वड्या मंदपणे Coil वर जळत ठेवणे . अथवा कापराच्या वड्या गार किंवा कोमट पाण्यात ठेवल्याने त्याचा वास हळूहळू खोलीत पसरतो .
७ ) कांदा फोडून पाण्यात पसरट बशीत खोलीच्या कोपऱ्यात ठेवणे
८ ) Citronella याला डास – वनस्पतीच म्हणतात . त्यापासून तयार केलेली तेल , मलमे अंगाला लावतात .
९ ) Ageratum या वनस्पतीच्या फुलातून निघणारा Coumarin हा द्राव डासांना घातक असल्याने ते या झाडापासून दूर पळतात .
१० ) Deep cantrip , Horsemint या वनस्पती घराच्या बाहेरील अंगणात लावल्यास डास घरात शिरत नाहीत .
११ ) कडुनिंबाची सुकलेली पाने जाळणे .
१२ ) गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांचा धूर करणे .
१३ ) अंगाला लावण्याची तेले युकॅलिप्टस , जर्मेनियम , लवंग , नीम , संत्रे , लिंब यांचा एकत्रित बनविलेला रस , कडुनिंब नारळ वा ऑलिव्ह तेल मिश्रण १ : ४ प्रमाणात बनविणे
१४ ) डबक्यात टाकण्याची रसायने पॅरीस ग्रीन , रॉकेल , कॉपर सल्फेट या सर्व रसायनांचा फवारा छोट्याशा यंत्राद्वारे संपूर्ण मोठ्या गावात करता येतो . फवारणीनंतर काही महिने त्यांचा प्रभाव राहू शकतो त्याला Residual Spraying effect म्हणतात .
१५ ) Bacillus Thuringiensis Variety
Israelensis ( BTI ) हे जंतूपासून निघणारे विषारी द्राव डास निर्मुलनात मुंबई महानगरपालिका वापरण्याच्या विचारात आहे . त्याबाबतची तपासणी हाफकिन इंस्टिट्युट मध्ये चालू आहे . या रसायनाकडे प्रथम डास आकर्षित होतात . नंतर त्यांच्या शरीरात ते रसायन पसरले जाते व ते डास मारले जातात . एकदा मारलेल्या फवाऱ्याचा परिणाम महिनाभर राहू शकेल असा कंपन्यांचा दावा आहे .

या सर्व रासायनिक फवाऱ्यांचे व अंगाला लावल्या जाणाऱ्या मलमांचे , तेलाचे श्वसन संस्था ( खोकला , सर्दी , दम्याचा Attack ) त्वचेवर येणारे पुरळ , लाली या सर्व प्रकारांनी मनुष्याच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार होणे तितकेच गरजेचे आहे .

डासांना मारण्यासाठी बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या रॅकेटस आलेल्या आहेत . त्याने १०० % डास मरतात परंतु अशा पद्धतीतून किती डास मारले जाणार हाही एक मोठा प्रश्न आहे .

गडद रंगाचे कपडे घालणाऱ्या व्यक्तिकडे तसेच ज्यांच्या घामामध्ये कार्बनडाय ऑक्साईड व लॅक्टिक अॅसिड यांचे प्रमाण जास्त असते अशा लोकांकडे डास हे जास्त प्रमाणात आकर्षित होतात . नैसर्गिक घटकांपासून बनविलेली मलमे लावल्याने डासांना घामामधील रासायनिक द्रव्यांचा सुगावा लागत नाही व पर्यायाने डासांना माणसाचे अस्तित्व जाणवत नाही .

डी.आर.डी.ओ. या संस्थेने मॅक्सो मिलिटरी , मेक्सो सेफ व सॉफ्टवारप अशी मलमे बनविली आहेत . या मलमांचे टिशु पेपर ही उपलब्ध आहेत . डासांना फसविणाऱ्या रेणूंचा यात वापर केला आहे . बऱ्याच मलमांचा सुवास डासांना पिटाळून लावणारा असतो .

मलेरिया नियंत्रण आखणी
सिसिली ( इटाली ) मध्ये २५०० वर्षांपूर्वी तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची डबकी बुजविण्याचे यशस्वी प्रयोग करण्यात आले होते . ( मात्र तेव्हा मलेरिया परोपजीवी – माणूस – डास यांच्या संबंधाबाबतचे काहीही ज्ञान नव्हते ) १ ९ व्या शतकात ब्रिटनमध्ये अशा तऱ्हेचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले होते . १ ९ ०१ मध्ये लाहोर ( पाकिस्तान ) जवळील मियाँमीर या गावात इंग्रज सरकारने असाच कार्यक्रम राबविला होता . परंतु त्यामध्ये फारसे यश मिळाले नव्हते . पुढे अमेरिका व युरोपियन देशात बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला . सांडपाण्याची व्यवस्था चोख झाली आणि डासांचे निर्मूलन जवळजवळ १०० % यशस्वी झाले व मलेरिया नाहीसा झाला .

१ ९ ५७ मध्ये मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाची महत्त्वाकांक्षी योजना जागतिक आरोग्य संस्थेने आखली परंतु ही योजना अफ्रिका , भारत , श्रीलंका , पाकिस्तान या देशात बऱ्याच अंशी अपयशी ठरली . काही भागांमध्ये तर साथीने थैमान घातले . तेव्हा हा कार्यक्रम वस्तुनिष्ठ असण्याची गरज भासली . यानंतर त्याची आखणी निर्मूलनाऐवजी नियंत्रण अशी करण्यात आली .

मलेरिया हा ऋतूशी निगडीत असून भारतात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान त्याचे प्रमाण सर्वात जास्त असते . १८ ते ३० सेंटीग्रेड तापमानात डासाच्या शरीरात मलेरिया परोपजीवांची व्यवस्थित वाढ होते . अति थंड व अति उष्ण हवामानात मलेरिया होण्याचे प्रमाण कमी होते . वातावरणातील आर्द्रतेचा डासाच्या अपेक्षित आयुष्यमानाशी जवळचा संबंध असतो . सापेक्ष आर्द्रता कमी असल्यास डास जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत . आर्द्रता अधिक असल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते व ते जास्त अन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात , म्हणजे ओघानेच जास्त लोकांना चावण्याचा सपाटा सुरू करतात .

साधारणपणे पावसामुळे डासांची पैदास वाढते व त्यामुळे मलेरिया होण्याचे प्रमाण तेव्हा जास्त असते . काही वेळा त्याचे साथीत रूपांतर होते . मात्र धुवाधार पावसात डासांची पैदास करणाऱ्या डबक्यांच्या जागा वाहून गेल्याने मलेरिया पसरविणाऱ्या अॅनॉफेलीस जातीचे डास या विपरीत हवामानात सहसा आढळत नाहीत .

मलेरिया नियंत्रण
१ ) डास निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे . या कामाच्या पाठीमागे सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती व पैशाचे पाठबळ यावरच निर्मूलन किती प्रभावी ठरेल हे सर्वस्वी अवलंबून आहे .

२ ) रोगाचे निदान झाल्यावर लवकरात लवकर योग्य औषधे चालू करणे .

३ ) रक्तामधील निदानाप्रमाणे योग्य औषधाची निवड

४ ) औषधांना दाद न देण्याचे परोपजीवांचे प्रमाण किती आहे यावर रोग आटोक्यात येणे अवलंबून आहे .

५ ) देशा – देशाप्रमाणे माणसांमधील प्रतिबंधकारक शक्तीची पातळी निरनिराळी असल्याने औषधांचा परिणाम सारखाच राहू शकत नाही .

६ ) औषधांच्या किमती ही गरीब देशातील जनतेसमोर गंभीर समस्या आहे . महाग किमतीच्या औषधांचा वापर करणे अशक्य असते व ती न वापरता आल्याने रोग नियंत्रणात आणणे कठीण जाते .

७ ) ज्या प्रदेशात मलेरियाचा प्रादुर्भाव नसतो तेथील प्रवासी संयोगाने मलेरिया ग्रस्त भागात गेल्यास त्याला मलेरिया होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते .

या सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा घडवून जागतिक आरोग्य संघटनेने ( W.H.O. ) मलेरिया निर्मूलन कामासाठी कार्केन पद्धतीची योजना आखलेली आहे . ज्यायोगे जगभर समान धोरण अवलंबिले जावे या दृष्टीकोनातून नियमावलीची आखणी केलेली आहे . यामुळे मलेरिया रोगाचे निर्मूलन शक्य होणार आहे .

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..