नवीन लेखन...

ठाण्याच्या मामलेदार मिसळचे लक्ष्मणमामा मुर्डेश्वर

ठाणे शहराच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी ‘मामलेदार मिसळ’ हे एक वैशिष्ट्य आहे. सामान्यांपासून ते राजकारणी व सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच झणझणीत आणि चमचमीत अशा ‘मामलेदार मिसळ’ने मोहात पाडले आहे. अर्थातच लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्या अथक मेहनतीचेच हे फळ आहे. वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी नुसता पुढे नेला नाही तर त्याला नावलौकीकही मिळवून दिला. मामलेदार मिसळला सात दशकांची लज्जतदार अशी परंपरा आहे. लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी १९४६ मध्ये तेव्हाच्या ठाणे मामलेदार कचेरीबाहेरची जागा व्यवसायासाठी शासनाकडून भाडेतत्वावर घेतली होती. तिथे त्यांनी कँटीन सुरू केले आणि अवघ्या सहा वर्षांनी म्हणजेच १९५२ मध्ये नरसिंह मुर्डेश्वर यांचे निधन झाले. त्यानंतर कँटीनची सारी जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर पडली. कँटीनमध्ये अन्य पदार्ध मिळत असले तरी मिसळ ही या कँटीनची ओळख होती. खवय्यांना त्यांच्या मागणीनुसार कमी वा जास्त तिखट मिसळ मिळू लागली आणि बघता बघता या मिसळची चव सर्वत्र पसरली. त्यातूनच या कँटीनला ‘मामलेदार मिसळ’ असे नावही पडले.

लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकमधील असले तरी हे कुटुंब ठाण्याच्या संस्कृतीत मिसळून गेले आहे. ‘मामलेदार मिसळ’ हा आज एक ब्रँड बनला आहे. या मिसळचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक ठिकाणांहून खास मिसळ खाण्यासाठी लोक ठाण्यात येतात. ठाण्यात गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशी दोन नाट्यगृहे आहेत. शिवाय अनेक मालिकांचे चित्रिकरणही ठाण्यात होते. त्यामुळे येथे कलावतांची येथे ये-जा मोठ्या प्रमाणात असते. साहजिकच ठाण्यात आल्यावर अनेक सेलिब्रिटींचे पाय आपसूक मामलेदार मिसळकडे वळतात. केवळ सेलिब्रिटीच नाहीत तर राजकारण्यांनाही मामलेदार मिसळचा मोह आवरत नाही.

नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना अधिवेशनाच्या कालावधीत एकदातरी ठाण्याच्या मामलेदार मिसळचा बेत व्हायचा असे सांगितले जाते. मिसळची घाऊक ऑर्डर असायची आणि मग मुंबईत विधानभवनाच्या कँटीनमध्ये मंत्री, आमदार आणि अधिकारी असे सर्व एकत्रितपणे मिसळचा आस्वाद घ्यायचे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चिरंजीव अमित ठाकरे व अन्य नेत्यांसह मामलेदार मिसळची चव चाखलेली आहे.

दरम्यान, लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी मिसळची चव आणि दर्जाबाबत कधीच तडजोड केली नाही. त्यामुळेच खवय्यांसोबत एक विश्वासाचं नातं जोडलं गेलं. ठाण्यात खाद्य ते मिष्टान्न विक्रेता संघ असून या संघाचे ते २७ वर्षे खजिनदार होते.

लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे १ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..