नवीन लेखन...

गरज आहे हमखास यशस्वी होण्याची

ह्या लेखाचे लेखक सुप्रसिध्द वक्ते, लेखक, प्रकाशक, व्यंगचित्रकार, नामवंत मोटिव्हेशन ट्रेनर व सक्सेस कोच आहेत !

आजच्या जगात यशस्वी होण्याची व्याख्या आणि अर्थ ह्यामध्ये व्यक्तिनुसार फरक असू शकतो. शरीराने आपण रोजच्या अत्यंत तणावग्रस्त अशा रहाटगाडग्यात अडकलेले असतो. पण व्यक्तीच्या मनात स्वत:ची अशी अनेक स्वप्नं तरळत असतात.

ती स्वप्नं पूर्ण व्हावीत ह्या आशेवर माणसं जगत असतात. पण ह्या इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत तर माणसं निराश होतात…क्वचित प्रसंगी मानसिकदृष्ट्या खचतातदेखील…’यशस्वी कसे व्हावे? ‘ हे केवळ पुस्तकं वाचून समजत नाही हे सत्य आज प्रत्येकाने स्वीकारायलाच हवं. कारण केवळ ‘पोहावे कसे?’ नावाचं पुस्तक पाठ करून पोहता येत नाही तसेच ‘यशस्वी होण्याचे मूलमंत्र’ केवळ पाठ करून आयुष्यात हवं ते मिळवता येत नाही. त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी लागते. म्हणजेच आज जर प्रत्येकाला खरी गरज कसली असेल तर ती हमखास यशस्वी होण्याची !

जगात यशस्वी होण्यापूर्वी मुळात यशाची कल्पना आपल्या मनात पक्की व सुस्पष्ट हवी. यश म्हणजे पैसा असू शकतो तर एवाद्यासाठी यश म्हणजे परीक्षेतील सर्वोच्च गुण असू शकतात. पद-प्रतिष्ठा सन्मान हेसुद्धा एखाद्यासाठी यश ठरू शकतं. स्वत:ला चांगली नोकरी मिळवणं, स्वतःचा चांगला व्यावसाय असणं हेही एखाद्यासाठी यश असू शकतं. उत्तम स्नेहसंबंध, चांगलं राहणीमान मिळवणं हेसुद्धा यश असू शकतं. जागतिक सन्मान, विश्वपर्यटन हे एखाद्यासाठी यश असू शकतं. म्हणजेच जगातील प्रत्येकाच्या यशाच्या कल्पना निरनिराळ्या असू शकतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल.

यश म्हणजे नेमकं काय? वरील सर्व गोष्टी एकाच व्यक्तीला 22/23 V 2623
एकाच आयुष्यात कदाचित मिळू शकणार नाहीत. ह्याचा अर्थ ती व्यक्ती अयशस्वी आहे, असं मुळीच नाही… म्हणून माझ्या मते ‘यशाची व्याख्या थोडी निराळी असायला हवी. आपल्याला जे हवं आहे ते ध्येय निश्चित केल्यावर ते ध्येय गाठण्याची क्षमता आपल्यात आहे ह्याची जाणीव असणं’ ही यशाची पहिली पायरी आहे. ध्येयनिश्चिती झाल्यावर त्या ध्येयापर्यंत पोहचण्याची कृती आराखडा आपल्याला तयार करता आला पाहिजे. यश हा काही अपघात नाही जादूटोणा करून एका रात्रीत यशस्वी होता येत नाही. यश हे कष्टसाध्य असतं व ते खेचून आणावं लागतं. यशाला शॉर्ट कट नसतो. यश मिळण्यामागे ज्या सबबी असतात त्या सर्व सबबींवर मात करून यश अक्षरश: खेचून आणावं लागतं. मात्र यश म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा किंवा प्रचंड मेहनत हे समीकरण आता बदललं आहे. ‘कमी वेळात, उत्तम व नियोजनबद्ध आखणीने स्मार्ट काम करून आजच्या जगात यशस्वी होता येतं.’ हे अगणित व्यक्तींनी सिद्ध करून दाखवलं आहे. जगात असामान्य व यशस्वी होण्यासाठी सध्याच्या प्रचलित शिक्षण पद्धतीचा फारसा उपयोग नाही. तुम्ही आतापर्यंत जे करत होता तेच पुढेही करत राहिलात तर तुम्हांला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होतं.

मग प्रश्न हा उरतो की, सामान्य माणसाने कठीण परिस्थितीत नेमकं करायचं तरी काय? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू इच्छिणाऱ्या प्रत्येकाकडे सर्वप्रथम आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कित्येक वेळा आजूबाजूची परिस्थिती व इतरांच्या प्रतिक्रिया – मतं ह्यामुळेच माणसं आत्मविश्वास गमावून बसतात. स्वतःविषयी गैरसमज करून घेतात. न्यूनगंडाच्या चक्रव्यूहात फसतात आणि ह्याचा दुष्परिणाम हा होतो की, ते निर्णय घेण्याचा कंटाळा करतात किंवा निर्णय घेताना गांगरतात. ‘मी अमुक एक निर्णय घेतलाय तो चुकीचा तर ठरणार नाही ना?’ ह्या काळजीत स्वत:चा प्रचंड वेळ फुकट घालवतात. म्हणून सर्वप्रथम स्वतः चा आत्मविश्वास टिकवणं व तो वाढवणं गरजेचं आहे.

मोबाईल फोन दुकानातून आणल्यावर काही तासांतच त्याची बॅटरी डिसचार्ज होते. तो फोन सतत चालू राहावा ह्यासाठी आपण दररोज रात्री चार्जरच्या मदतीने त्या हॅन्डसेटमधली बॅटरी चार्ज करतो. अगदी त्याच प्रकारे आपल्यामधील आत्मविश्वास सतत कायम राहील ह्याची काळजी घ्यायला हवी. आत्मविश्वास टिकवणं ही कायम चालू राहण्याची प्रक्रिया आहे. लोकांच्या वाईट प्रतिक्रियांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ न देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

यशस्वी होण्याचा दुसरा टप्पा म्हणजे उद्दीष्ट ठरवणं. ह्याला इंग्रजीत Goal setting म्हणतात. आपल्याला काय हवं, कधी हवं, किती हवं हे ठरवता येणं गरजेचं आहे. आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते खरंच गाठता येण्याजोगं आहे काय, म्हणजेच ते वास्तव आहे काय, ह्याचाही विचार करावा. स्वप्नं जरूर पाहावीत पण ती अवाजवी नसावीत. ती ध्येयात रूपांतरित होण्यासारखी हवीत. ती आपल्या ज्ञानाच्या, अनुभवविश्वाच्या व आवडीच्या जवळपास वावरणारीच असावीत. वयाच्या ७५ व्या वर्षी जर एखाद्याने ‘हिंदी चित्रपटातील प्रेमकथांचा नायक म्हणूनच काम करीन’ असं स्वप्न बाळगलं तर ते वास्तवात कधी उतरेल काय? मात्र प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला चित्रपटात चरित्रनायकाची, आजोबाची भूमिका मिळू शकेल. म्हणून आपल्या मर्यादांची जाणीव ठेवूनच प्रयत्न करत राहायला हवेत.

हे करत असताना थोडी फार जोखीम घ्यायला हवी. हा टप्पा धाडसाचा असतो. बहतेकांना कम्फर्ट झोनमध्ये- सुरक्षित वर्तुळातच जगणं आवडतं. अति सुरक्षितता आणि मर्यादित उत्पन्नात समाधान मानणाऱ्या व्यक्ती फारशा यशस्वी होताना आढळत नाहीत. आपण किती जोखीम उचलू शकतो ह्याचा अंदाज घेऊन धाडसाने आपले ध्येय ठरवावं. एकदम फार मोठी उडी घेण्याऐवजी छोटे-छोटे टप्पे ठरवावेत आणि यशाच्या मार्गावर वाटचाल सुरू ठेवावी.

ही वाटचाल अखंड हवी. म्हणजे तिच्यात सातत्य हवं. चिकाटीने ध्येयापर्यंत पोहचण्याचा हा प्रवास नियमितपणे डायरीत नोंदवून ठेवावा. त्यामुळे अडचणींची कल्पना येते. मार्ग चुकत असेल तर त्यात बदल करण्याचा निर्णय घेता येतो. एकदा ठरवलेलं ध्येय बदलायचं नाही हा निश्चय कायम टिकवावा. ठरवलेल्या ध्येयासोबत काळानुसार आणखी बदल घडवून आणखी ध्येयांची जोड द्यायला हरकत नाही. कृती आराखडा आखता आला तरच तुम्ही नव्या ध्येयासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यात जोडू शकता. आपलं ध्येय सतत डोळ्यांसमोर असलं पाहिजे. त्यापासून विचलित करणारी मोहमयी गोष्ट जरी समोर आली तरी प्रयत्नाने तिकडे दुर्लक्ष करावं. म्हणजेच यशस्वी होण्यासाठी ध्यास घेणं आवश्यक ठरतं. तुमचं ध्येय तुमच्या नसानसात इतकं भिनलं पाहिजे की, ते ध्येय प्राप्त केल्याशिवाय मी जगूच शकणार नाही असं वारंवार स्वत:च्या मनाला बजावायला पाहिजे.

तुम्ही कोणत्या घरात जन्मला, कसे दिसता, तुमच्या आईवडिलांचं रंग-रूप जात काय आहे ह्या गोष्टी कधीच महत्त्वाच्या नसतात. तुम्हांला काय मिळवायचं आहे, ते किती लवकर मिळवायचं आहे हे ठरवणं सर्वात अधिक महत्त्वाचं आहे.

तुमच्या यशाच्या वाटचालीत अनेकांचा सल्ला, मार्गदर्शन जरूर घ्या. यशस्वी लोकांना भेटा. त्यांच्याशी ओळखी वाढवा. चर्चा करा. तुमच्या ध्येयाबाबत येणाऱ्या अडचणी कशा दूर होतील ह्यासाठी त्यांची मदत घ्या. ह्या पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्वयंसूचना. मी ठरवलेलं ध्येय मी लवकरच गाठत आहे, माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच घडत आहे असं मनाला वारंवार ऐकवत जा. घरात भिंतीवर आपल्या ध्येयाचं कल्पनाचित्र जरूर लावा. आपल्याला जे हवं आहे ते आताच मिळतंय असा विचार करून वागायलाही लागा. तुम्हाला हे थोडंसं हास्यास्पद वाटलं तरी त्यावर विश्वास ठेवा.

यशाची इच्छा कायम धगधगती ठेवणाऱ्या व्यक्तीच यशस्वी होतात. हा यशाचा नियम आहे. फालतू गप्पा, चहाड्या, मोबाईलवरून प्रदीर्घ गप्पा, निरर्थक चित्रपट व टी. व्ही. मालिका पाहणं, कल्पनारम्य फालतू कथा-कादंबऱ्या वाचणं काही काळ थांबवा. यशोगाथांचं वाचन करा. तुम्हांला प्रोत्साहन देतील अशाच व्यक्तींच्या संपर्कात राहा. नवनिर्मितीचा ध्यास ठेवा. भरपूर वाचन करा. नोंदी काढा. इतरांच्या चुकांपासून शिका. उत्तम कार्यशाळांमध्ये भाग घ्या.

आज अनेक संधी तुमच्या घराचा दरवाजा ठोठावत आहेत. दार उघडा. यशाला तुमच्या आयुष्यात शिरण्याची संधी द्या. मग यश तुमचंच असेल !!

-विवेक मेहेत्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..