नवीन लेखन...

भिती – एक भयंकर गोष्ट

भिती माणसांच्या विचारांमध्ये असते, ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. भितीग्रस्त माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट सर्वात मोठी समजतो, ज्या गोष्टीला तो घाबरत नाही त्या गोष्टीला तो तुच्छ समजतो. भितीग्रस्त माणूस ज्याची भिती वाटते अशा गोष्टींच्या सूचना अंमलात आणतो, भीतीदायक माणसांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीची भीती वाटत नाही त्यांना अक्षरशः नजरअंदाज करतो.

थोडक्यात भितीग्रस्त माणूस शत्रूला जवळ करतो आणि मित्रांना दूर लोटतो, त्याच्या भितीला जो खरे मानतो त्या व्यक्तीला तो जवळचा मानतो आणि भीतीच्या गर्तेत कोसळत जातो. मी लहान असताना आमच्या जवळ एक काकू रहात होत्या. त्यांचा नवरा खूप संशयी होता.
अनेकदा तो बाहेर जाताना घराला बाहेरून कुलूप लावून जात असे. त्या काकू सतत खूप भितीग्रस्त असायच्या, तुला खाऊ हवा का? असे मला विचारताना सुद्धा त्या आवाज न करता फक्त घशातून हवा सोडून विचारत असत. काकांची चाहूल लागली रे लागली की त्या अस्वस्थ होत असत.

काका तुम्हाला कोंडून का ठेवतात? मी अतिशय निरागसपणे त्यांना विचारत असे, काकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे, असे त्या मला सांगत असत, पण त्यांचे ते उत्तर मला पटत नव्हते. एक दिवस मी त्यांना स्पष्टच सांगितले, काकू, तुम्ही चुकीचं सांगता, काकांना तुम्ही निघून जाल, अशी भिती वाटते म्हणून ते कुलूप लावतात. काकाच भित्रे आहेत. त्यानंतर काकू खूप हसल्याचे मी पहिल्यांदाच बघितले होते.
भिती अनेक प्रकारची असते, धार्मिक भीती, अनैतिकतेची भीती, बेकायदेशीर कृत्य होण्याची भीती, नवख्या माणसाची, नवीन घटनेची भीती, अंधाराची भीती, उंचीची भीती, अघटीत घटना घडण्याची भीती, मृत्यूची भीती,अनामिक भीती.

भितीग्रस्त माणसाला आणखी भितीग्रस्त करून त्याला अनेकजण आपल्या मनासारखे निर्णय घेण्यासाठी भाग पाडतात. धार्मिक भीती आणि अनैतिकतेची भीती, समाजाने तयार केलेली भीती आहे, डावा पाय पुढे पडला म्हणून भीती, डोळा लवला म्हणून भीती, अपशकुनाची भीती, अशी भीती माणसाला निष्क्रीय बनवते. एखाद्या मुलाची किंवा मुलीची आठवण येणे म्हणजे अनैतिक, मनामध्ये लग्नाचे विचार येणे म्हणजे पाप, एखादी स्त्री किंवा पुरुष आवडणे म्हणजे महापाप, मनात रोमँटिक विचार येणे अनैतिक, हसणे म्हणजे अनैतिक, अशा भन्नाट भीती बाळगून अनेकजण स्वतःचेच खच्चीकरण करून घेत असतात.

त्यांनी ज्या ज्या गोष्टी अनैतिक असे मनावर ठसवलेले असते, त्याच गोष्टी त्यांच्या मनात सर्वात प्रथम पुढे येतात आणि ते स्वतःला अधिकाधिक पापी आणि अनैतिक समजत जातात. असे लोक अनेक उपाय धार्मिक तोडगे, उपास तापास, करून पापक्षालन करण्याच्या मागे असतात. त्यातून ते अनैतिक विचार आणिकाणिक दृढच करीत असतात. मी लहान असताना मला एक स्वप्नं पडले होते, मी जंगलात हरवलो आहे आणि एक वाघ माझ्या अंगावर आला आहे, त्या वाघाच्या पाठीवर एक माणूस बसलेला आहे. मी खूप घाबरलो, जंगलात आतमध्ये पळत सुटलो, तसा तो माणूस जोरजोरात हसायला लागला, त्याने मला थांबवले आणि विचारले, तू नक्की कशाला घाबरतो आहेस? तू मला घाबरत असलास तर मी तुला माझी नाही तर वाघाची भीती दाखवतो आहे, तू वाघाला घाबरत असलास तर त्याने त्याची अक्कल कधीच माझ्याकडे गहाण ठेवलेली आहे, गुलामाला कधी कोण घाबरतो का? अगोदर, तुला नक्की कशाला घाबरायचे आहे ते तू ठरव आणि मगच घाबरून पळ काढ. आपण नक्की कशाला घाबरतो आहोत, याचा विचार भितीग्रस्त लोकांनी करणे आवश्यक असते.

अनेकदा एक भितीग्रस्त माणूस आक्रस्ताळेपणा करून इमोशनल ब्लॅकमेल करून दुसऱ्या व्यक्तीला घाबरवून टाकत असतो.
वास्तविक आक्रस्ताळेपणा करणारी व्यक्तीच खरोखरीची भितीग्रस्त असते, त्याच्या आक्रस्ताळेपणाला भिक घालणे म्हणजे त्याची भिती कुरवाळत बसणेच असते. भितीग्रस्त माणसे आपली भिती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्याने भिती आणखीनच वाढत जाते.
भितीला अंधार आवडतो, लपूनछपून त्रास देण्यात तिला मजा वाटते. आपली भिती चव्हाट्यावर आणली की ती आपोआपच नष्ट होते.
माझ्या एका मैत्रिणीने भीती घालविण्याचा अभिनव मार्ग पत्करला होता.

तिचा नवरा दारू पीत असे, तो संशयीही होता आणि तिला कधीतरी थोडीफार मारहाण करायचा. थोडे वर्ष तिने ते सहन केले, पुढे तिने एक अफलातून आयडिया काढली. नवरा दारू प्यायला की ती पोलीस चौकीत फोन करून मारझोड केल्याची तक्रार करीत असे.
त्या बिचाऱ्याची भंबेरी उडत असे, अहो मी काहिही केलं नाही, असे तो हातपाय जोडून पोलिसांना सांगायचा, पण दारुड्यावर पोलीस कसे काय विश्वास ठेवणार? तो आख्खी रात्र चौकीत काढून सकाळी घरी यायचा. असं चार सहा वेळेला झाल्यावर त्याचा सर्व संशय त्याची दारू त्याचा राग सगळाच फिटला. आता ती सुखाने संसार करते आहे. भितीचा काटा काढणे आवश्यकच आहे, मग ती स्वतःच्या मनातली असो किंवा आपल्याला छळणारी दुसऱ्याच्या मनातली असो, भीती वाईटच असते.

विनय भालेराव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..