नवीन लेखन...

एव्हरग्रीन व्हिलन डॅनी डेन्ग्झोपा

सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा आवाज आणि पावरफुल स्क्रिन प्रेझेंस या जोरावर या खलनायकाने अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारलाही रुपेरी पडद्यावर तगडी टक्कर दिली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ रोजी सिक्किममध्ये झाला.अग्निपथचा कांचा चीना, मेरे अपनेमधला सडकछाप संजू, धुंदमधला अपंग तरीही क्रूर पती, हममधला बख्तावर, क्रांतीवीरचा चतुर सिंग चीता किंवा मग कातिया…या खलनायकाचे निर्दयी आणि बेदरकार हावभाव आणि डोळ्यातला अंगार समोरच्याचा थरकाप उडवणारा..हा तो व्हिलन आहे ज्याच्या हुकुमशाहीत ‘हर गलती की सजा मौत है’…
डॅंनींचा पडद्यावरचा खतरनाक असला तरीही त्यांच्यामध्ये एक सोफॅस्टिकेशन आणि डिग्निटी आहे. त्यांच्या कमांडिंग पर्सनॅलिटीमुळे त्यांच्या भूमिका नेहमीच लार्जर दॅन लाइफ वाटल्या.
डॅनी डेन्ग्झोपा यांना घोडेस्वारीची आवड होती. त्यांचं कुटुंब घोडे पालनाच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांची घोडेस्वारीची आवड जोपासली गेली. डॅनी यांना खरंतर भारतीय सैन्यदलात सहभागी व्हायचं होतं. पश्चिम बंगालमधून बेस्ट कॅडेट म्हणून निवड होऊन त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही सहभाग घेतला होता. पण त्यावेळी चीनसोबतच्या युद्धाच्या काळात अनेक जवान शहिद झाले. हे पाहून डॅनी यांची आई घाबरुन गेली. अखेर आईच्या सांगण्यावरुन डॅनींनी सैन्यात जाण्याचा निर्णय बदलला आणि पुण्यातल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. सिक्किमसारख्या प्रदेशातून पुण्यातल्या एफटीआयआयमध्ये आलेल्या डॅनींसाठी हा काळ उदासीचा होता. गुरखा, चायनीज, नेपाळी किंवा चिंकी अशा अनेक कुचकट कमेंट्सना त्यांना सामोर जावं लागलं. कॅम्पसमध्ये अनेकदा त्यांची खिल्ली उडवली जायची. अशा वातावरणात टिकून राहाणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. डॅनी डेन्ग्झोपा यांचे मूळ नाव त्शेरींग फिन्सो डेंग्झाँप्पा या नावाने त्यांना पुकारणं अनेकांना जमत नसे. त्यावरुन त्यांची चेष्टाही होऊ लागली. तेव्हा एफटीआयआयमध्ये त्यांचे जिच्याशी मैत्रीचे बंध जुळले त्या जया बच्चन यांनी डॅनींना नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बदललेलं नावच पुढे त्यांची ओळख बनून राहिलं. डॅनींना सहजासहजी काम मिळू शकत नव्हतं. त्याकाळी बनत असलेल्या फॅमिली ड्रामांमध्ये डॅनी फिट होत नव्हते. ‘ना तू वडिलांसारखा दिसतोस, ना भावासारखा. त्यामुळे केवळ नोकराचे रोल मिळतील’ असंही त्यांना ऐकवलं गेलं. बोलणारे खूप काही बोलायचे पण डॅनींना स्वत:वर आणि स्वत:च्या मेहनतीवर विश्वास होता. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्येही ते टिकून राहिले. डॅनींना हिरोच्या रोलमध्ये रस नव्हता कारण हिरोला नाच गाणं तर करावंच लागे. त्यामुळे डॅनी अँटी हिरो भूमिकांकडे वळले. मेहनतीशिवाय लक मिळणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे एफटीआयआयमध्ये असताना डॅनी यांनी हिंदी भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.
१९७० मध्ये काही सिनेमात त्यांनी छोट्या भूमिका केल्या. पण ‘लहू दे दो रंग’नंतर खऱ्या अर्थाने त्यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या. डॅनी यांनी बी आर इशरांच्या ‘जरूरत’ या बी ग्रेड सिनेमातून सुरुवात केली. त्यानंतर गुलजार यांच्या ‘मेरे अपने’मधून डॅनी यांना मेजर ब्रेक मिळाला. ही फिल्म करण्याचं आणखी एक कारण म्हणजे अभिनेत्री मीनाकुमारी. मीनाकुमारी या डॅनी यांची फेवरेट नायिका होती. ‘तू तो मेरा असली बच्चा है, तेरी नाक बिलकूल मेरे जैसी है’..मीनाकुमारी यांचे हे आपुलकीचे शब्द डॅनींना खूप धीर देणारे होते. मेरे अपनेनंतरची डॅनी यांच्या करिअरमधली आणखी एक महत्त्वाची फिल्म ठरली धुंद. फिल्ममधला निष्ठूर आणि निर्दयी नवरा डॅनींनी खुबीने साकारला.
‘चोर मचाए शोर’, ‘खोटे सिक्के’, ‘काला सोना’ अशा सिनेमात त्यांनी यादगार भूमिका साकारल्या. खलनायकाच्या भूमिकेत ‘अंदर बाहर’, ‘आंधी तूफान’, ‘भगवान दादा’, ‘अग्निपथ’, ‘हम’, ‘घातक’, ‘क्रांतीवीर’ अशा अनेक सिनेमांमध्ये डॅनींनी अमिताभ, धमेंद्र ते सनी देओलपर्यंतच्या नायकांना शह दिला.
‘अग्निपथ’मधला कांचा चीना किंवा ‘घातक’मधला कातिया यांच्या क्रूरपणा आणि निर्दयतेने प्रेक्षकांचा थरकाप उडवला. हिरोइतकाच भाव खाऊन गेला डॅनींना साकारलेला व्हिलन.
याच दरम्यान रमेश सिप्पी ‘शोले’ बनवत होते. ‘शोले’च्या गब्बरसाठी सिप्पींची पहिली पसंती डॅनींना होती. पण त्यावेळी डॅनी फिरोज खान यांची धर्मात्मा फिल्म करत होते. धर्मात्मासाठी आधीच तारखा दिल्यामुळे डॅनींना शोले करणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे गब्बरची भूमिका अमजद खान यांच्या वाट्याला आली. गब्बरच्या भूमिकेबद्दल विचारताना डॅनी सांगतात की,
“मी फिरोज खान यांना आधी शब्द दिला होता. मी होकार दिला असता तर इंडस्ट्रीला अमजद खान यांच्या रुपात एक आयकॉनिक खलनायक मिळाला नसता. त्यामुळे शोलेच्या यशात माझाही वाटा आहे. त्यानंतर अमजद यांनी त्यांचं मानधन वाढवलं आणि मी सुद्धा. त्यानंतर कॅरॅक्टर आर्टिस्टचं मानधनही वाढू लागलं”. जया बच्चन डॅनींची एफटीआयआयमध्ये वर्गमैत्रिण होती. बच्चन्ससोबत त्यांचे खूप चांगले संबंध होते. पण तरीही डॅनींनी तब्बल १८ वर्षे अमिताभसोबत काम करणं टाळलं. त्याच कारण म्हणजे अमिताभ यांच्यासारख्या बड्या अभिनेत्यासमोर आपली भूमिका झाकोळली जाईल असं डॅनींना वाटलं होतं. पण जेव्हा मुकुल आनंद यांनी अग्निपथची कथा ऐकवली तेव्हा डॅनींना असा विश्वास वाटला की विजय दीनानाथ चौहानसमोर कांचा चीना दुर्लक्षित राहाणार नाही आणि झालंही अगदी तसंच..डॅनींचा कांचा चीना आजही एक अजरामर व्हिलन आहे.
‘अग्निपथ’च्या सेटवरचा एक किस्सा असाही आहे की शूटिंगसाठी सारं युनिट मॉरिशसला रवाना झालं. सकाळी साडे आठ वाजता मेकअप करुन सारे कलाकार तयार झाले. पण अजून डॅनींना स्क्रिप्ट मिळाली नव्हती. मनात थोडा नव्हर्सनेस असल्यामुळे डॅनी अक्षरश: आपल्या असिस्टंटवर वैतागले. पाचच मिनिटात अमिताभ सुद्धा सेटवर पोहोचले. त्यांनी डॅनीचा चढलेला आवाज ऐकला होता. त्यामुळे अमिताभ डॅनीकडे गेले आणि म्हणाले की, मलाही आत्ताच स्क्रिप्ट मिळाली. आपण एकत्र रिहर्सल करुया. आणि इथून मैत्रीचं एक नवं पर्व सुरु झालं. त्यानंतर अमिताभसोबत डॅनींनी हम, खुदा गवाहमध्ये एकत्र काम केलं. सनम बेवफा आणि खुदा गवाह या सिनेमात डॅनींनी हिंदी भाषेवर घेतलेली मेहनती उपयोगी पडली. या दोन्ही फिल्मसाठी डॅनींना सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डॅनी यांनी केवळ निगेटीव्ह भूमिकाच केल्या असं नाही तर सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही तितक्याच सहजतेने साकारल्या. हिंदी सोबतच अनेक नेपाळी, तेलगू आणि तमिळ भाषेतही डॅनींनी काम केलं. अनेक फिल्मसाठी त्यांना फिल्मफेअरचे नॉमिनेश मिळाले. अभिनयासोबतच डॅनी उत्तम लिहितात. त्यांनी फिर वही रात आणि राम या दोन सिनेमांचं दिग्दर्शनही केलं.
डॅनींचं फिमेल फॅन फॉलोईंग जबरदस्त होतं. इतकंच नाही तर काही मेल फॅन्सही त्यांना रक्ताने पत्र लिहायचे आणि त्यांना गुरु मानल्याचं सांगायचे. दरम्यानच्या काळात डॅनी यांच्या आयुष्यात आली परवीन बाबी. परवीन आणि डॅनी चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्याकाळी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर परवीन कबीर बेदींच्या प्रेमात पडली आणि हे नातं तुटलं. ब्रेकअपनंतरही परवीन त्यांच्या घरी येत राहिली. पण त्यावेळी डॅनींची नवी गर्लफ्रेण्ड असलेल्या किमला हे रुचलं नाही. काही दिवसांतच परवीन स्किझोफेनियाची रुग्ण असल्याचंही समोर आलं. त्यावेळी डॅनी यांचं सिक्किमची प्रिन्सेस गावा डॅन्ग्झोपासोबत लग्न झालं होतं. तर परवीनच्या आयुष्यात महेश भट आले होते. पण दिवसेंदिवस परवीनचा आजार बळावत राहिला. एकेकाळी सतत ग्लॅमरच्या वलयात राहिलेल्या परवीनने एकाकीपणे जगाचा निरोप घेतला. परवीनच्या अंत्यविधीवेळी उपस्थिती असणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये डॅनी होते. डॅनी यांना मनमोहन देसाईंनीही अनेकदा सिनेमासाठी विचारलं होतं. पण दरवेळी डॅनी नकार देत राहिले. डॅनींना देसाईंबद्दल आदर होता पण तरीही एकदा त्यांनी स्पष्टपणे देसाईंना सांगितलं की तुमचे सिनेमे इंडस्ट्रीला आणखी २० वर्षे मागे नेतात. तुम्ही एक हिट सिनेमा देता आणि मग बाकी सारे तुम्हाला फॉलो करतात. ते ऐकून देसाईंनीही त्यांना अगदी ठेवणीतलं ऐकवलं. पण डॅनी स्पष्टवक्ता होते. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी भारंभार सिनेमे अजिबात केले नाही. पण जे सिनेमे केले त्यातून आपले फॅन्स नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली. डॅनींनी नेहमी स्वत:च्या अटींवर काम केलं. डॅनी उत्तम अभिनेताच नाही तर उत्तम पेंटर आणि गायकही आहेत. ते उत्तम बासरी वाजवतात. डॅनींनी लतादीदी, आशाताई, रफी, किशोर कुमार अशा अनेक दिग्गज गायक – गायिकांसोबत गाणी गायली आहेत. काही नेपाळी सिनेमांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं आहे.
काळ मागे सरत राहिला पण डॅनी यांची जादू ओसरली नाही. बदलत्या काळातही नव्या पिढीसोबत डॅनी काम करत राहिले. पुकार, अशोका, १६ डिसेंबर, चायना गेट, लक, रोबोट, जय हो, मेरी कोम, बँग बँग अशा अलीकडच्या काळातल्या सिनेमातही डॅनी यांनी आपली छाप सोडली आहे.
डॅनींनी काही इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्येही काम केलं. २००३ साली भारत सरकारने डॅनींना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. डॅनी आजही मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घेत ते पर्वतरांगांमधल्या शांततेत रमतात. घरातल्या बागेत त्यांचा अधिकाधिक वेळ जातो. साठी उलटल्यानंतरही फिटनेसच्या बाबतीत आजच्या यंग स्टार्सनाही डॅनी मागे टाकतात. केवळ हिंदी सिनेमातला खलनायक इतकीच डॅनी यांची ओळख मर्यादित राहात नाही. डॅनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..