नवीन लेखन...

वर्णती जयगाथा ऋषि व्यास – व्यासपौर्णिमेनिमित्त

वर्णती जयगाथा ऋषि व्यास
स्वयं गजानन बसला पुढती लिखित रूप देण्यांस ।। १

नाम कृष्णद्वैपायन यांचें
ज्येष्ठ पुत्र हे सत्यवतीचे
ज्ञानानें अभिधान मिळालें
‘वेदव्यास’ हें त्यांस ।। २

ऋषिवर ज्याचे स्वत:च साक्षी
कुरु नामक ख्यातकीर्त वंशीं
घटित-अघटितातून मूर्त
‘जय’ नांवाचा इतिहास ।। ३

पर्वांमधुनी घटना-वर्णन
घडे तर्क्य-अतर्क्य प्रदर्शन
पिढ्यापिढ्यांचा, संबंधांचा
एक अखंड प्रवास ।। ४

धृतराष्ट्राचे सुत, शत-कौरव
पंडूचे पुत्र, पांच-पांडव
राज्यावर अधिकार कुणाचा
हें कारण कलहास ।। ५

राज्यासाठी बंधु भांडले
सत्तेसाठी रक्त सांडलें
भावांच्या वादातुन झाला
कुरुवंशाचा र्‍हास ।। ६

युधिष्ठिराचे जरी सत्वगुण,
परंतु अभिमानी दुर्योधन
पूर्ण हस्तिनापुर-राज्याचा
धरीतसे हव्यास ।। ७

वैरातुन लाक्षागृह जळलें
दुष्ट-हेतु नीचांचे कळले
सुप्त द्वेष उघड्यावर येउन
भस्म करी स्नेहास ।। ८

राज्य मिळे दोहोंस विभागुन
मिळे पांडवांना खांडववन
दिलें मयानें, अमरपुरीसम
रूप इंद्रप्रस्थास ।। ९

द्यूत घडे कपटी चालींचें
वस्त्रहरण मग पांचालीचें
द्यूतातुन आला भाळीं
अज्ञातवास-वनवास ।। १०

कणही भूमि न देती कौरव
समेट घडवूं शके न केशव
अटळच जें, तें टाळायाचा
झाला व्यर्थ, प्रयास ।। ११

कौरव, पांडव, नृपती नाना
अक्षहौणी अठरांची सेना
एका वा दुसर्‍या पक्षातुन
झाले सिद्ध रणास ।। १२

कुरुक्षेत्रावर आप्त-गुरूजन
बघुन संभ्रमित होई अर्जुन
गीता सांगुन, बोध द्यावया
लागे श्रीकृष्णास ।। १३

मित्र-बंधु लागले लढाया
स्वकीयांस लागले वधाया
कुरुक्षेत्रावर पडली चहुंवर
हताहतांची रास ।। १४

दिवस अष्टदश, युद्ध चालले
लाखो मेले, विश्व हालले
हरलेले, शोकाकुल सारे,
विजयी सर्व, उदास ।। १५

प्रलयंकारी युद्ध भयंकर
नच दुसरें होईल धरेवर
असा पराक्रम महारथींचा,
ऐसा महा-विनाश ।। १६

झाला येथें अंत युगाचा
नाश जाहला ज्ञात-जगाचा
काळानेंही क्षणभर थांबुन
सोडियला निश्वास ।। १७

या धरतीवर, युगांयुगांतिल
पिढ्या शेकडो येतिल-जातिल
त्या सर्वांनी धडा शिकावा
हा व्यासांचा ध्यास ।। १८

– – –
(माझ्या, ‘गा जयगाथा पंडुसुतांची’ या
आगामी गीत-संग्रहातून )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..