नवीन लेखन...

चिंतामणराव कोल्हटकर

चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी नेवरे रत्नागिरी येथे झाला.चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्‌भुत असाच आहे. कोल्हटकर १९११ मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. १९१४ साली ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.

कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले. राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला. १९३३ च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला. तेव्हा चिंतामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. मा.चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्च र्समध्ये रूपांतर केले. पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्यास, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपट व्यवसायातून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले. चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले.

अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. त्यांचा मुलगा मा.चित्तरंजन कोल्हटकर हे सुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणराव यांच्या नात आणि मा.चित्तरंजन कोल्हटकर यांची ज्येष्ठ कन्या, मा.विनीता करमरकर यांनी मा.चिंतामण कोल्हटकर यांचे बलवंत चिंतामणी या नावाने चरित्र लिहिले आहे. मा.विश्राम बेडेकर, मा.पु.ल. देशपांडे, मा.चंद्रकांत गोखले, मा.वसंत शिंदे, मा. शांता जोग हे सर्व मा.चिंतामण कोल्हटकर यांचे नाट्यक्षेत्रातले शिष्य म्हणून पुढे नावारूपाला आले. मा.चिंतामणराव कोल्हटकर १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके
आंधळ्यांची शाळा, आशीर्वाद, एकच प्याला, कमला, काकाची शशी, कांचनगडची मोहना, जग काय म्हणेल, झुंझारराव, तानसेन, तुकाराम, तोतयाचे बंड, त्राटिका, द्रौपदी, नेकजात मराठा, पाणिग्रहण, पुण्यप्रभाव, प्रेमध्वज, बेबंदशाही, ब्रह्मकुमारी, भाऊबंदकी, भाग्यवान, भावबंधन, माते तुला काय हवंय?,
मानाजीराव, मानापमान, रणदुंदुभी, राजमुकुट, राजसंन्यास, विद्याहरण, वैजयंती, शिवसंभव, संन्यस्त खड्ग, संशयकल्लोळ, सोन्याचा कळस, स्वयंसेवक, हॅम्लेट, हाच मुलाचा बाप, हिरवा चुडा.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..