नवीन लेखन...

नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक बाळासाहेब भारदे

राजकारण, समाजकारण, अध्यात्म, सहकार, पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या बाळासाहेब भारदे यांचा जन्म २५ मे १९१४ रोजी झाला.

भारदे कुटुंब मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे. बाळासाहेबांचे वडील शिवरामपंत भारदे यांचा एक प्रकांड पंडित म्हणून परिसरात दबदबा होता. १९५२ साली आमदार, १९५७ साली सहकार मंत्री , १९६२ साली महाराष्ट्र विधान सभेचे सभापती व पुन्हा १९६७ साली सभापती पदी फेरनिवड अशी राजकीय कारकीर्द बाळासाहेबांची राहिली होती.

स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते. बाळासाहेब हे साप्ताहिक ‘ संघशक्ती’ चे संपादक व नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक होते.

अहमदनगर जिल्हा कॉग्रेस पक्षाने १९३६मध्ये सत्याग्रहाची चळवळ जनसामान्यांपर्यत नेण्यासाठी ‘संघशक्ती’ हे साप्ताहिक सुरू केले होते. सामांन्य जनतेची गाऱ्हाणी संघशक्तीतून अग्रक्रमाने मांडली जात. संघशक्तीच्या संपादकत्वाची जबाबदारी चले जाव चळवळीतले सेनानी रावसाहेब पटवर्धन तसेच भाऊसाहेब फिरोदिया यांच्यावर होती. १९४८च्या सुमारास रावसाहेब पटवर्धन नगर सोडून पुण्याला गेले. त्यामुळं काही काळ संघशक्ती बंद पडले. मात्र रावसाहेबांचे राजकीय शिष्य त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे यांनी संघशक्तीच पुनरुज्जीवन केले. बाळासाहेबांनी आपल्या लोकाभिमुखतेचा व विद्वत्ततापूर्ण विचारांचा ठसा आपल्या संपादनाद्वारे आणि लेखनाद्वारे संघशक्तीवर उमटविला. त्यामुळे संघशक्तीचे नाव महाराष्ट्रात सर्वदूर पसरले.

या काळात अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेत सक्रिय असलेल्या बाळासाहेब भारदे यांच्या पुढाकाराने १९४७ मध्ये नगर जिल्हा मराठी पत्रकार संघ ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू झाली.१९५१ मध्ये बाळासाहेब भारदे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच नगरला मराठी पत्रकार परिषदेचे अकरावे अधिवेशन झाले. धुळ्याच्या स्वतंत्र भारतचे संपादक अ.वि.टिळक हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मावळते अध्यक्ष आचार्य प्र.के.अत्रे देखील अधिवे़शनास उपस्थित होते. बाळासाहेब भारदे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. दोन वर्षांनी मुंबईत झालेल्या तेराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद बाळासाहेब भारदेंना मिळाले. ह.रा. महाजनी यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागेवर बाळासाहेब भारदेंची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. १९५३ मध्ये झालेल्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आप्पा पेंडसे होते.

मुंबईच्या अधिवेशनानंतर मात्र बाळासाहेबांचा पत्रकारितेशी फारसा संबंध राहिला नाही. कारण ते राजकाऱणात कमालीचे व्यस्त झाले. अगोदर आमदार आणि १९५७मध्ये महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री झाले. पहिल्यांदा १९६२ व पुन्हा १९६७ असे दोन वेळा आणि सलग दहा वर्षे ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष निवडले गेले.

सहकार मंत्री झाल्याची बातमी भारदेंनी रेडिओवर ऐकली आणि नंतर ते एस.टी.ने तिकीट काढून मुंबईला गेले. हा साधेपणा त्यांनी आयुष्यभर जपला आणि समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला. त्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा असल्याने त्यांनी गांधीच्या विचारधारेवरच समाजकारण आणि राजकारण केले. त्यांनी जाती-धर्माच्या संस्था आणि संघटनांना कायम दूर ठेवले. त्यांनी उच्च पदांवर काम करताना अनेक चांगले पायंडे पाडले आणि अध्यक्ष म्हणून अपेक्षित असलेला निःपक्षपणा आपल्या निर्णयांतून दाखवून दिला. उच्च नीतिमूल्याचे आचरण करीत त्यांनी अध्यक्षपदाचे पावित्र्यही जतन केले. भारदे बुवांनी महाराष्ट्राला न संपणारे विचारधन तर दिलेच त्याचबरोबर अनेक नावीन्यपूर्ण योजनाही त्यांनी महाराष्ट्राला दिल्या.

अर्थपूर्ण शाब्दिक कोट्या, मर्मभेदी विवेचन, विनोदी शैली ही त्यांच्या वक्तृत्वाची काही अंगे सांगता येतील. धोतर,सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेले भारदे बुवा राजकारणातील संत म्हणूनच ओळखले जायचे. राजकारण, अध्यात्म, समाजकारणकिंवा सहकार आणि पत्रकारिता या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटविला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. मूलतःच तल्लखबुद्धी असलेले भारदे आपल्या विद्वत्तेच्या तेजाने आयुष्यभर तळपत राहिले. राजकारणात मुरल्यावर बाळासाहेब भारदे यांनी पत्रकारिता सोडली पण कीर्तने करणे सोडले नाही. बाळासाहेब भारदे यांनी कृषिक्रांती : दोन पैलू हे पुस्तक लिहिले होते.

भारत सरकारने बाळासाहेब भारदे यांना २००१ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.

बाळासाहेब भारदे यांचे २२ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..