नवीन लेखन...

अध्यात्मिक निसर्गमय सज्जनगड

प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात,त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेलाजेअसून सातारा शहरापासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्वशी नदीच्या खोर्‍यात हा दुर्ग उभा आहे.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात केली. प्राचीन काळी या डोंगरावर आश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान होतं, त्यामुळे या किल्ल्याला आश्वलायनगड म्हणुन ओळखले जाऊ लागले तसंच अस्वलांची येथे वस्ती असल्याने अस्वलगड, व त्यानंतर नवरसतारा अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत.परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंच तर पठारापासून सुमारे १००० फूट उंच आहे. सज्जनगड किल्ल्याचा आकार शंखाकृती असून याचा परीघ १ किलोमीटरपेक्षा अधिक आहे.

२ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला.त्यांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले, तेव्हा पासुन किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले.

३ नोव्हेंबर, इ.स. १६७८ रोजी शिवाजी महाराजांनी आपला पुत्र संभाजीला समर्थ रामदासांकडे पाठवले.परंतु ३ डिसेंबर इ.स.१६७८ रोजी संभाजी सज्जनगडावरून जाऊन आल्यावर दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर म्हणजेच १८ जानेवारी इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींच्या निधनानंतर नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला व ६ जून, इ.स.१७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला आणि त्याचे ‘नवरससातारा’ म्हणून नामकरण झाले. १७०९ साली मराठ्यांनी पुन्हा सज्जनगड किल्ला जिंकला.पण त्यानंतर १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती गेला.

सज्जनगडच्या पायर्‍या चढताना लगतच्या कडेवर असलेल्या अकरा मारूतींचं दर्शन आपल्याला थोड्या-थोड्या अंतराने घडत रहातं;गडाच्या अर्ध्या वाटेवर समर्थांचे शिष्य असलेल्या कल्याण स्वामींचे मंदिर असुन, थोडं पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुस-या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. गडावर शिरतांना लागणार्‍या पहिल्या दरवाजाला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ असे म्हणतात; तर दुसर्‍या दरवाजाला त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हणतात व तिथे आपल्याला ऊर्दू भाषेतील शिलालेख नजरेस पडतो. किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ आगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामादासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती. आंगलाई मंदिर समर्थ रामदासांनी बांधले आहे.

समर्थ रामदासांच्या समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले.त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तु पहायला मिळतात.त्या लगत असलेल्या राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती असुन मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, व सीतेच्या पंचधातू मूर्ती आहेत. जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत महाराजांच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपर्‍यात मारुती आहे. दुसर्‍या कोपर्‍यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन असुन मंदिराच्या उत्तर दिशेस आणखी एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे. मंदिराची भ्रमंती झाल्यावर गडाच्या परिसराच्या दर्शनासाठी थोडस बाहेर आल्यावर सुंदर अश्या निसर्गाचं दर्शन होताच मन प्रसन्न तसंच त्या वातावरणाशी एकरुप होऊन जातं. आसपासच्या परिसरावर नजर टाकल्यास समोर अनेक डोंगररांगा, पठारं, ओढे व खोलवर पसरलेली व हिरवाईने नटलेली विस्तीर्ण दरी, नागमोडी घाटांचं विहंगम दृश्य अशरक्ष: चित्त वेधायला लावणारी आहेत.पावसाळ्यात तर इथलं वातावरण पाहण्या सारखच असतं;गडाचं बांधकाम दगडी असल्याने सध्या ते जिर्ण अवस्थेत आहे, त्यामुळे गडाच्या कडा पूर्णत: ढासळलेलं दिसतात.तरी सुध्दा गडमाथा राकट व विलोभनीयच आहे.फोटोग्राफर्स साठी ही जागा म्हणजे पर्वणीच म्हणता येईल.

माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी या काळात सज्जनगडावर मोठा उत्सव साजरा होतो.त्यावेळी दासबोधाचं पठण देखील करण्यात येतं. श्री समर्थ सेवा मंडळा तर्फे मोफत जेवणाची सोय देखील केली जाते तसंच राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळातर्फे माफक दरात खोल्या उपलब्ध आहेत.अनोख्या विकेण्डच्या तुम्ही शोधात असाल तर साताराच्या सज्जनगडाला भेट ही दिलीच पाहीजे.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..