नवीन लेखन...

कवी ग्रेस

कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी…’ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते.

निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. ‘छंद’, ‘सत्यकथा’ या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘संध्याकाळच्या कविता’ प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली.त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली.

यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. मा.ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे मा.ग्रेस वारंवार म्हणायचे. ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे.

ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. ‘चर्चबेल’ हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘मृगजळाचे बांधकाम’, ‘वाऱ्याने हलते रान’, ‘ओल्या वेळूची बासरी’ हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ” माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून ‘ग्रेस’ हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन.

‘द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस’ या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी ‘शी इज इन ग्रेस’ असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी ‘ग्रेस’ हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, “मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते’.

ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि…’ या गीताबद्दल, मा.ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांनी साद घातली आणि एक अजरामर गीत जन्माला आलं…
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे
हा सूर्य सोडवीत होता…

पावसाचा रिमझिम निनाद दु:खाचा सांगावा घेऊन येणारा…आई गेल्यानंतरचं पोरकेपण सांगणारा…जाणारी ती आई होती म्हणून घनव्याकूळ करणारा… हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांमधून ग्रेस यांची ही कविता ऐकताना आपल्या मनाची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी शब्द बापुडे होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात दु:ख ठिबकत राहावं ना, अगदी तसच वाटत राहतं. त्यांच्या इतर ”भय इथले संपत नाही”,घर थकलेले संन्यासी ”,पाऊस कधीच पडतो”अशा या सुंदर कवितांना ही हृदयनाथ यांनी आपल्या सुरेल स्वरांच्या कोंदणात बसवून अजरामर केले आहे.

ग्रेस यांच्या ”संध्याकाळच्या कविता”या संग्रहाला १९६८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे ”कवी केशवसुत”पारितोषिक मिळाले .त्यांच्या ”वाऱ्याने हलते रान” या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.२०१२ साली ”युनिक फीचर्स ”ने आयोजित केलेल्या ”दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गुणी व प्रतिभाशाली संगीतकार रोशन हे ग्रेस यांचे आवडते संगीतकार. ‘चर्चबेल’ या ललित गद्याच्या पुस्तकात ग्रेस यांचा ‘रोशनची गाणी’ या शीर्षकाचा अतिशय सुंदर लेख आहे. त्यात सुरवातीलाच ग्रेस म्हणतात, ‘मी रोशनचे छायाचित्र पाहिले आहे, पण त्याला भेटू शकलो नाही. भेटायची खूप इच्छा होती.

अशा ब-याच गोष्टी राहून गेल्या आहेत; राहून जातात. मृत्यू असं काही करुन जातो.’ ग्रेसनी, रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बहुबेगम’ चित्रपटातील कव्वालीतील वाकिफ़ हूं खूब इश्क की तर्जे-बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढके लाऊं कहां से मैं! या ओळी उद़्धृत करुन, रोशनना आदरांजली वाहिली होती. ग्रेस यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

ग्रेस यांचे कवितासंग्रह
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
बाई! जोगिया पुरुष (२०१२)

ललितबंध संग्रह
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)
ओल्या वेळूची बासरी (२०१२)

ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस होता

भय इथले संपत नाही.

तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..