नवीन लेखन...

जानेवारी १४ : प्रो. दि. ब. देबधरांचे पुण्यस्मरण

१४ जानेवारी १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. भारतीय क्रिकेटमधील पहिलेवहिले प्रथमश्रेणी शतक देवधरांनी काढले होते, तेही आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध. हे पहिले भारतीय कसोटी शतकही ठरले असते पण तोवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळच अस्तित्वात नसल्याने हा मान त्यांच्या नावे लागू शकला नाही. महाराष्ट्राने

१९३९-४० आणि १९४०-४१ या लागोपाठच्या वर्षांमध्ये रणजी करंडक जिंकला तेव्हा देवधरच कर्णधार होते. सातत्याने मोठमोठ्या सांघिक धावा करणार्‍या महाराष्ट्र संघाने आणि नभोवाणीवरून सामन्यांची वर्णने करणार्‍या बॉबी तल्यारखानांनी भारतात रणजी स्पर्धा लोकप्रिय केली असे खुद्द देवधरांनीच आपल्या ‘शतकाकडे’ या आत्मचरित्रात म्हटले आहे.नूतन मराठी विद्यालय ही देवधरांची शाळा. १९०६ मध्ये (वयाचे १४वे वर्ष) त्यांनी कँपमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे नायकपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले.

भारतातील प्रथमश्रेणीची बाल्यावस्था

१८५० च्या सुमारास पार्शांनी झोरास्ट्रिअन क्लब स्थापन करून संघटित क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला होता. १८८५ आणि १८८७ मध्ये त्यांच्या संघाने परदेश दौरे केले. त्याकाळी पुण्यात (आणि मुंबईत) गोर्‍या साहेबाचा संघ (भारतात नोकरीसाठी आलेल्या इंग्रजांचा संघ) विरुद्ध पार्शी संघ अशी वार्षिक लढत प्रेसिडेन्सी सामने या नावाने खेळली जाई. १८९५ ते १९०६ या काळात ही स्पर्धा चालली. १९०७ मध्ये हिंदूंचा संघ या स्पर्धेत सामील झाला आणि ही स्पर्धा तिरंगी झाली. १९०९ मध्ये अ‍ॅग्रिकल्चरल कॉलेजविरुद्ध देवधरांनी शतक काढले (११७) आणि १९१० मध्येही कॉलेज क्रिकेटमध्ये चमकत राहिल्याने हिंदू संघातर्फे त्याला आमंत्रण आले. त्यांचा प्रत्यक्ष सामन्यात मात्र समावेश झाला नाही. संघ जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी त्यांना वगळण्यात आले होते. समोर देवधर असताना त्यांना डावलण्यासाठी नियम किंवा शिरस्ते डावलले जाणार असल्याची ही काही शेवटची वेळ असणार नव्हती !युरोपिअन क्लब ही पुण्यातील पहिली क्रिकेटोत्तेजक सभा. त्यानंतर आली यंग मेन्स क्रिकेट क्लब. (वाय एम सी सी). आधी तपस्वी क्लब, आगाशे क्लब अशी नावे असणार्‍या एका क्लबाचे नाव १९०० मध्ये दी पूना यंग क्रिकेटर्स क्लब (पी वाय सी) असे ठेवले गेले आणि पुढे ही संस्था फुलली. १९२५ मध्ये ती पी वाय सी हिंदू जिमखाना बनली. वयाच्या १४ व्या वर्षापासून ६४ व्या वर्षापर्यंत देवधर पी वाय सी कडून खेळले !तिरंगी स्पर्धेत १९१२ मध्ये मुस्लिम संघ उतरला आणि स्पर्धा आता चौरंगी झाली. १९३० ते ३३ हा अपवाद वगळता (स्वदेशी आणि असहकार चळवळ) १९३६ पर्यंत ही स्पर्धा चालू राहिली. १९३७ मध्ये तीत दी रेस्ट (इतरेजन – ख्रिस्ताव, आंग्ल-भारतीय, ज्यू) या संघाची भर पडली आणि १९४२ चा अपवाद वगळता १९४५ पर्यंत हे सामने चालले. जातीय वैमनस्यास कारणीभूत होत असल्यावरून १९४६ पासून ही स्पर्धा बं
रण्यात आली.

देवधरांची कारकीर्द

१९११ मध्ये देवधर पहिला प्रथमश्रेणी सामना खेळले. पार्शी संघाविरुद्ध. याच वर्षी भारताचा पहिला संघ परदेश दौर्‍यावर गेला होता, पंचम जॉर्ज इंग्लंडचे बादशहा झाले होते आणि विजय मर्चंट आणि लाला अमरनाथांचा जन्म झाला होता. १९१२ मध्ये बी ए च्या अभ्यासामुळे देवधर क्रिकेटपासून दूर राहिले. १९१३ मध्ये चुनीलाल मेहतांच्या नेतृत्वाखालील हिंदू संघाने प्रथमच युरोपिअन संघाला नमविले, त्या हिंदू संघात देवधरांचा समावेश होता. नंतर १९२९ पर्यंत सतत ते तिरंगी सामन्यांमध्ये खेळले. त्या काळातील हे एवढेच प्रथमश्रेणीचे सामने ! त्यातही बाद पद्धत असल्याने संघ पहिल्याच सामन्यात गारद झाल्यास पुढची संधी पुढच्या वर्षीच ! १९३४ व १९३६ या दोन वर्षांमध्ये प्रो. देवधर (संस्कृतचे) चौरंगी सामन्यांमध्ये खेळले. पंचरंगी सामन्यांमध्ये मात्र ते खेळले नाहीत.

पहिले भारतीय शतक (!)प्रवासी एम सी सी संघाविरुद्ध पुण्यात १९२६-२७ च्या हंगामात अखिल भारतीय संघाकडून खेळताना देवधरांनी १४८ धावा काढल्या होत्या. (आपल्या आत्मचरित्रात मात्र देवधरांनी ‘मी बाद झालो त्यावेळी माझ्या १४४ धावा झाल्या होत्या’ असे म्हटले आहे.) हा सामना १६ ते १८ डिसेंबर १९२६ असा तीन दिवसांचा होता. या सामन्याचा दर्जा कसोटीचा होता पण भारतात राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मंडळ अस्तित्वातच नसल्याने ही अनधिकृत कसोटी मानली गेली. विझींनी (विजयानगरमचे महाराजकुमार) हॉब्ज-सटक्लिफ यांना एकदा क्रिकेट खेळण्यासाठी भारतात बोलावून घेतले होते (फ्लॅशबॅकमध्ये त्याचा उल्लेख पूर्वी आलेला आहे.). त्यावेळी कोलंबोत झालेल्या तीन अनधिकृत कसोट्यांमध्ये विझींच्या संघात देवधरांचा समावेश होता. पहिल्या कसोटीत त्यांनी नाबाद १०० धावा काढल्या होत्या.

रणजी करंडक

संस्थानिक म्हणून आणि इंग्रजी अधिकार्‍यांशी असलेल्या परिचयामुळे कुमार श्री रणजितसिंहजींना भारतीय क्रिकेटसाठी खूप काही करणे शक्य होते पण त्यांनी तसे काहीही केले नाही ही वस्तुस्थिती आहे. १९३४-३५ मध्ये पहिल्याप्रथम राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी रणजी स्पर्धा झाली. महाराष्ट्राचा पहिलाच सामना झाला मुंबईविरुद्ध आणि महाराष्ट्राने तो गमावला, पहिल्या डावाच्या आधारावर. महाराष्ट्राचे कर्णधार देवधर यांनी ५७ तर कोल्हापूरच्या विजय हजारेंनी ६५ धावा काढल्या होत्या. १९३५-३६ मध्ये पुन्हा महाराष्ट्राचा संघ मुंबईकडून परास्त झाला. १९३६-३७ मध्ये वेस्टर्न इंडिया स्टेट्स क्रिकेट असोसिएशन (विस्का) च्या संघाने महाराष्ट्राला पराभूत केले. पुढच्या हंगामात आणि त्याच्या पुढच्यातही.१९३९-४० च्या हंगामापासून महाराष्ट्रातील प्रथमश्रेणीचे सुवर्णयुग सुरू झाले. लागोपाठच्या नऊ सामन्यांमध्ये महाराष्ट्राने विजय मिळविले, तेही मोठमोठ्या धावा रचीत. सलग दोन वर्षे महाराष्ट्राने अजिंक्यपद पटकावले आणि MAHARASHTRIAN MAGNITUDE असा नवा शब्दप्रयोग या संघाने भाषेला दिला. ५४३, ६५०, ४८२, ५८१, ६७५, ५१७, ४६० आणि तब्बल ७९८ अशा धावा लागोपाठच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राने उभारल्या.

अन्याय

१९३२ मध्ये पोरबंदरच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर गेला होता. या संघात खेळाडू म्हणूनच नव्हे तर अगदी कर्णधार म्हणूनदेखील देवधर सर्वथैवी पात्र असताना त्यांना डावलण्यात आले होते. चाळीस हे त्यांचे वय ही सबब पुढे करण्यात आली असली तरी राजकारण वेगळेच होते. याच संघातील जमशेटजींचे वय चाळीसच्या आसपास होते आणि सी के नायडू ३७ वर्षांचे होते. महाराज आणि देवधरांचे संबंध सलोख्याचे होते आणि महाराजांच्या माघारी कर्णधारपद देवधरांकडेच जाईल याची पुरेपूर जाण असल्याने अतिमहत्त्वाकांक्षी सी के नायडूंनी डीमेलो (मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, बडे प्रस्थ, लाला अमरनाथांवरील फ्लॅशमध्ये यांच्या काही करणींचा उल्लेख यापूर्वी आलेला आहे) यांना हाताशी धरून देवधरांना वगळले होते !१९४६-४७ मध्ये प्रो. दि. ब. देवधर प्रथमश्रेणीतून निवृत्त झाले.

कारकीर्द: ८१ सामने, १३३ डाव, १८ वेळा नाबाद, ४५२२ धावा, २४६ सर्वोच्च, प्रतिडाव ३४.०० धावा, ९ शतके, २७ अर्धशतके, ७० झेल.२४६ धावा वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी मुंबईविरुद्ध रणजी करंडकात.

२४ ऑगस्ट १९९३ रोजी (वय १०१ वर्षे २२२ दिवस) त्यांचे पुण्यात निधन झाले. त्यांचे सुपुत्र शरद देवधर यांच्या नावे एक प्रथमश्रेणी शतक आहे. तारा, सुमन आणि श्यामा या त्यांच्या कन्यांनी राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन एके काळी गाजविलेले आहे.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..