नवीन लेखन...

जाहीरात

बंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारे महत्वाचे भाग बनवणारी ही कंपनी होती. या कंपनीची उत्पादने वापरल्याशिवाय डिझेल आणि पेट्रोल इंजिनांचे प्रॉडक्शन करणे शक्यच नव्हते. त्यामूळे भारतातले सगळे इंजीन मॅन्युफॅक्चरर्स या कंपनीचे ओ.इ. कस्टमर होते. या मध्ये ऍटोमोबाईल सेक्टरमधील कंपन्या मोठ्या प्रमाणावर होत्या. या प्रकारची उत्पादने बनवणारी ही भारतातील एकमेव कंपनी असल्यामूळे या कंपनीची जवळ जवळ मोनॉपली होती. या कंपनीला स्पर्धक होते. नाही असे नाही. पण ते फारच किरकोळ स्वरुपातले होते. कंपनीचे बंगलोर आणि नाशीक या दोन ठिकाणी कारखाने होते. दोन्ही कारखाने अत्याधुनीक होते. कंपनीची प्रॉडक्ट्स नुसतीच हाय टेक नव्हती तर हाय प्रिसिजन पण होती. कंपनीची जी उत्पादने इंजीनवर बसवण्यात येत त्यांना पण सर्वीस लागे. या साठी कंनीनीने भारतात 100 डिलर्स आणि सर्वीस स्टेशन्सचे जाळे उभे केले होते. तसेच या प्रकारची सर्वीस देणारी अनेक खासगी सर्वीस स्टेशन्स पण होती. यांना कंनीचे स्पेअर पार्ट मोठ्या प्रमाणावर लागत. त्यामूळे कंपनीचा स्पेअर पार्टचा धंदा पण मोठ्या प्रमाणावर होता. जसजसे इंजिनांचे आणि वाहनांचे उत्पादन वाढत होते तसतसे कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढतच चालली होती. अनेक वेळेला कंपनीच्या मालाचे शॉर्टेज असायचे. थोडक्यात कंपनी जे बनवत होती ते आपोआप विकले जात होते. ते सुद्धा कंपनीला हव्या असलेल्या किंमतीमध्ये विकले जात होते. कंपनिची 4 झोनल आणि 8 एरिया ऑफिसेस होती. यांच्यातर्फे कंपनीचे व्यवहार उत्तम चालू होते. अशी ही परिस्थिती अनेक वर्षे होती. मग कंपनीला जाहीरातबाजी करण्याची गरजच काय?

पण 1980 च्या सुमारास परिस्थिती बदलली! कंपनीच्या बंगलोरच्या कारखान्यात कामगारांचा संप झाला. हा संप दिर्घकाळ, म्हणजे जवळ जवळ 2 महीने टिकला. या संपामूळे कंपनीचे प्रॉडक्शन बोंबलले. याचा मोठा फटका कंपनीच्या ग्राहकांना बसू लागला. ऍटोमोबाईल सेक्टरला याचा सर्वात मोठा फटका बसला. ट्रक, बसेच, कार्स आणि टू व्हिलर गाड्यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला आणि गाड्यांचे उत्पादन गडगडले. त्याचप्रमाणे ज्या गाड्या रस्त्यावर धावत होत्या त्यांच्या सर्व्हिसींगला कंपनीचे पार्ट मिळेनासे झाल्याने या गाड्या पण बंद पडू लागल्या. याचा मोठा फटका रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला बसला. थोडक्यात देशाच्या इकॉनॉमिलाच याचा मोठा फटका बसु लागला. अगदी लोकभेमध्ये चर्चा होण्यापर्यंत हे प्रकरण ताणले गेले. संप मिटवण्याचे कंपनीचे हर तर्हेलचे प्रयत्न चालूच होते पण त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. संपाच्या या काळात कंनीचे जे ओ. ई. कस्टमर्स होते त्यांचा कंपनीवरचा विश्वास कमी होऊ लागला आणि त्यांनी पर्यायी व्यवस्था शोधायचा मार्ग स्विकारायला सुरवात केली. काही जणांनी ही उत्पादने आयात करायला सुरवात केली. कंपनीचे जे किरकोळ स्पर्धक होते त्यांचे चांगलेच फावले आणि त्यांच्या उत्पादनांची हातोहात विक्री होऊ लागली. कंपनीचे नकली किंवा डुप्लिकेट पार्ट बनवणार्यांानी वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायला सुरवात केली. असे अनेक नकली मालाचे उत्पादक दिल्लीला होते. पण याहीपेक्षा अजून एक मोठा ‘थ्रेट’ कंपनीसाठी निर्माण झाला. भारतातील एका प्रसिद्ध उद्योग समुहाने यात उडी घेतली. या कंपनीसारखीच उत्पादने बनवणारा कारखाना सुरू केला. जोरदार मार्केटिंगच्या जोरावर कंपनीचे अनेक ग्राहक आपल्याकडे खेचून घेतले आणि कंपनीपुढे मोठे आव्हान उभे केले. कंपनीच्या मार्केट शेअरवर याचा परिणाम होऊन कंपनीचा मार्केट शेअर हळू हळू घसरू लागला.

दोन महिन्यांच्या अथक परिश्रामाने हा संप एकदाचा मिटला आणि कंपनीचे उत्पादन परत पूर्वीसारखे सुरु झाले. या काळात कंपनीचे जे आर्थिक नुकसान झाले होते त्या पलीकडे जाऊन कंपनीसाठी तीन आव्हाने निर्माण झाली होती. पहीले आव्हान म्हणजे कंपनीच्या कामगारांच्या मनात कंपनी विषयी जिव्हाळा निर्माण करणे, दुसरे आव्हान कंपनीच्या ओ. ई. कस्टमर्सच्या मनात कंपनीविषयीचा विश्वास परत जागृत करणे आणि तिसरे आव्हान म्हणजे बाजारातील कंपनीची घसरलेली पत आणि प्रतिष्ठा परत मिळवणे.

मी स्पेअर पार्ट मार्केटिंगमध्ये काम करत असल्यामूळे माझा संबंध तिसर्यार आव्हानाशी आला. मार्केटमधील घसरलेली कंपनीची पत आणि प्रतिष्ठा परत कशी मिळवायची या वर चर्चा सुरू झाली. अनेक उपायांचा विचार करण्यात आला. कंपनीचा नवीन आलेला कॉम्पिटिटर दिवसेंदीवस शिरजोर बनत चालला होता. त्याला आवर घालण्यासाठी मार्केटमधील कंपनीची इमेज शक्य तेवढ्या लवकर सुधारणे आवश्यक होते. अनेक उपायांचा विचार केल्यावर कंपनीने वर्तमानपत्रांतील जाहीरातींच्या माध्यमातून कंपनीची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. जाहीराती मुख्यतः दोन प्रकारच्या असाता. एक जाहीरात ही उत्पादनांविषयी किंवा वस्तुंविषयी असते. त्याला ‘प्रॉडक्ट ऍड’ म्हणतात. तर दुसरी जाहीरात ही कंपनीविषयी असते. त्याला ‘कॉर्पोरेट ऍड’ असे म्हणतात. कंपनीने प्रॉडक्ट ऍड आणि कॉर्पोरेट ऍड यांचे मिश्रण करून जाहीराती टाकायचे ठरवले. अशा प्रकारच्या जाहीराती त्या वेळी कोणी टाकत नव्हते, त्या मूळे हा एक नवीन प्रयोगच होता.

अशा प्रकारच्या ‘ऍड कॅम्पेन’ साठी सक्षम ऍड एजन्सी असावी असे कंपनीला वाटले. त्यासाठी कंपनीने भारतातील त्या वेळच्या चार प्रमुख ऍड एजन्सिजना प्रेझेन्टेशनसाठी बोलावले. ऍड एजन्सीचे प्रेझेन्टेशन हा काय प्रकार असतो याचा मला अनुभव घ्यायची संधी मिळाली. या प्रेझेन्टेशन मधून भारातततील एक प्रसिद्ध आणि आघाडीची ऍड एजन्सी निवडली गेली. यामूळे ऍड एजेन्सीबरोबर काम करण्याचा भरपूर अनुभव मला मिळणार होता.

त्यानंतर मग प्रत्यक्ष जाहीरातीवर काम सुरू झाले. आधी जाहीरातीचा आकार काय असावा यावर चर्चा सुरू झाली. कंपनीच्या दृष्टीने या जाहीराती महत्वाच्या असल्यामूळे लोकांचे लक्ष लगेच त्याकडे जावे यासाठी काय काय करता येईल यावर विचार विनिमय सुरू झाला. जाहीरातींचा आकार हा ‘कॉलम सेंटिमीटर’ तसेच ‘फुल पेज, हाफ पेज, क्वार्टर पेज’ या भाषेत ठरतो. क्वार्टर पेज (म्हणजे वर्तमानपत्राचे एक चतुर्थौंश पान) हा जाहीरतीचा आकार ठरला. क्वार्टर पेज आकाराचीच पण दोन कॉलम रुंदी असलेली उंच कॉलमसारखी जाहीरात अधीक आकर्षक होईल असे ऍड एजन्सीचे म्हणणे पडले म्हणून तो साईज फायनलाइज करण्यात आला. वर्तमानपत्राच्या कुठल्या पानावर जाहीरात टाकल्याने ती लोकांचे लक्ष वेधून घेते यावर पण बरीच चर्चा झाली. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची जाहीरात सर्वात महाग असते, जस जसे आतल्या पानांकडे जाल तस तसे जाहीरातींचे दर कमी कमी होत जातात असे कळले. दुसर्याआ किंवा तिसर्यात पानावर टाकलेली जाहीरात लवकर लक्ष वेधुन घेते असे एका सर्व्हेमधील पाहणीत आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे वर्तमान पत्राच्या दुसर्याम पानावर जाहीराती टाकायचे ठरले. एकुण तीन जाहीराती टाकायच्या, त्यातील दोन जाहीराती प्रॉडक्ट संबंधी (एक डिझेल इंजिन वाल्यांसाठी तर एक पेट्रोल इंजिन वाल्यांसाठी) तर एक जाहीरात कॉर्पोरेट प्रकारची टाकायचे ठरले.

जाहीरातीचा साइझ ठरला. कुठल्या पानावर जाहीरात टाकायची हे ठरले. आता महत्वाचा भाग होता तो म्हणजे जाहीरातीचा मजकुर ठरवणे, याला कॉपी असे म्हणतात. कारण जाहीरातीमध्ये ‘कॉपी’ ला फार महत्व असते. आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे आधी ठरवावे लागते मगच कॉपी तयार होते. यावर बरीच चर्चा चर्विटचरण झाले. ऍड एजन्सीने कॉपीची एकुण 32 सॅम्पल्स सादर केली. अर्थातच मूळ कॉपी इंग्लीशमध्ये होती. यावर बरीच चर्चा चर्वीटचरण होऊन तीन कॉपीज फायनलाइज करण्यात आल्या. आधी फक्त इंग्रजी भाषेत आणि भारतातील प्रमुख इंग्रजी वर्तमान पत्रातून जाहीराती देण्याचे ठरले. मग हिन्दी आणि महत्वाच्या प्रादेशीक भाषांमधुन पण जाहीराती देणे आवश्यक आहे असे ठरले. त्यामूळे इंग्रजीबरोबर हिन्दी, तामीळ, तेलगु, मल्याळम, कानडी, मराठी, गुजराती, गुरुमुखी, बंगाली, ओरीया आणि आसामी भाषांमधून पण जाहीराती टाकायचे ठरले. यात पुढे उर्दु भाषा पण ऍड झाली. ज्या इंग्लीश कॉपी अप्रुव्ह केल्या होत्या त्याचीच निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्याचे ठरले. यासाठी ऍड एजन्सीने मुंबईतील एका प्रसिद्ध लॅन्वेज ब्युरोची नेमणूक केली. भाषांतरे योग्य झाली आहेत की नाही हे तपासण्यासाठी कंपनीने वेगळा मार्ग निवडला. कंपनीतील ज्या कर्मचार्यां ची मात्तृभाषा कानडी किंवा बंगाली आहे त्यांचेकडे ती भाषांतरे तपासण्यासाठी देण्यात आली. त्यावेळी बंगलोरला मराठी आणि हिन्दी भाषा येणारा मी एकमेव माणुस होतो. त्यामूळे हिन्दी आणि मराठी भाषांतरे माझ्याकडे आली. मराठी भाषांतराची तर बोंबच होती. त्यात बर्यारच सुधारणा कराव्या लागल्या. हिन्दी भाषांतर मात्र अप्रतीम झाले होते. नंतर मला कळले की हे भाषांतर गुलशन नंदा या हिन्दीमधील ज्येष्ट कादंबरीकाराने केले होते. गुलशन नंदा यांच्या हिन्दी कादंबर्याध त्या वेळी फार लोकप्रिय होत्या. त्यांच्या अनेक कादंबर्यांतवर चित्रपट पण निघाले. त्यावेळी त्यांच्या कादंबरीवर आधारलेला राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा ‘कटी पतंग’ हा सिनेमा तुफान गाजला होता. यासाठी गुलशनबाबूंनी भरपूर फी उकळली पण भाषांतर मात्र अप्रतीम करून दिले. उर्दु भाषांतर सुद्धा हिंन्दी सिनेजगततील एका प्रसिद्ध कवीने करुन दिले होते.

कॉपी ठरल्यानंतर महत्वाचा भाग असतो तो म्हणजे लेआऊट. थोडक्यात जाहीरात कशी दिसेल याची मांडणी. आधी जाहीरातीमध्ये कंपनीची प्रॉडक्ट दाखवायची नाहीत, फक्त लोगो दाखवायचा असे ठरले. पण मग नंतर कंपनीच्या प्रॉडक्ट ऍडमध्ये डिझेल इंजीन आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारी प्रॉडक्स दाखवावी असे ठरले. आधी जाहीरातीमध्ये माणसाचे चित्र नव्हते. पण जाहीरातीला काहीतरी मानवी चेहेरा असावा असे ठरले. यासाठी आधी काही मॉडेल्स आणि चित्रपट तारकांचा विचार झाला. पण मग कंपनीतीलच एखादा कर्मचारी असावा असे ठरले. उत्तम पर्सनॅलिटी असलेला एक कर्मचारी कंपनीच्या मुंबई ऑफीसमध्ये होताच. त्याची मॉडेल म्हणून निवड झाली. लेआउटची आर्ट वर्क येउ लागली आणि लेआउट पण फायनलाइज होऊ लागले.

कोणत्या वर्तमानपत्रात जाहीराती टाकायच्या आणि त्यांचे टाईमटेबल काय असावे यावर चर्चा सुरू झाली. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी जाहीरातींचे दर जास्त असतात. त्यामूळे रविवारच्या सुट्टीच्या अलिकडचा दिवस म्हणजे शनिवार, नंतरचा दिवस म्हणजे सोमवार आणि आठवड्याचा मधला दिवस म्हणून गुरुवार हे दिवस ठरले. दोन जाहीरातींमध्ये 15 दिवसांचे अंतर असावे असे ठरले. टाईम्स ऑफ इंडीया, इंडियन एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाईम्स, हिन्दू, अमृत बझार पत्रीका या इंग्रजीमधील आघाडीच्या वृत्तपत्रांसह एकूण 54 वर्तमानपत्रे निवडण्यात आली. यांमध्ये मराठीतील सकाळ, लोकसत्ता, तरुण भारत आणि पुढारी ही प्रमुख वर्तमानपत्रे होती. (त्या वेळी महाराष्ट्र टाईम्स बहुतकरून नसावा) या वर्तमानपत्रात जाहीराती कोणकोणत्या तरखांना प्रसिद्ध होणार हे वेळापत्रक त्याचप्रमाणे जाहीरात प्रसिद्ध झाल्यावर त्या वर्तमानप्तराचे तीन अंक बंगलोरला पाठवायचे ऍड एजेन्सीने मान्य केले.

अशा रितीने ऍड कॅम्पेन दणक्यात सुरू झाले. ठरल्याप्रमाणे कंपनीच्या जाहीराती छापून येऊ लागल्या. जाहीराती छापून आलेल्या अंकांचे गठ्ठे च्या गठ्ठे बंगलोरला येऊ लागले. पेपर मध्ये छापून आलेल्या जाहीराती बघून सगळ्यांचे डोळे सुखावू लागले. फिल्डमधून पण जाहिरातींना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ऍड कॅम्पेन सक्सेसफुल झाला आहे असा फिडबॅक येऊ लागला. कंपनीने जाहीरातींसाठी जी मेहेनत घेतली होती आणि भरपूर पैसे खर्च केले होते (त्या वेळी या सर्व कँमेनचा खर्च 17 लाख रुपयांच्या घरात गेला होता. त्यावेळचे 17 लाख म्हणजे आत्ताचे 2 कोटी 93 लाख) ते सत्कारणी लागले असे वाटत होते.

या जाहीरातबाजीच्या काळात एक गंमतीदार घटना घडली. मी विमानाने बंगलोरहून दिल्लीला निघालो होतो. मला विमानात त्या दिवसाचा टाईम्स ऑफ इंडियाचा अंक मिळाला होता. तो अंक चाळत असताना त्या अंकाच्या दुसर्यां पानावर छापून आलेल्या आमच्या कंपनीच्या जाहीरातीकडे माझे लक्ष गेले. थोड्याच वेळात सुटा बुटातले एक गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी पण टाईम्सचा अंक चाळायला सुरवात केली. माझ्या कंपनीच्या जाहीरातीवरून त्यांनी दोन तीन वेळा तरी नजर फिरवली असेल. थोड्या वेळाने मला त्यांनी त्यांचा परीचय करू दिला. भारतातील एका प्रसिद्ध वाहन निर्मिती करणार्या् कंपनीचे ते उच्च अधीकारी असल्याचे मला कळले. त्यांनी मला त्यांचे कार्ड पण दिले ते मी शर्टाच्या खिशात ठेवले. मी मग माझा परिचय करून दिला. माझ्या कंपनीचे नाव ऐकताच ते लगेच म्हणाले, ‘तुमच्या कंपनीबद्धल मी नुकतेच काहीतरी वाचले आहे!’
‘काय वाचलेत?’ मी कुतुहलाने विचारले.
‘नक्की आठवत नाही पण काहीतरी वाचले एवढे मात्र खरे. कदाचीत एखादी बातमी असेल’ ते म्हणाले.
‘साधारणपणे केव्हा वाचलेत?’ मी विचारले.
‘नक्की आठवत नाही! झाले असतील दोन तीन दिवस!’ ते म्हणाले.
मला जरा आश्चर्यच वाटले. मी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड नीट बघीतले आणि उडालोच. ते त्यांच्या कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर होते आणि त्यांना काही वेळापूर्वी बघीतलेली आमच्या कंपनीची जाहीरात आठवत नव्हती. तर इतरांची काय कथा?
मी त्यांना जेव्हा सांगीतले की त्यांनी आमच्या कंपनीविषयी थोड्या वेळापूर्वी या विमानातच वाचले आहे आणि जेव्हा मी त्यांना टाईम्समधली ऍड दाखवली तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले, ‘ आम्ही सुद्धा पूर्वी अशा जाहीराती देत होतो. पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आल्यावर जाहीराती देणे बंद केले.’ मला काही त्यांचे म्हणणे फारसे पटले नाही तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘टाईम्समध्ये तुमच्या कंपनीव्यतिरिक्त इतर अनेक जाहीराती आहेत. यातील किती जाहीराती तुमच्या लक्षात आहेत?’ खरोखरच एकही जाहिरात माझ्या लक्षात नव्हती. ‘आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी जाहीराती टाकत असतो आणि ऍड एजन्सीजना धनवान करत असतो. कारण कुठलिही ऍड एजन्सी घ्या. ती न्युज पेपर ऍड कॅम्पेनच सजेस्ट करत असते. कारण यातच त्यांचा फायदा असतो.’ ते म्हणाले.
‘म्हणजे तुम्ही ऍड टाकत नाही?’ मी वाचारले.
‘आम्ही आता पॅटर्न बदलला आहे. आम्ही लोकल डिलरला ऍड टाकायला सांगतो आणि त्याचा खर्च आम्ही उचलतो. यामूळे एकतर ऍड परिणामकारक होतात आणि खर्च पण वाचतो!’ ते म्हणाले.

बंगलोरच्या आमच्या मिटींगमध्ये मी हा किस्सा सांगीतला. पुढे कंपनीने पण तो ऍड कॉम्पेन आवरता घेतला. त्यानंतर या कंपनीने कधी पेपरमध्ये ऍड टाकल्याचे मी तरी पाहीले नाही.

एकुण जाहीरातबाजी करण्यासाठी किती मेहेनत घ्यावी लागते याची थोडी तरी कल्पना यावी यासाठी मी हा प्रपंच मांडला. तसेच हे एक खर्चीक माध्यम आहे. असे असुनही आज वर्तमानपत्रे, मासीके, टी.व्ही., रेडियो यांच्या माध्यमातून आपल्यावर जाहीरातींचा पाऊस पडत असतो. काही वर्तमानपत्रे तर केवळ जाहीरातींवरच चालतात असे मला आढळून आले आहे. पुण्याचा ‘सकाळ’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. मी हल्ली पुण्याच्या सकाळचा उल्लेख ‘सकाळ म्हणजे जाहीरतींचा सुकाळ’ असाच करत असतो. अनेक टीव्ही चॅनल तर निव्वळ जाहीरातीवर चालतात. अनेक कंपन्या या जाहीरातींसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असतात पण याचा किती उपयोग होतो? एकतर पेपरमध्ये छापून आलेल्या जाहीराती लक्षात रहात नाहीत. टी.व्ही. वरच्या जाहीरातीच्यावेळी अनेक जण टी.व्ही. म्युट करतात. तीच गोष्ट रेडियोवरच्या जाहीरातींची आहे. आता तर जाहीरातींचे तंत्र बदलत चालले आहे. इंटरनेट जाहीरातींचे युग सुरू झाले आहे. यांमध्ये केवळ जाहीरात पाहिल्याबद्दल पैसे मिळण्याची सोय आहे. अमेरिकेतील वर्तमान पत्रांमध्ये तसेच टी. व्ही. वर जाहीराती फार कमी असतात. तेथील वर्तमानपत्रे जाहीरातींची वेगळी सप्लिमेन्ट काढतात जे लोक जपून ठेवतात. टी. व्ही. वर सुद्धा जाहीरातींचा म्हणून वेगळा प्रोग्रॅम असतो. आपल्याकडे अजून हा प्रकार सुरू झाला नाही. काही दिवसांनी या पेपर आणि टी. व्ही. वाल्यांना जाहीराती मिळणे बंद होईल. मग हे लोक काय करतील?

असो! जाहीरातींना किती महत्व द्यायचे. जाहीरातींच्या या जंगलात स्वतःला किती बुडवायचे आणि आपले आयुष्य किती जाहीरातमय करून टाकायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

तुम्हाला काय वाटते?
उल्हास हरी जोशी
मोः-9226846631

28 May 2017

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..