नवीन लेखन...

श्री प्रभादेवी..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा –

मुंबईचा प्रभादेवी भाग आज जगभरात प्रसिद्ध आहे, तो इथल्या श्री सिद्धिविनायकामुळे. अलम जगातून या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी त्याचे भक्तगण येत असतात..पण एक गंमत आहे, हा श्री सिद्धिविनायक कितीही प्रसिद्ध झालेला असो वा अगदी परदेशातही प्रतिष्ठापित झालेला असो, तो ओळखला जातो, तो ‘प्रभादेवी’चा सिद्धिविनायक म्हणूनच. आपल्या देशातील बहुसंख्य देवता विविध नांवाने जरी ओळखल्या जात असल्या तरी, ती आहेत शंकर-पार्वतीचीच रुपं. म्हणजे एका अर्थाने प्रभादेवी ही श्री सिद्धिविनायकाची आईच म्हणायला हरकत नाही आणि उगाच नाही त्याला ‘प्रभादेवी’चा सिद्धिविनायक म्हणत..! श्री प्रभादेवीचं देऊळही आहे श्री सिद्धिविनायकाच्या मंदीरापासून अगदी हाकेच्या अंतरावर..!

श्री प्रभादेवीचा प्राचीन इतिहास मोठा रंजक आहे. प्रभादेवीचं मंदीर आता जिथं पाहातो, ते हिचं मूळ ठिकाण नव्हे. श्री प्रभादेवीचं मूळ मंदीर होतं मुंबईच्या माहिमात. श्री प्रभादेवीच हे प्राचीन मंदिर मुंबईच्या महिमात नेमकं कुठं आणि कुणी बांधलं ह्याचा शोध घेताना, दोन वेगळ्या प्रकारची माहिती मिळते. पहिली माहिती मिळते ती ‘महिकावतीच्या बखरी’त. महिकावती हे महिमच एक नांव आहे. सदर बखर सन १४४८ ते सन १५७८ या दरम्यान लिहिली गेलेली असून, यात (शके १०६२) सन ११४० ते साधारणत: सन १३४० पर्यंतच्या अदमासे २०० वर्षांच्या दरम्यान बहुतकरून केळवे-माहीम आणि मुंबई माहीम या परिसरात घडलेल्या राजकीय घटनांचा उल्लेख आहे. यातील घटना सन ११४० पासून चालुक्य कुळातला राजा प्रताप बिंबाच्या मुंबईतल्या आगमनापासून सुरु होतात आणि सन १३४० च्या आसपास कुठेतरी संपतात. या दोनशे वर्षांच्या काळात मुंबईवर राज्य केलेल्या राजांचा इतिहास सांगणारी ही बखर आहे.

‘महिकावातीची बखर’ सांगते की, श्री प्रभावती ही मुंबईचा चालुक्य कुलाचा राजा प्रताप बिंबाची देवता. चालुक्यांची कुलदेवता श्री शाकंभरी, जिला प्रभावती असंही नांव आहे. राजा प्रताप बिंबाने त्याची कोकण प्रांतातली मूळ राजधानी केळवे-माहिम हातची गेल्यानंतर, शके १०६२ मधे (सन ११४० च्या दरम्यान) मुंबईतील माहिम येथे नविन राजधानी केली. कोणत्याही नविन गोष्टीची सुरुवात कुलदेवतेच्या स्थापनेने करायची प्रथा आपण आजही पाळतो. तद्वत, प्रताप बिंबाने माहिम येथे राजधानी स्थापन करताना, आपली कुलदेवता श्री प्रभावती हिचं देऊळ स्थापन केलं असावं, बखरीत असं कुठेही म्हटलेलं नाही, मात्र असा तर्क केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. हा तर्क मला अधिक संयुक्तिक वाटतो, कारण आताच्या श्री प्रभादेवीच्या मंदीरात तिच्या डाव्या-उजव्या हाताला असणाऱ्या श्री कालिका आणि श्री चंडिका देवींच्या मूर्ती..! श्री कालिका देवी ही राजा प्रताप बिंबाचे सरचिटणिस गंभिरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता, तर श्री प्रभादेवीच्या डाव्या हाताला असलेली श्री चंडीका देवी, राजा प्रताप बिंबाचे पुरोहीत असलेल्या हेमाडपंतांची कुलदेवता असल्याचा उल्लेख ‘महिकावतीच्या बखरी’त स्पष्टपणे आहे. पुरोहित हेमाडपंत आणि गंभिरराव सूर्यवंशी राजा प्रताप बिम्बासोबत माहिमला आल्याची नोंद बखरीत आहे. या गंभीरराव सूर्यवंशीना वरळी गाव इनामात दिल्याची नोंदही बखरीत आहे. राजा प्रताप बिंबाने त्याच्या कुलदेवतेसोबत, त्याच्या या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या कुलदेवतांना बरोबरीचं स्थान देऊन त्यांचा सन्मान केला असावा किंवा या कुलदेवता असलेल्या समाजाला आपल्या राज्यात बरोबरीचं स्थान आहे, असा संकेत दिला असावा असं वाटण्यास जागा आहे. या देवता आजही श्री प्रभादेवीच्या मंदिरात तिच्या सोबत आहेत. यावरून श्री प्रभादेवीच मूळ माहीम येथील मंदिर राजा प्रताप बिम्बाने आजपासून सुमारे ८७९ वर्षांपूर्वी स्थापन केलं असावं, असा तर्क मांडल्यास तो चुकीचा ठरू नये.

श्री प्रभादेवीच्या मंदिराच्या अनुषंगाने दुसरी माहिती मिळते, ती श्री. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी या पाठारे प्रभू समाजातील व्युत्पन्न लेखकाने इसवी सन १८९०-९५ सालात लिहिलेल्या ‘The Hindu Temples of Bombay’ ह्या पुस्तकात. ह्या पुस्तकात श्री प्रभादेवीचं मंदीर शके १२१७, म्हणजे इसवी सन १२९५ मध्ये माहिममधील ‘कोटवाडी’ इथे उभारल्याचा उल्लेख श्री. के. रघुनाथजींनी केला आहे. त्याच वर्षीच्या पौष पौर्णिमेला या देवीची प्रतिष्ठापना पाठारे प्रभू समाजाचे उपाध्ये हेमाद्रीपंतांच्या हस्ते झाल्याचंही ह्या पुस्तकात म्हटलेलं आहे. थोडक्यात प्रभादेवी मंदिराची स्थापना महिमातील कोटवाडी येथे पठारे प्रभू समाजाने केली असा त्याचा अर्थ. हा अर्थ बरोबर आहे असं गृहीत धरल्यास, आजच्या श्री प्रभादेवीच्या मंदीराचा इतिहास आजपासून सुमारे ७२५ हून अधिक वर्ष मागे जातो.

श्री प्रभादेवीचं हे मंदीर कुठे बांधलं याचाही उल्लेख बखरीत नाही, तरी ते माहिमातच असावं, असं म्हणता येईल. कारण प्रताप बिंबाची राजधानी माहिम होती व कुलदेवतेचं मंदीर राजधामा नजिकच असणार, हे नक्की. महिकावतीच्या बखरीत याचा उल्लेख नाही, मात्र के. रघुनाथजींच्या पुस्तकात मात्र हे मंदीर माहिमच्या लेडी जमशेटजी मार्गावरील ‘कोटवाडी’त होतं असा उल्लेख आहे. ही कोटवाडी माहिममध्ये नेमकी कुठे आहे आणि असल्यास तिचं आताचं नांव काय, याचा शोध घेताना, ती माहिममध्येच आणि जुन्या नांवानेच अद्यापही अस्तित्वात असल्याचा शोध लागला. नेमकं सांगायचं म्हणजे, माटुंगा पश्चिमेस असलेल्या लेडी जमशेटजी मार्गावरील सिटी लाईट सिनेमावरून सेना भवनच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला येणारी दुसरी लेन म्हणजे ‘बाल गेविंददास रोड’. ह्या रोडच्या तोंडावरच असलेल्या आश्रय हाटेलला लागून असलेला ‘बाल गोविंददास रोड पुढे रुपारेल कालेजच्या सर्कलला जातो. हा रस्ता ह्या सर्कलला जिथे मिळतो, तिथेच डाव्या हाताला ‘यशवंत नाट्यगृह’ आहे आणि डाव्या हाताला जी वस्ती आहे, तिच के. रघुनाथजींच्या पुस्तकात उल्लेख केलेली ‘कोटवाडी’. इथे आता काही इमारती, टाॅवर, बैठी वस्ती, महानगरपालिकेची शाळा वैगेरे आहेत. के. रघुनाथजींच्या पुस्तकात या ठिकाणाबद्दल दिलेली माहिती, मधल्या सात-आठशे वर्षात झालेले बदल वगळल्यास, या ठिकाणाशी तंतोतंत जुळते.

पाठारे प्रभू समाजातील काही जाणकारांशी चर्चा केली असता, त्या पैकी काहीजण, आताचं शितला देवीचं मंदीर पूर्वी प्रभादेवीचं होतं असं सागतात. तो धागा पकडून शोध घेतला असता, जुन्या पुस्तकात शितालादेवीचा उल्लेख आढळला नाही. के. रघुनाथजींच्या पुस्तकातही शितलादेवी नाही, मात्र शितलादेवी ज्या मंदिरात आहे, त्या मंदिराचा ‘महादेवाचं मंदिर’ म्हणून उल्लेख आहे व त्यात शित्लादेवीची प्रतिमा आहे असं म्हटलेलं आहे. शक्यता अशी आहे की, मुळात हे महादेवच मंदिर असाव आणि नंतर शितलादेवीच्या नांवाने प्रसिद्ध झालेलं असाव. ती शक्यता नाकारता येत नाही, परंतू लिखित काही मला सापडलं नसल्यामुळे स्वीकारताही येत नाही. कदाचित असंही असू शकेल की, प्रताप बिंबाच्या काळात बांधलेलं मूळ मंदीर आताच्या शितला देवीच्या मंदीराच्या जागी असावं आणि बिंब यादवाच्या काळात त्याच स्थलांतर कोटवाडीत केलं असावं. परंतु ठोस अशी काही माहिती मला उपलब्ध न झाल्याने, तूर्तास हे मंदीर माहीमच्या कोटवाडी येथे होतं, हे समजणं योग्य..!

माहीमच्या कोटवाडीच्या मंदिरात श्री प्रभादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन १२९४-९५ मध्ये झाल्यावर पुढची दोनेकशे वर्ष शांतते नंतर मुसलमान आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांची दृष्टी मुंबई आणि परिसरातल्या देवस्थानांवर गेली आणि ती देवस्थान उध्वस्त करण्याची मोहीम त्यांनी सुरु केली. परधर्म आक्रमकांच्या याच मोहिमेत माहीमच्या कोट वाडीतल श्री प्रभादेवीचं मंदीर जमिनदोस्त करण्यात आल्याचा उल्लेख के, रघुनाथजींच्या पुस्तकात आहे. मंदिर उध्वस्त होणार याची कुणकुण लागलेल्या या देवीचे पूजक असलेल्या पाठारे प्रभु समाजाच्या त्या काळच्या लोकांनी, देवीच्या मुर्तीची परकीय आक्रमकांकडून विटंबना होऊ नये म्हणून ती मुर्ती एक विहिरीत दडवून ठेवली. हा काळ होता साधारणत: सन १५१० ते १५२० च्या दरम्यानचा. पुढे जवळपास २०० वर्षांपेक्षा जास्त काळ ही मुर्ती विहिरीच्या तळाशी पडून राहिली. पुढे जेंव्हा धर्मांध आक्रमकांचा जोर ओसरला, तेंव्हा पाठारे प्रभू समाजाच्या ज्या व्यक्तीच्या बागेतील विहिरीत ती मूर्ती दडवली होती, त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने तिला वर काढायची आज्ञा केली. त्यानुसार ती मुर्ती विहिरीतून काढून तिची विक्रम संवत १७७१, म्हणजे इसवी सन १७१५ सालात आताच्या मंदीरात तिची प्रतिष्ठापना केलेली आहे. असा शिलालेख प्रभादेवीच्या मंदिरात पाहायला मिळतो.

प्रभादेवीच्या आताच्या मंदीरालाही ३०० पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली आहेत. या मंदीरातील देवीची मुर्ती मात्र कमीतकमी ७२५ ते जास्तीत जास्त ८७९ वर्षांपूर्वीची आहे असं खात्रीपूर्वक म्हणता येतं.

आताचं मंदीर दक्षिणोत्तर असून, मंदीरात प्रवेश करताच अगदी उजव्या हाताला श्री प्रभादेवीचं गर्भगृह आहे. श्री प्रभादेवीच्या उजव्या हाताला श्री कालिका देवीची मुर्ती आहे, तर प्रभादेवीच्या डाव्या हाताला श्री चंडीका देवीची मुर्ती आहे. श्री प्रभावती, श्री चंडीका आणि श्री कालिका या मुख्य देवतांव्यतिरिक्त या मंदीरात श्री सर्वेश्वर आणि श्री लक्ष्मी नारायण यांचीही स्वतंत्र गर्भगृहं आहेत. मंदीराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला श्री शितलादेवी, श्री हनुमान व श्री खोकलादेवीच्या मुर्ती आहेत. मंदीरात दोन दिपमाळाही आहेत. मंदीरात असलेला प्राचीन नंदी काही वर्षांपूर्वी मुंबईच्या प्रिन्स आफ वेल्स म्युझियममधे दिलेला असून, आताचा नंदी नव्याने स्थापन करण्यात आल्याची माहिती मंदीराचे ट्रस्टी श्री मिलिंद वाझकर व श्रीमती उज्वला आगासकर यांनी दिली. श्री प्रभादेवीच्या मंदीराचं व्यवस्थापन ‘दी किर्तीकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल इन्स्टीट्यूशन’ या संस्थेकडे आहे.

श्री प्रभादेवीची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला भरते. आपल्या गांवातील कोणत्याही जत्रेसारखी ही जत्रा असते. मंदीरावर आकर्षक रोषणाई केली जाते. विविध दुकानं, खाद्यपेयांचे स्टाॅल्स लागतात. उत्साही भाविक मोठ्या भक्ती भावाने लांब लांबहून या जत्रेसाठी येतात. जत्रेचा कालावधी १० दिवसांचा असून, जत्रेची सुरुवात पौष पौर्णिमा म्हणजेच शाकंभरी पैर्णिमेला होते. या देवीचं अन्य नांव श्री शाकंभरी असंही आहे. या मंदीराची इतर माहिती मंदीराच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कमीत कमी ७२५ ते जास्तीत जास्त ८५० वर्षाॅचा मुंबईचा, मुंबईवर राज्य करणाऱ्या राजघराण्यांचा, त्यांच्या सोबत आलेल्या आणि मुंबई समृद्ध बनवण्याचा पाया घातलेल्या अनेक समाजांचा, लढायांचा, परकीय आक्रमकांचा इतिहास उरात बाळगून असलेल्या या आई प्रभादेवीचं मंदीर नेमकं कुठं आहे, हे आज अनेक मुंबईकरांना सांगता येत नाही. मलाही माहित नव्हतं. परवाच म्हटलं, की श्री प्रभादेवीवर लिखाण करण्यापूर्वी जाऊन एकदा मंदीरात जाऊन तिचं दर्शन घेऊन येऊ म्हणून त्या परिसरात पोहोचलो आणि अनेकांना विचारत विचारत मंदिरात पोहोचलो. इथे एक देऊळ आहे, पण ते कोणाच हे त्याच परिसरातल्या अनेकांना सांगता येत नव्हत. पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड स्टेशनला ‘प्रभादेवी’ नांव दिल्याच्या किंवा देणार असल्याच्या बातम्या आपण आनंदाने वाचतो, ते नांव द्यायलाच हवं असं आपल्याला वाटतंही. पण का, ते मात्र नाही सांगता येत.

आई प्रभादेवीच्या मंदिरात गेल्यावर माझ्या वाचनात आलेला मुंबईचा आणि मंदिराचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. हा अनुभव आपणही घेऊ शकता. मुंबईच्या जडण-घड्निशी जवळचा संबंध असलेला इतिहास उरात बाळगून असलेलं एक पुरातन मंदीर आणि परकियांच्या आक्रमणाला पुरून उरलेल्या आई श्री प्रभादेवीचं दर्शन सर्वांनी घ्यायलाच हवं..!!

-नितीन साळुंखे
9321811091

संदर्भ-
1. महिकावतीची बखर – श्री. वि. का. राजवाडे
2. मुंबईचे वर्णन– श्री. गोविंद नारायण मडगांवकर
3. मुंबईतील आद्य जागृत शक्तिपीठे –श्री. भालचंद्र आकलेकर
4. Bombay Gazetteer of Bombay City and Island- Vol. I, II, III-1906
5. Hindu Temples in Bombay – Shri. k. Raghunathji 1890-95.- Published in 1900.
6. श्री प्रभादेवी मंदीराचं संकेतस्थळ
7. श्रीमती उज्वला आगासकर – आर्किटेक्ट आणि छायाचित्र पत्रकार
8. श्री. मिलिंद वाझकर, विश्वस्त- दी किर्तीकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल इन्स्टीट्यूशन
9. The Rise of Bombay- A Retrospect – S. M. Edwardes 1902.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..