नवीन लेखन...

जेष्ठ संगीतकार अनिल विश्वास

भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्वामस या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. त्यांचा जन्म ७ जुलै १९१४ रोजी बंगालमधील बरिसाल येथे झाला.

अनिल विश्वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्वाास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्वास ओळखले जातात. ते स्वतः उत्तम गायक होते, संगीतकार तर होतेच, पण एक अभिनयाची जाण असलेले उत्तम अभिनेताही होते. तसंच ते तबला अतिशय उत्कृष्ट वाजवत.

अनिल विश्वास यांच्यामध्ये संगीताची गोडी त्यांच्या आईमुळे निर्माण झाली. वयाच्या चवथ्या वर्षांपासून ते गायला लागले. त्यांची आई यामिनीदेवीचा आवाज खूपच सुरेल होता. ती स्वतः संगीतरचनाही करत असे. अनिल विश्वास यांचे वडील कामानिमित्त नेहमी बाहेर असत, त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला संगीत शिकण्याची मोकळीक दिली होती. याच कारणानं घरात नेहमी संगीतमय वातावरण असे. अशा वातावरणात अनिल विश्वास संगीताकडे ओढले जाणार नाहीत तर नवलच! आईनं लावलेला हाच संगीताचा वेलु पुढे बहरणार होता. एखादी रचना एकदा कानावर पडली, की ती जशीच्या तशी त्यांना पुन्हा गाता येत असे. त्यांची ग्रहणक्षमता कमालीची होती. कुठलीही गोष्ट ते क्षणात आत्मसात करत. त्यामुळे आसपासचे लोक अवाक् होत आणि त्यांना ‘श्रुतीधर’ म्हणत.

संगीत शिकताना पुढे आईशिवाय अनिल विश्वास यांना कालीप्रसन्न नट आणि लालमोहन गोस्वामी हे दोन गुरू मिळाले. पुढे त्यांनी महफिलींमध्ये गायला सुरुवात केली. पण गायकापेक्षा त्यांची ओळख संगीतकार म्हणून होत गेली. अनिल विश्वास यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. संगीताची समग्र समज त्यांना होती. बरिसालमध्ये त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि कलकत्यामध्ये ती अधिक परिपक्व होत गेली. बरिसालप्रमाणेच कलकत्यातल्या महफिलींमध्ये अनिल विश्वास नसतील, तर ती महफिल अधुरी वाटे.

अनिल विश्वास यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाएकाचं शिष्यत्व त्यांनी कधीच पत्करलं नाही. एका साच्यात त्यांनी स्वतःला कधी ठेवलं नाही. त्यामुळे अमुक एका घराण्याचा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. ज्या कोणाकडून शिकायला मिळेल, तिथून ते शिकत. अगदी वेश्या, नाचणार्यां च्या कोठ्यावर देखील त्यांची पावलं संगीत ऐकण्यासाठी वळली. संगीतक्षेत्रातल्या संधी त्यांच्यासमोर येत गेल्या आणि ते स्वीकारत गेले. अनिल विश्र्वास कविताही करत. वयाच्या १४ व्या वर्षापासून ते संगीत समारोहात गात असत.

वयाच्या १६ व्या वर्षी त्या वेळचे कलकत्त्यामधले थोर बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडे आश्रय घेतला. पन्नालाल घोष यांचा विवाह अनिल विश्वास यांची बहीण पारोल घोष हिच्यासोबत झाला होता. अनेक दिवस त्यांनी शिकवण्या घेतल्या. तसंच मेगा फोन रेकॉर्ड कंपनीत त्यांनी काम केलं. १९३० मध्ये अनिल विश्वादस कलकत्यातल्या रंगमहल थिएटरबरोबर अभिनेता, गायक सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला लागले. रंगमहल थिएटर हे कलकत्यामधलं सर्वश्रेष्ठ असं थिएटर होतं. कलकत्यामध्ये एक निहार नावाची वेश्या होती, तिला ते बहीण मानत. ती त्यांना रंगमहल थिएटरमध्ये घेऊन गेली आणि इथून त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. इथूनच त्यांच्यातला गायक, संगीतकार, कवी, अभिनेता बहरत गेला आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला.

संगीतक्षेत्रात लोक त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेऊ लागले. त्याच वेळी ते हिंदूस्थान रेकॉर्डिंग कंपनीबरोबरही जोडले गेले. तिथेच त्यांची कुंदनलाल सहगल आणि सचिन देव बर्मन यांच्याबरोबर भेट झाली. अनिल विश्वास व लता मंगेशकर हे एक समीकरणच होतं. १९४७ नंतर, लता मंगेशकर यांच्या आवाजाने अनिल विश्वास यांच्या संगीतात मुक्त संचार केला. ‘प्रीतम तेरा मेरा प्यार’ (गजरे), ‘याद रखना चाँद तारो’ (अनोखा प्यार), ‘मन में किसी की प्रीत बसले’ (आराम, ‘आए थे धडकन लेकर दिल में’ व ‘इस हंसती गाती दुनिया में’ (लाजवाब), ‘हंसले गाले ओ चाँद मेरे’ व ‘मस्त पवन है चंचल धारा’ (जीत), ‘क ैसे कह दूँ बजरिया के बीच’ (लाडली), ‘मोसे रूठ गयो मेरा सांवरिया,’ व ‘बेईमान तोरे नैनवा (तराना), ‘जा मैं तोसे नाही बोलूं’ (सौतेला भाई) इत्यादींसारखी अनेक हृदयस्पश्री गीतं अनिल विश्र्वास श्रेष्ठत्व ठरविण्यास पुरेशी ठरतात.

भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा अतिशय कुशल प्रयोग त्यांनी चित्रपटसंगीतात केला आणि भारतीय चित्रपटसंगीताला एक दर्जेदार संगीताचा मान मिळवून दिला. त्यांना ऑकेस्ट्राचं जे वेड होतं, त्यामुळेच त्यांनी बॅले संगीतावर उल्लेखनीय काम केलं. त्यांनी उर्दु गजलांचा अनुवाद बंगाली भाषेत केला. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी संगीताच्या जगात त्यांनी आपला ठसा उमटवला. १९३१ बोलपटांचा जमाना सुरू झाल्यानंतर, चित्रपट संगीताला नवी दिशा देणार्‍या त्यातही, शास्त्रीय व लोकसंगीताचा सुरेख वापर वेळोवेळी करणार्‍या अनिल विश्वास यांनी आपल्या यशस्वी संगीत कारकिर्दीत जवळपास ९५ चित्रपटांना उत्तम संगीत दिलं.

मिलन, ज्वारभाटा, लाडली, अरमान, अनोखा प्यार, आरजू, छोटी छोटी बाते, सौतेला भाई या चित्रपटांचं संगीत अजरामर आहे. अनिल विश्वास यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मुकेश, तलत महेमूद, लता मंगेशकर, बेगम अख्तर, मीना कपूर आणि अमीरबाई कर्नाटकीसारख्या एकूण ७६ गायकांनी गाणी गायली. नाट्यसंगीत आणि भक्तीसंगीताचीच त्या वेळी मक्तेदारी होती, अशा वातावरणात ती चौकट भेदून अनिल विश्वास यांनी संगीताला खरं भारतीय व्यक्तित्व दिलं. अखिल भारतीय स्तरावर संगीताला वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. चित्रपटसंगीताच्या क्षेत्रातून निवृत्ती घेउन अनिल विश्वास दिल्ली आकाशवाणीत रुजू झाले. तिथे त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत काम केलं. १९८६ साली त्यांना संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवलं गेलं. या काळात एक नॅशनल ऑर्केस्ट्रा बनवण्याच्या विचारानं त्यांना झपाटलं होतं. पण थंड सरकारी यंत्रणेकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यानं ती योजना तशीच बारगळली.

दिल्ली आकाशवाणी वर अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मां यांच्या रचना मन्नाडेंच्या आवाजात गाऊन घेतल्या. त्यातली ‘नाच रे मयुरा’ ही शास्त्रीय बंदिश इतकी श्रवणीय आहे की त्या काळी ती खूपच गाजली होती. ते जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातही संगीत सल्लागार म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी संगीताचे वर्गही चालवले. हम लोग’, बैसाखी’, ‘फिर वही तलाश’ सारख्या उत्कृष्ट टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं.

‘हम लोग’चं शीर्षक गीत आजही सगळ्यांना आठवत असेल, आईए हाथ उठाये हम भी’ या ओळींची रचना केली होती फैज यांनी. या एक ओळीला दिलेलं संगीत आणि त्यामागचा कोरस आजही विसरता येत नाही. तसंच अनिल विश्वास यांनी ‘गजलेर रंग’ हे गजलवर आधारित बंगाली भाषेत एक पुस्तकही लिहिलं.

‘गजल’ या विषयावरचं त्यांचं संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. अनिल विश्वांस यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना सन्मानित केलंच, पण मध्यप्रदेश सरकारनेही त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं गौरवलं. अनिल विश्वास यांचे ३१ मे २००३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..