नवीन लेखन...

चेहरे ओळखायला शिका

मुंबई मराठी पत्रकार संघात कुठल्याशा परिसंवादात मेधा पाटकर यांनी केलेल्या विधानावर गदारोळ उठणे स्वाभाविक होते. पण तशी भूमिका घेणार्‍या त्याच एकट्या नाहीत. अशा लोकांचा मोदीद्वेष इतका पराकोटीला गेलेला आहे, की त्यासाठी देशही बुडाला तरी बेहत्तर; अशा स्थितीला त्यांची मानसिकता गेलेली आहे. पण आपल्याला जोवर अशा लोकांचे चेहरे ओळखता येत नाहीत, तोपर्यंत भारत सरकार किंवा भारतीय सेनाही पाकिस्तानचा बंदोबस्त करू शकणार नाही. हीच मंडळी सतत डॉ. दाभोळकर यांच्या खुनाचे आरोपी पकडले जात नाहीत, किंवा त्या खुन्यांना शिक्षा होत नाही, म्हणून मातम करीत असतात. अशा गुन्ह्याचा शोध घेताना गुन्हेगाराची मोडस ऑपरेन्डी पोलिस शोधत असतात. मुरलेले बनेल गुन्हेगार एका ठराविक शैलीमध्येच गुन्हा करत असतात. त्यातून त्यांची एक शैली तयार होत असते. त्याचाच मागोवा घेत गेले; मग गुन्हेगाराचा सुगावा लागत असतो आणि त्याला पकडणे शक्य असते. मेधाताई किंवा अन्य तत्सम लोकांच्या वक्तव्ये आणि वर्तनामध्ये तशीच एक मोडस ऑपरेन्डी आपल्याला बघता येऊ शकते. दिग्विजय सिंग आता म्हणतात, युपीएच्या कालखंडामध्येही भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक केलेले होते. पण मोदी सरकारप्रमाणे त्याचा गाजावाजा केलेला नव्हता. आपण थोडा वेळ त्यांचे विधान खरे मानू. गाजावाजा केला नाही, म्हणजे गुपचुप काही केले आणि त्याबद्दल कुठे वाच्यता होऊ दिली नाही. ही लपवाछपवी मनमोहन सरकारने कशाला केली? त्यांना कोण जाब विचारणार होता? मेधाताई जाब विचारण्याची भिती युपीए सरकारला वाटत होती काय? मेधा किंवा तत्सम लोकांच्या दबावाखाली मनमोहन सरकार वावरत होते काय? म्हणून त्यांनी सर्जिकल हल्ले केले, पण त्याची वाच्यता केली नव्हती काय? असेल तर अशा लोकांना युपीए सरकार घाबरत कशाला होते?

एक गोष्ट मागल्या अडीच वर्षात आपण विसरून गेलो आहोत, की पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी केलेले पहिले काम, म्हणजे राष्ट्रीय सल्लागार मंडळ बरखास्त करून टाकले होते. मनमोहन सरकारने सत्ता हाती घेतल्यावर सोनिया गांधींना कॅबिनेट दर्जा देण्यासाठी हे सल्लागार मंडळ नेमलेले होते. त्यात अनेक निर्णय व्हायचे आणि नंतर तेच मनमोहन सरकारने कायद्याच्या चौकटीत बसवून अंमलात आणायचे; असे युपीए सरकारचे काम चालू होते. त्या सल्लागार मंडळात सोनियांना सोडून कोणाचा समावेश होता? याकुबला फ़ाशीतून वाचवायला धावपळ करणार्‍यांपासून इशरतसाठी मातम करणार्‍यांपर्यंत तमाम लोक त्यात सहभागी होते. आज पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून हट्ट धरून बसणारे किंवा पुरस्कार वापसीचे नाटक रंगवणारेही त्यातलेच दिसतील. सध्या बिळात दडी मारून बसलेली इशरतची मावशी तीस्ता सेटलवाड त्याच मंडळाचा हिस्सा होती. असे लोक सोनियांच्या अध्यक्षतेखाली मनमोहन सरकारवर देखरेख ठेवत असतील, तर सर्जिकल हल्ला करण्याची मनमोहन सिंग यांची बिशाद होती काय? आणि तसे परस्पर काही झाले असेल, तर कबुल करण्याची कोणाला हिंमत झाली असती? पाकिस्तानच्या हेरखात्याला पुरक ठरणार्‍या भूमिका वा निर्णय, भारतात मागली दहा वर्षे कशाला घेतले गेले, त्याचा एक एक प्रकरणातून शोध घेत जा. तर त्याच सल्लागार मंडळाचे दडपण कारणीभूत असल्याचे दिसून येईल. नेहरू विद्यापीठातील भारतविरोधी घोषणांना पाठीशी घलायला पुढे आलेले लोक आणि त्याचेच समर्थन करायला तिथपर्यंत गेलेले राहुल गांधी, कुठल्या बाजूचे आहेत, याचे वेगळे पुरावे देण्याची गरज आहे काय? यातले सगळेच पाकिस्तानचे हस्तक नसतात. त्यातले मोजके हस्तक असतात आणि बाकीचे खुळे प्रतिष्ठेसाठी त्यांच्यासोबत अशा ठिकाणी हजेरी लावत असतात.

बियॉन्ड एनेमी लाईन्स अशी एक उंग्रजी उक्ती आहे. कुठल्याही युद्धामध्ये प्रत्यक्ष रणभूमी असते आणि लढणार्‍या सैनिकांवर पाठीमागून हल्ला करणारी एक शत्रूची फ़ौजही असते. समोरच्या शत्रूला मारताना पाठीतून वार करणारे आप्तस्वकीय, ही शत्रूची दुसरी फ़ळी असते. सोनियांच्या सल्लागार मंडळातून अशाच पाकिस्तानी फ़ळीची उभारणी करण्यात आलेली होती. त्यांनी कायद्याच्या चाकोरीत राहून पिछाडी लढवावी ही अपेक्षा असते. सैन्याने शत्रूशी लढावे आणि हस्तकांनी शत्रूच्या युद्धसज्ज यंत्रणेला खच्ची करीत रहावे, हीच जुनी रणनिती आहे. युपीएच्या काळात पाकिस्तानने अशीच एक मोठी फ़ळी भारतात उभी केलेली आहे. म्हणून तर मुंबईत दोनशेच्या आसपास निरपराध नागरिक कसाब टोळीने मारले, तेव्हा पाकिस्तानातून आलेले हल्लेखोर हा आरोप पुसून काढण्यासाठी कोण पुढे सरसावले होते? माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ़ यांचे ‘हु किल्ड करकरे’ पुस्तक आठवा. त्यातून त्यांनी स्पष्टपणे भारतीय हेरखात्यानेच करकरेंना मारले आणि त्यासाठीच मुंबई हल्ल्याचे नाटक घडवल्याचा आरोप केलेला आहे. भारतीय हेरखाते व प्रशासन व्यवस्थेमध्ये हिंदूत्ववादी भरलेले आहेत. मालेगावच्या घातपातामध्ये गुंतलेल्या पुरोहित व साध्वीला करकरे यांनी पकडले, म्हणून त्यांनाच मारण्यासाठी मुंबई हल्ल्याचे नाटक योजले गेले; असा तर्कदुष्ट आरोप मुश्रीफ़ यांनी केला. त्या पुस्तकाचे विविध भाषेत भाषांतर व प्रकाशन करण्यापासून त्यावर सतत चर्चा घडवून आणण्यात कोणाकोणाचा पुढाकार होता? त्याच्याही आठवणी चाळवून बघा. त्यात गुंतलेली माणसे, संस्था यांची आजची भूमिका तपासून बघा. मग पाकिस्तानने भारतात आपल्या हस्तकांचे किती खोलवर जाळे विणलेले आहे, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकतो. मगच मेधा पाटकर यांना अचानक गांधी व अहिंसा कशाला आठवली, त्याची कारणे उमजू शकतील.

सलमान, शाहरुख, करण जोहर यांच्यापासून मेधा पाटकर यांच्यापर्यंत कोणीही कायद्याच्या मर्यादा ओलांडणार नाही. पण त्याच चौकटीत राहून पाकिस्तानला उपयुक्त ठरतील, अशा कारवाया इथे करताना आढळून येईल. मग गुजरात दंगलीवरून माजवलेले काहुर असेल, दादरीची घटना असेल किंवा इशरतसाठी फ़ोडलेला टाहो असेल. पाकिस्तानी प्रचाराला उपयुक्त वा भारताला त्रासदायक ठरेल अशाच भूमिका ही माणसे कशाला घेतात? याचे अन्य काही उत्तर असू शकते काय? आपण अशी माणसे ओळखून त्यांना बहिष्कृत करणार काय, हा प्रश्न आहे. अमेरिकेने वा राष्ट्रसंघाने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, ही मागणी करणे सोपे आहे. पण ज्या देशामध्ये सामान्य जनता आपल्या जवानांच्या हत्याकांडानंतर सलमान वा पाक कलावंतांसह मेधासारख्या लोकांना बहिष्कृत करण्याचे साधे पाऊल उचलत नसेल, तर अमेरिकेने वा जगातल्या अन्य कोणी कशाला हातपाय हलवावेत? बाहेरच्या शत्रूंना वा घातपात्यांना सेनादल बघून घेईल. पण आपल्याच या धाडसी जवानांच्या पाठीत वार करत उजळमाथ्याने वावरणार्‍यांना आपण बहिष्कृत करणार कधी? दुसर्‍याने काय करायचे ते आपल्याला ठाऊक आहे. आपण काय करायचे, याचे भान कधी येणार? हा सवाल चर्चेचा वा विचारांचा नाही. हेच विसरलो म्हणून दहा वर्षे युपीए नावाचे पाकधार्जिणे सरकार सत्तेत बसले होते. त्यामुळे पाक हस्तक बोकाळले आहेत. पाकिस्तान त्यांना ‘नॉन स्टेट एक्टर’ म्हणतो. सलमान-जोहर कला ‘बॉर्डरलेस’ असल्याचे म्हणतात. ज्यांना सीमा मान्य नाहीत ते कलाकार आणि घातपाती जिहादी यात फ़रक काय राहिला? मात्र त्यांना मारायला गेल्यास मेधाताई हिंसेचा आरोप करणार. हे चेहरे आपण ओळखणार नसू, तर सरकार वा सेनादलही आपल्याला वाचवू शकणार नाही. कसायाला गाय धार्जिणी असेल, तर गोरक्षा कायदा काय करू शकतो?

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सलमान, शहारुख बरोबरच मेधा पाटकरांचाही समाचार घेणारा हा लेख.
WhatsApp वरुन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..