नवीन लेखन...

अभ्यंग स्नान.. आरोग्याला वरदान

दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण घासला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान.

खरे तर प्रत्येकाने स्वास्थ टिकविणे ही आज काळाची गरज आहे. आपले सगळे सण वार त्याला जोडुन असणारे रिवाज, सणांना करण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नितीनियम गाठोड्यात बांधुन वरच्या माळ्यावर टाकले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपल्याला समजत नाही.

वास्तवीक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करुन थांबायचे नसते, तर त्या दिवसापासून पुढे वर्षभर करायचे असते. दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल कुण्या प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळित भेटलेले हेच विसाव्याचे क्षण , आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात. प्रत्येक नात्यातला आपलेपणा – आपुलकी पणा टिकवितात.

दिवाळी म्हणजे मुक्त हस्ताने तेजाची उधळण करणारा सण. दिवाळीत असते दिव्याच्या पंक्तीचे तेज, दारात लटकणारया आकाशदिव्याचे तेज, अंगणात मांडलेल्या रांगोळीचे तेज, श्रीलक्ष्मीच्या आराधनेमुळे आलेल्या मांगल्याचे तेज. एकंदरीत दिवाळी हा सण तेजाची लयलुट करणारा आहे, जीवनास तेजोमय बनविणारा आहे.

सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणारयांनी आवर्जुन घ्यायला हवा. आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास करणारयांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणारयांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणारयांनी, बौध्दिक शारिरिक परिश्रम करणारयांनी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य प्रतिदिन अभ्यंग करावे.

सर्व साधारण ३० ते ४० मिनीटे संपुर्ण मसाज व्हायला हवा. तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे. अभ्यंग विषेशतः सकाळी आंघोळ आणि व्यायाम करण्यापुर्वी करावा. अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते, त्वचेचा टोन सुधारतो, त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवरील लव कमी होते. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.

शरीरात ज्या ठिकाणी वात हा दोष कार्यरत असतो त्या ठिकाणी तैलादी द्र्व्ये ही वात नाशनाचे काम करतात. वाताचे रुक्ष व खरता हे दोन गुण स्नेहाच्या मार्दवता व स्निग्धता या उलट असल्याने वातविकाराचे शमन होते, त्वचेच्या ठिकाणी स्पर्शानुभव होत असल्याने वाताची रुक्षता नियमित अभ्यंग करणारया लोकांमध्ये नश्ट होऊन वात रोगाची उत्पत्ती टाळली जाते. आयुर्वेदानुसार आठ वेळा तुप खाण्यापेक्शा एकदा तैलाभ्यंग करुन घेणे सरस ठरते. नियमित व तात्रिक दॄष्ट्या योग्य प्रकारे तैलाभ्यंगाने सर्व अंगप्रत्यंग पुष्ट व बलवान होतात. दृष्टि तेजोमय होते व मन समाधानी होऊन निद्रा सुखकर होते.

अभ्यंग म्हणजे वास्तवता शरीरातील वेगवेगळ्या स्नायुंना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम होय. या क्रियेमुळे स्नायुंना गती, चालना मिळुन ते अबाधित रित्या काम करु लागतात. अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्शन क्रियेने उष्णतेची निर्मीती होते. परीणामी रक्ताधीन असलेले विजातीय द्रव्ये तसेच त्वचेखालील अतिरिक्त फॅट वेगवेगळे होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकले जातात. परीणामी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक रक्त शुध्द होऊन शरीराची कांती निखळून येते. शरीरात असणारया वेदना, सुज या तैलाभ्यंगाने नष्ट होऊन अस्थी सांध्यांना पुष्टता व दृढता प्राप्त होते. तसेच मणुष्य देखील शक्ती संपन्न होऊन दिर्घायुष्य प्राप्त करतो. नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते. स्नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.

अशाप्रकारे शरीराचा लवचिकपणा तसेच कांती थोडक्यात संपुर्ण आरोग्यच जर अभ्यंगा सारख्या सहज सोप्या उपायाने मिळत असेल तर प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यावयासच हवा.

करावे नित्यदिन सर्वांगास अभ्यंग
प्रफुल्लीत मन उत्साही सर्वांग
तारूण्य टिकेल आयुष्य भर
न दुखणार गुडघा अन् कंबर
तेजोमय दिवाळी, सुवर्ण मयी काया
हिच खरी अभ्यंगाची किमया…….

अभ्यंगासाठी तिळाचे तेल सर्वात चांगले आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये गंगा कंपनीचे वनौषधींबरोबर प्रक्रिया केलेले तिळाचे तेल मिळते किंवा डाबर कंपनीचे भारीचे धान्वंतर तेल मिळते ते तेल आपण अभ्यंगासाठी वापरु शकतो. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकित्सा. अगदी दररोज शक्‍य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी.

काही शंका असेल तर ०९३२६५११६८१ या व्हॉट्सएप वर मॅसेज करा( कृपया फोन करु नका..इतर मॅसेज पाठवु नका.)

— डॉ.कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, उदय पेट्रोल पंपामागे, बार्शी रोड, लातूर
फोन ०२३८२ २२१३६४ , ०९३२६५११६८१

— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..