संत महिपति


भक्तिभावाने ओथंबलेल्या सुमारे चाळीस हजार ओव्या लिहुन ‘संत चरित्रकार’ कविवर्य महिपतिबोवा ताहराबादकर यांनी मराठी भाषेत खरोखरच एक अमोल कामगिरी केली आहे. त्यांचे ‘श्रीभक्तविजय’ ‘श्रीसंतलीलामृत’ ‘श्रीभक्तलीलामृत’ यासारखे रसाळ ग्रंथ मराठी भाषेचे अमोल लेणे ठरले आहेत. आपल्या काव्य गंगेने त्यांनी लक्षावधी मराठी वाचकांना खरोखरच पावन करून टाकले आहे !

महिपती बोवांचा जन्म

इ. स. १७१५ (शके १६३७) मधला. मोगलाईतील ताहराबाद हे त्यांचे जन्मस्थान. त्यांचे संपूर्ण नाव महिपती दादोपंत कांबळे. हे ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राह्मण.

त्यांचे वडिल दादोपंत हे ताहराबाद येथे स्नानसंध्या, देवतार्चन आणि ध्यानधारणा करून मोठ्या आनंदाने कालक्रमण करीत असत. पंढरीचा पांडुरंग हेच सर्वस्व मानून त्यांनी तनमनधनाने त्याचीच उपासना केली. दर महिन्याच्या शुध्द एकादशीची त्यांची पंढरपुरची वारी चोवीस वर्षात कधी चुकली नाही.

परंतु पुढे वयाची साठ वर्षे झाली. शरीरयंत्र थकुन गेले. त्यामुळे दर शुध्द एकादशीला पंढरीस जाऊन पांडुरंगाच्या सावळ्या, गोजिर्‍या मूर्तीचे दर्शन घेणें त्यांना अवघड वाटु लागले.

तरीही एकदा ते पंढरीस गेले. शरीरास थकवा जाणवतच होता. लाडक्या पांडुरंगाची साजिरी मूर्ती डोळ्यात साठवून घेऊन ते भरल्या डोळ्यांनी म्हणाले, ‘ हे देवाधिदेवा, कदाचित् ….. हेच तुझे अखेरचे दर्श्न असेल. विठ्ठला मायबापाऽ आता शरीर साथ देत नाही. इतक्या दुर तुझ्या दर्शनासाठी आता नाही रे येववत ! सावळ्या पांडुरंगा, मनीमानसी एकच इच्छा होती ….. ही पंढरीची वारी पुढच्याही पिढीत अशीच चालू रहावी. परंतु ….. माझ्या सारख्या निपुत्रिकाची ही इच्छा कशी पुर्ण होणार ….. ?

….. दादोपंतांच्या तोडून शब्द फुटत नव्हता. त्यांचा गळा दाटुन आला होता….. पंढरीनाथाला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि रात्रीच्या वेळ
ते बाहेरच्या ओवरीत येऊन झोपले.

-आणि त्याच रात्री एक नवल घडले !

स्वप्नात साक्षात पांडुरंगाने दर्शन देऊन एक पेढा त्यांच्या हातावर ठेवला आणि प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, ‘वत्सा, दुःख करु नकोस. हा पेढा तुझ्या पत्नीला खावयास दे, म्हणजे तुझी इच्छा पुर्ण होईल.’

त्या विलक्षण स्वप्नामुळे दादोपंत खडबडुन जागे झाले. त्या स्वप्नात्या आठवणीमुळे त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. विलक्षण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पांडुरंगाने स्वप्नात दिलेला पेढा प्रत्यक्षच त्यांच्या हातात होता ….. ! !

-ताहराबादेस आल्यावर त्यांनी तो अमूल्य प्रसाद आपल्या पत्नीस खावयास दिला.आणि लवकरच तिला गर्भ राहिला अन् नवमास पूर्ण होताच तिने एका तेजस्वी गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला. हेच आमचे चरित्रनायक कविवर्य महिपतीबोवा ! अशा प्रकारे बोवांचा जन्म ईश्वरी कृपाप्रसादाने झालेला असल्याने बालपणापासूनच त्यांच्या ठायी पांडुरंगाच्या भजनपुजनाची आवड निर्माण झाली घरापासून दूर एकांतस्थळी जावे आणि दगडांच्या चिपळ्या करून भक्तिभावाने पांडुरंगाचे भजन करावे, त्या भजनात देहभान विसरून जावे, असा त्यांचा नित्यक्रम सुरु झाला. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी पंढरीच्या वारीस जाण्याचा हट्ट वडिलांजवळ धरला आणि वडिलांनीही तो मोठ्या प्रेमाने पूर्ण केला. अशा प्रकारे दरमहा पंढरीची वारी करण्याचा दादोपंतांचा क्रम त्यांच्या पुढच्या पिढीतही चालू राहिला !

बोवा लहानपणापासूनच ज्ञानोपासक होते. त्यांची बुध्दि अतिशय तल्लख होती. संस्कृत, मराठी, गुजराती, कानडी अशा चार भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या. ज्ञानेश्वरी व तुकोबाची गाथा या ग्रंथांचा त्यांनी फार बारकाईने अभ्यास केला होता.

वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच ते वंश परंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णपद व जोसपण सांभाळू ल
गले. परंतु त्यांचे चित्त मात्र सदैव भगवंताकडेच लागलेले असे. यम नियमांची जपणूक करून ईश्वरार्चन करण्यातच त्यांचा काल व्यतीत होत असे.

ताहराबादचा जहागीरदार एक मुसलमान गृहस्थ होता. आपल्या कुळकर्णपणाच्या कामानिमित्त बोवांना त्या मुसलमानाच्या कचेरीत नेहमीच जाव लागे.एकदा बोवा स्नान संध्या वगैरे उरकुन नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या पुजेत मग्न होते. तेवढ्यात जहागिरदाराचा एक यवन शिपाई बोवांना कचेरीत बोलावण्यास आला. परंतु बोवांचे चित्त पांडुरंगाच्या पूजेत रंगुन गेले होते. एका पांडुरंगाशिवाय त्यांच्या मनात दुसरा कसलाच विचार नव्हता. त्यामुळे शिपायाकडे न पहाता ते म्हणाले, पुजा आटोपल्यावर येऊ. ते ऎकून यवन शिपाई चरफडत परत गेला. परंतु जहागीरदाराने त्याला तोच निरोप देऊन पुन्हा पाठविले. असे दोन वेळा झाले. परंतु बोवांची पूजा अजून संपली नव्हती. ते आपल्याच तंद्रीत ब्रह्मरस चाखीत होते ! परंतु शिपायाला त्याचे काय ! तो बोवांना उद्देशून अधिक उणे बोलू लागला. ते ऎकून बोवा भानावर आले एका यःकश्चित शिपायाने असे उपमर्दकारक भाषण आपल्याला उद्देशून करावे याचे त्यांना विलक्षण दुःख झाले. त्यानंतर पूजा आटोपून ते लगबगीने कचेरीत गेले व तेथले काम आटोपुन घरी परत आले आणि त्याच क्षणी त्यांनी कानावरची लेखणी पांडुरंगाच्या पायावर ठेवून शपथ घेतली की, आजपासून गावकामासाठी लेखणी हातात धरणार नाही …..’

अशाप्रकारे बोवा नोकरीतून मुक्त झाले. तरीपण त्यांना, ‘आता पुढे काय ?’ असा प्रश्न पडण्याचे कारण नव्हते. कारण हरिभजनात त्यांचा काल उत्तम प्रकारे व्यतीत होऊन सार्थकी लागत होता ! संत तुकाराम यांचा स्वप्नात दिलेला आशिर्वाद अशा प्रकारे पांडुरंगाची निस्सीम सेवा करीत असताना त्यांना एके दिवशी रात्री प्रत्यक्ष तुकोबांनी स्वप्नात दृष्टांत दिला. आपला वरदहस्त बोवांच्या मस्तकावर ठ
वून ते म्हणाले, ‘बोवा, नामदेवांच्या शतकोटी अभंगांचा संकल्प पांडुरंगाच्या कृपेने माझ्या हातून पूर्ण झाला आता संत चरित्राचे कार्य तुमच्या हातुन व्हावे.’

एवढे सांगून तुकोबा स्वप्नात अंतर्धान पावले आणि त्याच दिवसापासून बोवांना सुंदर काव्य स्फुरू लागले आणि बोवा तुकोबांनाच आपले परमार्थ गुरु मानु लागले.

या संदर्भात त्यांच्या ग्रंथातुन अनेक ओव्या आढळून येतात. उदारणार्थ –

जो भक्तिज्ञान वैराग्य पुतळा । ज्याचे अंगी अनंत कळा ।

तो सद्गुरु तुकाराम आम्हासी जोडला । स्वप्नीं दिधला उपदेश ॥

किंवा

बाळपणी मरे माता । मग प्रतिपाळी पिता ॥१॥

तैशापरी सांभाळिले । ब्रीद आपुलें साच केलें

॥२॥

यात्रा नेली पंढरीसी । ध्यान ठेविलें पायांसी ॥३॥

हृदयीं प्रकटोनी बुध्दि । भक्तविजय नेला सिध्दी ॥४॥

स्वप्नीं येऊनि तुकाराम । आपुलें सांगितले नाम ॥५॥ इ.

महिपतीबोवांचे समकालीन कविश्रेष्ठ मोरोपंत यांनीही आपल्या ‘महिपती स्तुती’ मध्ये पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आढळते-

‘सत्य तुकारामाचा, या महिपतिवरि वरप्रसाद असे ।

सद् नुग्रहाविणॆं हें निघतिल उद् गार सार काय असे ॥’

असो. बोवांचा जन्म झाला त्यावेळी श्रीतुकाराम महाराजांचे महानिर्वाण होऊन अर्धशतकाचा काळ लोटला होता. याचाच अर्थ, बोवांना संत तुकाराममहाराजांचा उपदेश होणे शक्य नव्हते. परंतु महिपतबोवांकडून प्रत्यक्ष पांडुरंगालाच भक्त चरित्र लेखनाचे महत्कार्य करवून घ्यावयाचे होते नि म्हणूनच भगवंतानेच ही लीला रचिली होती असेच म्हटले पाहिजे !

तथापि एवढी मोठी कृपा होऊनही बोवा मुळातच अतिशय नम्र असल्यामुळे या घटनेविषयी आपल्या ‘भक्तलीलामृत’ ग्रंथात ते लिहितात-

‘मी तरी सर्वांविषयी हीन । ऎसे साक्ष देतसे मन ।

परी कृपा केली कवण्यागुणे । त्याचे कारण तो जाणे’ ॥१-२१

संत चरित्रे लिहिण्याचा व्या
ंग ते एके ठिकाणी म्हणतात-

तुम्ही संतमूर्ती । ऎसा निश्चय दृढ चित्तीं ।

म्हणोनिया महिपती । नमन करी सद्भावे ॥

संतांविषयी हाच आदरभाव बाळगून त्या काळाच्या बहुतेक कवींनी आपल्या काव्यातून संत चरित्रांचे गायन केले आहे. कारण त्या काळात काव्य हे उपजीविकेचे साधन नव्हते तर श्रीहरीशी व संतांशी नाते जोडण्याचा तो एक उत्तम मार्ग होता !

माउलींनी देखील भावार्थ दीपिकेच्या अठराव्या अध्यायात असेच म्हटले आहे की-

हारपले आपण पावे । ते संताते पाहता गिवसावे ।

म्हणोनि वानावे ऎकावे । तेचि सदा ॥ (ज्ञाने. १८ । ३९ ३९७)

बोवांनी यासाठीच आपल्या चाळीस हजाराहून अधिक ओव्यात महाराष्ट्रातील १६८ व महाराष्ट्राबाहेरील ११६ संत पुरुषांची चरित्रे लिहून एक अभूतपूर्व विक्रमच जणू केला आहे ! बोवांचा हा प्रचण्ड व्याप पाहून त्यांच्या समोर आपले मस्तक आदराने लवल्याशिवाय राहत नाही बोवांचा विवाह झाला होता. पत्नीचे नाव सरस्वतीबाई. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले. बोवांनी अखेरपर्यंत पांडुरंगाची सेवा केली व श्रावण वद्य १२ शके १७१२ (इ. स. १७९०) मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी ते पांडुरंग चरणी विलीन झाले. ताहराबाद येथे बोवांचे राहते घर अजुन उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथुन जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.

बोवांच्या वंशजांकडे केशव नायक शिष्याने काढलेले बोवांचे चित्र आहे. (प्रस्तुत चित्र पोथीवर मुद्दाम प्रकाशित केले आहे.) बोवांच्या पादुका, त्यांचा चौरंग आणि लाकडी फ्रेममधे बनविलेला चष्मा या वस्तुही त्यांच्या वंशजांकडे काळजीपूर्वक जतन करून ठेवलेल्या आढळतात.

प्रत्येक कवि आपल्या ग्रंथाच्या वाचनाची फलश्रुती ग्रंथाअखेर लिहित असतो. कवि परमार्थ मार्गात अधिकार संपन्न असेल तर वाचकाला त्या फलश्रुतीनुसार फलेही प्राप्त होतान
दिसून येते. ‘श्रीभक्तलीलामृत’ या प्रस्तुतच्या ग्रंथातही महिपती बोवांनी ग्रंथ वाचनाची फलश्रुती पुढीलप्रमाणे दिलेली आढळते. ते लिहितात –

या ग्रंथामाजी इतुकाचि अर्थ । की भक्तासि पावला भगवंत । श्रोतयां वक्त्यांचे मनोरथ । रुक्मिणीकांत पुरवील ॥ ग्रंथ संग्रह करिता घरी । तरी त्याची विघ्ने पळती दुरी । सुदर्शन घरटी करी । निश्चय अंतरी असों द्या ॥ संत चरित्रें वाचिता आधी । तत्काळ होईल चित्तशुध्दी । कदापि न राहे द्वेषबुध्दी । तेणेंचि भवाब्धी पार होय ॥ ५१-२१७-१९

बोवा हे परमार्थ मार्गात फार उच्च श्रेणीस पोचलेले होते. त्यामुळे त्यांच्या वाचेला सिध्दी होती. नि म्हणूनच हा ग्रंथ जो भक्ति व एकाग्रतेने वाचील त्याला या फलश्रुतीचा अनुभव आल्याशिवाय खचित राहणार नाही

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*