मराठी सिने अभिनेते मोहन गोखले यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला.
घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मोहन गोखले वावरले.
मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार, स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. शालेय शिक्षण नूमवि कॉलेजचे स.प आणि फर्गसन येथे. शाळेत असतानाच रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली.
त्याच सुमारास, १९७२ साली त्यांना ‘ घाशीराम कोतवाल ‘ मधे छोटी भूमिका मिळाली. दिव्याला जाणा-या ब्राम्हणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. सतीश आळेकर यांचे ‘ महापूर ‘ हे नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचंच ‘मिकी आणि मेमसाब ‘ , सतीश तांबेंचं ‘ बीज ‘ ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटकं.
मोहन गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या ‘ कस्तुरीमृग’ आणि ‘सूर्याची पिल्ले’ मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर ‘ बेबी’ , ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ , ‘ नरू आणि जान्हवी ‘ ही नाटकेही गाजली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हेच माझे माहेर’ , ‘माफीचा साक्षीदार’ आणि ‘आज झाले मुक्त मी’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
कमल हसनाच्या ‘ हे राम ‘ च्या शूटिंगसाठी चेन्नईत असताना मोहन गोखले यांचे २९ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.
Leave a Reply