मोहन जोशी

मराठी नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये विविध भूमिका करून आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा जन्म. १२ जुलै १९५३ रोजी बंगलोर येथे झाला.

मोहन जोशी यांचा जन्म जरी बंगलोरचा तरी बालपण व शिक्षण पुण्यात झाले. मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली.

बी.एम.सी.सी. मध्ये शिकत असताना ते नाटकात काम करत असत. कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.

पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्‍यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसर्‍याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.

पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक. मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आजपर्यंत २५० चित्रपटात काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

मोहन जोशी यांना नाटक अकादमी पुरस्कार ही मिळाला आहे. मोहन जोशी आणि पत्नीश ज्योती जोशी यांनी ’गौरीनंदन थिएटर्स’ नावाची एक नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे गजरा (चित्रवाणी मालिका), डिटेक्टिव्ह जयराम(मालिका), भटाच्या चालीने (नाटक), मनोमनी (नाटक) अशी उत्तम मराठी नाटके आणि दूरचित्रवाणी मालिका निर्माण केली. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*