वैद्य, यशवंत त्र्यंबक

भारतीय शास्त्रीय संगीताच्या गायन परंपरेतील ठाणे शहरातील एक अग्रगण्य नाव म्हणजे  यशवंत वैद्य ! यशवंत वैद्य यांचा जन्म १५ जून १९३२ रोजी झाला. १९५३ ते १९६० दरम्यान त्यांचे गुरु कै. भास्करबुवा फाटक यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. १९७२ साली गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली. १९७२ पासून विद्यार्थ्यांना गायन शिक्षणदानाची त्यांनी केलेली सुरुवात आजतागायत अव्याहतपणे सुरु आहे. शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी अलंकार आणि संगीतातील एम. ए. परिक्षांसाठी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे.

६० वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत वैद्य यांनी आपल्या गायनाने रसिकांना मोहिनी घातली. गुरु कै. भास्करबुवा फाटक यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेऊन संगीत विशारद ही पदवी घेतली. मुंबई आकाशवाणी तसेच इंदौर, वापी, पेण, कर्जत इ. ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करुन वैद्य यांचे गायन खुलले. विशेषत: मल्हार रागावर आधारित विविध कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो.

१९८५ पासून आकाशवाणी मुंबईवरुन त्यांचे गायनाचे कार्यक्रम प्रसारित झाले. याशिवाय इंदौर, वापी यासह भारतभर अनेक ठिकाणी त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले. विविध रागातील ४० बंदिशींची निर्मिती, काफी मल्हार, ध्वनी कल्याण, अनुरंजनी, भूपरंजनी इत्यादी नवीन रागांची निर्मिती हे त्यांनी संगीत क्षेत्राला दिलेले विशेष योगदान. वैद्यसरांना त्यांच्या अनमोल संगीतविषयक कार्याबद्दल ”चित्तपावन ब्राह्मण संघ”, ”अदिती संगीत सभा”, ”कलायतन” इत्यादी अनेक संस्थाकडून सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ”जितेंद्र अभिषेकी स्मृती सोहळा”, २००९ मध्ये ”ठाण्यातील राम मराठे स्मृती सोहळा” यांमध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. आपल्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ गायन कारकीर्दीत वैद्यसरांनी आपल्या सुमधुर गायनाने लाखो रसिकांना मोहिनी घातली. त्यांच्या आजवरच्या गुणवंत विद्यार्थ्यांपैकी अनेकजण आकाशवाणीवरील प्रथितयश गायक म्हणून ओळखले जातात.

संगीत क्षेत्राची सेवा करतानाच त्यांनी १९५० ते १९९० म्हणजे तब्बल ४० वर्षे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये नोकरी केली. त्यादरम्यान १० वर्षे त्यांचा कामगार क्षेत्रात सहभाग होता.

ऐतिहासिक, संगीतविषयक आणि वैद्यकीय वाचन, सुगम हिंदी भजन यांना चाली लावणे तसेच वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करणे हे त्यांचे काम आजही चालूच असते. त्यामुळेच वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांच्यातला उत्साह सळसळत आहे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची ओढ कायम आहे.

विविध रागातील बंदीशींची रचना करुन काफी मल्हार, ध्वनी कल्याण, अनुरंजनी इत्यादी नवीन रागांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांनी आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. संध्या खांबेटे, सुरेश बापटही त्यातील काही नावे.

यशवंत वैद्य यांनी गायन व संगीत क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना “जितेंद्र अभिषेकी स्मृती सोहळा २००२”, “कृतार्थ कला जीवन पुरस्कार”, “राम मराठे स्मृती समारोह २००९” मध्ये सत्कार अशा अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*