दानवे, जयशंकर

Jayshankar Danve

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे उत्कृष्ट खलनायक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.

p-6330-Jayshankar-Danveत्यांचा जन्म पुणे येथे १ मार्च १९१० रोजी महाशिवरात्रीला झाला. ३ सप्टेंबर १९८६ रोजी कोल्हापूर येथे त्यांचे देहावसान झाले. या ७५ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ६७ चित्रपट आणि १३४ नाटके व त्यांचे असंख्य प्रयोग त्यांच्या नांवावर आहेत.त्यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओत चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी बराच काळ व्यतीत केला.

राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे होते जयशंकर दानवे. सुलोचना या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्रीला “ करीन ती पूर्व ” या रंगमंचावरील नाटकाद्वारे प्रथम अभिनय क्षेत्रात आणणारे आणि “ जयभवानी ” या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रथमच त्यांना मुख्य नायिकेची संधी देणारे होते जयशंकर दानवे. “ ऐका हो ऐका ” या नाटकातून गणपत पाटील यांना नाच्याची पहिली टाळी शिकविणारे व राजशेखर यांना रंगभूमीवर याच नाटकाद्वारे प्रथम दिग्दर्शन करणारे होते जयशंकर दानवे.

चंद्रकांत,सुर्यकांत मांडरे,सोहराब मोदी,विक्रम गोखले,जयश्री गडकर,पद्मा चव्हाण,रत्नमाला,रमेश देव अशा कलाकारांना अभिनयाच्या पाउलवाटेवर प्रथम संधी देऊन सिने-नाट्य सृष्टीची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणारे होते जयशंकर दानवे.त्यांनी एक काळ हैद्राबादला ‘हैम्लेट’ नाटकाचे असंख्य प्रयोग करून गाजवला होता. उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असूनही मुंबईच्या अभिनय महासागरात न जाता कोल्हापुरात राहून त्यांनी अनेक कलाकार शिष्य घडविले.करवीर वाचन मंदिर,करवीर नाट्य मंदिर,देवल क्लब,मेडिकल असोसीएशन, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल,न्यू हायस्कूल अशा कोल्हापुरातील अनेक संस्थाना नाटकांच्याद्वारे उर्जितावस्था आणली.अशा कलाकाराचे चिरंतन स्मरण रहावे म्हणून दानवे परिवारातर्फे सन १९८७ पासून आजपर्यंत गेली ३० वर्षे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

शं.ना.नवरे, माधवी देसाई, अनंत दिक्षित, व.पु.काळे, शिरीष कणेकर, श्याम भुर्के, द.मा.मिरासदार, विक्रम गोखले, प्रभाकर पणशीकर, रामदास फुटाणे, फ.मु.शिंदे, मोहन जोशी, सुधीर गाडगीळ असे कलाकार व साहित्यिक त्या निमित्ताने करवीर नगरीत आले. सन २०१०-११ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष कोल्हापुरात जवळजवळ १५ संस्था मार्फत साजरे करण्यात आले.

असे कलाकर्तुत्व असणाऱ्या कलाकाराचे संपूर्ण चरित्र रसिकांसमोर यावे या उद्देशाने त्यांच्या आत्मचरित्राच्या आधारे दि.१ मार्च २०१० रोजी जयश्री दानवे लिखित त्यांच्या कलाप्रवासाचा आढावा घेणारा चरित्रग्रंथ “ कलायात्री ” प्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या चरित्रग्रंथाला आजपर्यंत एकूण १० पुरस्कार लाभले.अंकुर वाग्मय पुरस्कार,अनंत फंदी साहित्य पुरस्कार,प्रा.चंद्रकुमार नलगे साहित्य पुरस्कार,ज्ञानमाउली साहित्य पुरस्कार,शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कार,कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार,करवीर साहित्य पुरस्कार,कोल्हापूर प्रेस क्लब पुरस्कार,लळीत साहित्य पुरस्कार,साने गुरुजी साहित्य पुरस्कार हा रोख ११,००० रु.चा पुरस्कारही नुकताच प्राप्त झाला.

२०११ सालापासून “नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार हा मानाचा पुरस्कार दानवे परिवारातर्फे प्रदान करण्यात येतो. आजपर्यंत रंगकर्मी “श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे, श्री.सदाशिव अमरापूरकर,श्री.शरद पोंक्षे, श्री.अरुण नलावडे, श्री.सुबोध भावे ” यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून सध्या हा कलायात्री पुरस्कार बहुमानाचा समजण्यात येत आहे. तसेच त्या दिवशी मान्यवरांच्या प्रकट मुलाखतीचा जो कार्यक्रम सादर होतो तो कोल्हापुरातील एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून गणण्यात येतो.

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे (3-Sep-2017)

अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे (1-Mar-2022)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*