य. गो. जोशी

आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकर्‍या केल्या. त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९०१ रोजी झाला आणि प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला.

हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांच्या ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते.

य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले. जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते.

‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्निहक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या आहेत.

य.गो. जोशी हे पुण्यातून प्रकाशित होणार्‍या ’प्रसाद’ मासिकाचे संपादक होते. य.गो. जोशींच्या पुण्यतिथीला नामवंतांच्या उपस्थितीत ’यशवंत संध्या’ नावाचा संगीत कार्यक्रम करण्यात येतो.

य.गो.जोशीं यांचे ७ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*