नारायण वामन (रेव्हरंड टिळक) टिळक

Tilak, Narayan Waman (Rev. Tilak)

रेव्हरंड टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे दि. ६ डिसेंबर १८६१ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलुनही दाखविले तसेच वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना. वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभुत असल्याची खात्री झाली.

लहानपणापासूनच ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी, तीक्ष्ण बुद्धीचे होते. तसेच ते मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे जाणकार होते शिवाय त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. टिळक शीघ्र कवीही होते.

वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. नागपूर येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले.

एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना बायबल वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. १० फेब्रुवारी १८९५ या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

१८९५ पासून त्यांच्या मृत्युपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १०० हून अधिक भक्तीगीते, ओव्या, अभंगांची रचना केली तसेच त्यांनी २,१०० हून अधिक कविता आणि ख्रिस्तायन नावाचे महाकाव्य लिहिले. ते उत्तम वक्ता होते तसेच ख्रिस्त विषयावर ते कीर्तने करीत.

दि. ९ मे १९१९ रोजी टिळकांचे निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*