रायगड जिल्हा

Raigad District

रायगड या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीचा किल्ला रायगड हे या जिल्हयाचे प्रमुख वैशिष्ट्य.या किल्ल्याने, या जिल्ह्याने छत्रपतींचा राज्याभिषेक डोळे भरून पाहिला. या किल्ल्यावरूनच जिल्ह्याला ‘रायगड’ हे नाव देण्यात आले आहे.रायगडला समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. शिवाय पूर्वेकडील सह्याद्रीची रांग, जिल्ह्यात राहणारे आदिवासी लोक ही वैशिष्ट्ये आहेत. न्हावाशेवा येथील अत्याधुनिक बंदर (पंडित जवाहरलाल नेहरू बंदर) आणि पनवेलच्या आसपास झालेला औद्योगिक विकास हे घटक रायगडच्या प्रगतीला चालना देत आहेत. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र या जिल्ह्यातील खोपोली येथे आहे. त्याचबरोबर भिरा व भिवपुरी हीदेखील दोन महत्त्वाची जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत.