संतूरवादक पं. उल्हास बापट

संतूरवादक

अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.

त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले.

पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले.

दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची ‘क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.

संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या ‘क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर ‘मींड’ काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही ‘क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत.

प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या ‘संतूरच्या भावविश्वात’ या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी ‘बंदिश’ म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते.

पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.

पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या “सहज स्वरांतून मनातलं” हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.

दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

#PtUlhasBapat #UlhasBapat

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*