राम गणेश गडकरी

नाटककार, लेखक आणि कवी

जन्म 26 जून 1885 जन्म गुजरातमध्ये नवसारी जवळ गणदेवी येथे. गोविंदाग्रज या नावाने काव्यलेखन. काव्य, विनोद व नाटक यांचा त्रिवेणी संगम. `बाळकराम` म्हणून विनोदी लेखक. किर्लोस्कर नाटकातुन नाटकातुन नाटकी जीवनाचा प्रारंभ, गर्व निर्वाण पहिले नाटक.

मराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. आपल्या अल्पशा कारकीर्दीत त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व मराठी रसिकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. विशेषत त्यांच्या एकच प्याला` या नाटकाचे प्रयोग त्यांच्या मृत्यूनंतरही होत आहेत.

सुरुवातीच्या काळात पुण्यातील `ज्ञानप्रकाश` मध्ये उपसंपादक, `न्यू इंग्लिश स्कूल` मध्ये शिक्षक अशा नोकर्‍या केल्यानंतर राम गणेश गडकरी यांना किर्लोस्कर नाटक कंपनीत नाटयपदं लिहिण्याची संधी मिळाली व इथून त्यांची कारकीर्द सुरु झाली. बालपणापासून साहित्यात विलक्षण रुची असल्याने वयाच्या सतराव्या वर्षीच `मित्रप्रीती` नावाचं नाटक लिहून त्यांनी आपलं लेखन सुरु केलं होतं. इ.स. 1913 मध्ये रंगभूमीवर आलेलं `प्रेमसंन्यास` हे त्यांचं पहिलं नाटक. त्यांनंतर `पुण्यप्रभाव` (1917), एकच प्याला` (1919), `भावबंधन` (1920) ही नाटकं आली. `राजसंन्यास` हे त्यांचं अपूर्ण नाटक. त्यांनी 1906 च्या सुमारास लिहिलेलं पण अपूर्ण अवस्थेतील `वेडयांचा बाजार` हे नाटक चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केलं. 1923 मध्ये ते प्रसिध्द झालं. एकच प्याला` सारख्या नाटकातील सुधारक, तळीराम, सिंधू यांसारखी पात्रं अजरामर ठरली.

नाटकांबरोबरच राम गणेश गडकरी काव्य आणि विनोदी लेखनांतही तितकेच लोकप्रिय ठरले. त्यांनी आपल्या कविता `गोविंदाग्रज` या टोपणनावाने लिहिल्या. त्या वाग्वैजयंती (1921) या संग्रहातून प्रसिध्द झाल्या. गडकरी केशवसुतांना आपले गुरु मानत असले तरी त्यांच्या कवितांना स्वत:ची प्रकृती होती. `क्षण एक पुरे प्रेमाचा -वर्षाव पडो मरणांचा -मग पुढे` यासारख्या शब्दांतून त्यांची विलक्षण प्रतिभा प्रभाव पाडून जाते. आपलं विनोदी लेखन त्यांनी `बाळकराम` या नावाने केलं. त्यांच्या कथांतून निखळ विनोदाबरोबरच उपहासात्मक व्यंगही ठळकपणे आढळतं. रिकामपणची कामगिरी` हा त्यांचा विनोदी लेखन संग्रह 1921 मध्ये प्रसिध्द झाला. त्यांचे समग्र विनोदी लेख `संपूर्ण बाळकराम` (1925) या नावाने प्रसिध्द झाले. याशिवाय गडकर्‍यांचं बरंचसं अप्रकाशित लेखन आचार्य अत्र्यांनी 1962 मध्ये `प्रकाशित गडकरी` या नावाने संपादित केलं.

`एकच प्याला` या नाटकाद्वारे महाराष्ट्रात सामाजिक नाटकांना चालना देणार्‍या गडकरींनी काव्य व विनोद या साहित्य प्रकारातही आपला ठसा उमटवला. साहित्यक्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे राम गणेश गडकरी अल्पायुषी ठरले. 34 व्या वर्षी या महान साहित्यिकाचे निधन झाले.

## Gadkari, Ram Ganesh

राम गणेश गडकरी यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी (23-Jan-2017)

लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी (26-May-2017)

लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी (24-Jan-2018)

2 Comments on राम गणेश गडकरी

Leave a Reply

Your email address will not be published.


*