विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता भारतात राहून भारतीय जनतेची सेवा करीत असत. एकदा एक ज्येष्ठ राजकीय नेते काही कामानिमित्त त्यांना भेटायला आले. भारताला स्वातंत्र्य मिळायला हवे या विषयावरही त्यांची चर्चा झाली. आणि बोलता बोलता भगिनी निवेदितांनी त्यांना प्रश्न विचारला, ”आपण विवाहित आहात का ?” त्यावर नेता म्हणाले, ”हो, मला तीन मुलेही आहेत !” ”मग माझ्या भेटीला येतांना आपण पत्नीला आणि मुलांना बरोबर का आणलं नाही ?” त्यावर ते नेता म्हणाले, ”आमच्याकडे तशी पद्धत नाही. बायका घराबाहेर पडत नाहीत. ती आमची परंपरा नाही. ते योग्य नाही. म्हणून मी त्यांना बरोबर आणलं नाही.” हे ऐकून भगिनी निवेदिता म्हणाल्या, ”तुम्ही स्वत:च्या बायकामुलांना रूढी-परंपरांच्या बंधनातून मोकळं करू शकत नाही तर मग तुम्ही काय देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार ? तुमचे विचार आणि तुमचं वागणं हे तर विसंगत आहे. तेव्हा प्रथम स्वत:चं घरदार स्वातंत्र्याचा आदर्श बनवा; मगच देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करा !
तात्पर्य – समाजात स्त्री-पुरुष समानता ही हवीच !
Leave a Reply