सम्राट चंद्रगुप्त मौर्य याचा मुलगा बिदूसार हा शेजारच्या राजाच्या निमंत्रणावरून त्या राज्याच्या भेटीसाठी गेला होता. तेथे गेल्यावर अनेक सरदार, मानकरी यांच्याशी त्याची ओळख झाली. त्यातील एका सरदाराने, ”आर्य चाणक्य यांना भेटायची फार इच्छा आहे.” असा मनोदय बिदूसाराजवळ व्यक्त केला. बिदूसाराने आनंदाने त्याला आपल्या राज्यात यायचे आमंत्रण दिले. काही महिन्यानंतर तो सरदार चंद्रगुप्त मौर्यच्या दरबारात त्यांच्या भेटीसाठी आला. चाणक्याची किर्ती तो ऐकून होता. त्यामुळे त्याच्या मनात चाणक्याबद्दल असूया होती. चंद्रगुप्ताचा दरबार, त्याचे वैभव पाहून त्याला राहवले नाही. काहीतरी निमित्त काढून त्याने बोलताना चंद्रगुप्ताचा अपमान केला. पण शेजारच्या राज्याचा पाहुणा म्हणून चंद्रगुप्ताने त्याकडे दुर्लक्ष केले. हे लक्षात येताच थोड्यावेळाने त्याने चाणक्याचा अपमान होईल अशी वाक्य उच्चारली. त्याक्षणी चंद्रगुप्त उठला आणि त्याने खाडकन त्या पाहुण्या सरदाराच्या तोंडात मारली. चंद्र्रगुप्ताने एकवेळ स्वत:चा अपमान गिळला पण आपल्या गुरुचा झालेला अपमान त्याने सहन केला नाही. पाहुणा खरं तर बिदूसाराच्या निमंत्रणावरून आला होता. तेव्हा त्याने ही पित्याचा अपमान प्रथम सहन केला पण पित्याच्या गुरुचा अपमान त्यालाही सहन झाला नाही. त्याने त्या सरदाराला दरबाराबाहेर काढले. कारण दोघंही पिता-पुत्र संस्कार जपणारे होते.
तात्पर्य – संस्कार आणि संस्कृतीचा मेळ असणे आवश्यक आहे.
Leave a Reply